Tuesday, 25 October 2016

या चिमण्यानों परत फिरा घराकडे......

साधारण एका महिन्यापूर्वी एका येलो सनबर्डने (शिंजीर) जोडप्याने आमच्या आंगणात आपले घरटे बांधायला सुरुवात केली. दरवर्षी घराच्या आजूबाजूला शिंज घरटे घालतो. शत्रूपासून घरट्याचे रक्षण करण्यासाठी हा पक्षी माणसाच्या जवळ घरट बनवतो असे लक्षात आले. पिवळसर मादी व अत्यंत देखणा नेव्ही ब्लू रंगाचा नर अशी थोडीसे विजोड वाटावे असे हे जोडपे. नर  आणि मादीचा घराजवळ त्यांचा वावर वाढला की समजाव घरट्यासाठी जागेची शोधाशोध सुरु आहे. यावर्षी मात्र अगदी घराला लागुनच असलेल्या शतावरीच्या वेलीवर घरट बांधायला सुरुवात झाली. अगदी दोन- तीन दिवसांत काडी काडी जमवून सगळं घर तयार झालं. आपल्या हाताच्या तळव्यावर बसेल इतकं ते  लहान होते. योगायोगाने रविवार होता म्हणून त्यांच्या घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर फोटो टिपत गेलो. एका आठवड्यात त्या मादीने इवल्याशा घरट्यात चार अंडी दिली. 
आम्हांला भीती होती की पिल्ल झाल्यावर हे घरट लहान होईल, त्या चार पिल्ल कशी राहतील? या दरम्यान ती रोज अंडी उबवण्यासाठी बसत असे. नर मात्र आज्ञाधारक नवऱ्यासारखा तिला किडे, आळ्या आणून देत होता. लांब बसून तिच्यावर लक्ष ठेवत असे. एकजण घरट सोडून गेले तरी दुसरे घरट्याचे संरक्षणासाठी आजूबाजूला बसलेले असायचे. एके दिवशी खूप पाऊस झाल, आम्हांला वाटल आता काही घरट राहत नाही. पावसाने जड झाल्यावर पडेल पण निर्सगाची कृपा असे काही झाले नाही. काही दिवसांत त्या अंडीमधून एकएक करत चार पिल्ल बाहेर आली. आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी लहान होती, रोज सकाळी पिल्लांची खबरबात आम्ही घेत असू . किती मोठी झाली या उत्सुकतेने एकदा तरी घरट्यात डोकावत असू. तीन - चार दिवसांनी पुन्हा दुपारी अचानक पाऊस आला, यावेळी चारीही पिल्ल घरट्यात होती. काय झालं असेल अशी उगाच चिंता लागली. पण दुसऱ्या दिवशी आम्ही डोकावले तर तेच आम्हांला डोळे वटारून पाहत होते. पण पावसाने घरटे होते जीर्ण झाल्यासारखे दिसत होते. तसेच पिल्ल मोठी होत होती, त्यामुळे घरटेही ताणले जात आहे, असे वाटत होते.
 रोज एकतरी फोटो घेणे जणू आमचा दिनक्रम झाला होता, त्यामुळे ती पिल्ल आता आम्हांला घाबरत नव्हती तर डोळे बिचकत बघत होती. इवलाश्या घरट्यात एकमेकांवर दाटीवाटीने बसलेली पिल्ल पाहताना फार मज्जा वाटायची .त्यांचा नाजूकसा चिवचिवाट फारच आनंदायी होता. दिवसेदिवस घरटे पारदर्शी झाल्याने लांबूनच त्यांच्या हालचाली दिसत होत्या. एक दिवस सकाळी सकाळी एक पिल्लू घरट्याबाहेरच्या फांदीवर दिसले, घरट्यात डोकावले तर फक्त दोन शिल्लक होती. एक पिल्लू कुठे गेले असेल विचार करत असताना शेजारच्या फांदी दिसले. ऑफिसला झालेला उशीर यांचे घरट्याबाहेर पहिल्यांदा झालेले दर्शन यात काही सुचत नव्हते, दोघे बहिण-भांवडे त्यांचे फोटो काढत होतो. आई म्हणाली कामाला जायचे नाही का ? पण आम्ही मात्र तो क्षण गमावू इच्छित नव्हतो.ते पिल्ल इतके माणसाळलेले होते की गोविंदनी हात लावायचा प्रयत्न केला तर एक पिल्लू त्याच्या हातावर येऊन बसले. दोन-तीन मिनिट तसाच हात ठेऊन उभा होता. पिल्लू परत फांद्यावर जायचे नाव घेत नव्हते, मग अचानक उडून फांदीवर बसले आणि एकएक करत सगळे घरट्याच्या बाहेर आले. 
मला ऑफिसला उशीर झाला म्हणून निघून गेले तसे इकडेही सगळे आपआपल्या प्रवासाला लागले . घरी आल्यावर कळले की  दुपारपर्यंत होती आजूबाजूला आता मात्र दिसत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला पण फक्त लांबून आवाज येत होता ती पिल्ल मात्र दिसेनाशी झाली .... 


त्यांचे आम्हीही संरक्षण करत होतो ,घराजवळ  कावळा , बाहीर ससाणा  दिसला उडून जावा अनेकदा प्रयत्न केले. त्यांना रोज हात लावायची इच्छा होत असे पण निसर्गात हस्तक्षेप नको म्हणून लांबूनच पाहून समाधान मानत असू , एक मात्र आनंद झाला की उडून जाताना त्या पिल्लांनी आमची इच्छा पूर्ण केली. एकवेळ तर त्यांना एखाद्या पिंजऱ्यात टाकून कायम आपल्याच जवळ ठेवण्याचा मोहही झाला होता मात्र त्यांचे खरे विश्व काय आहे याची कल्पना असल्यामुळे तसं काही केलं नाही . ते सगळे  आपल्या पंखावर हा आसमंत काबीज करायला कायमची उडून गेली . आता मात्र त्यांची काळजी नाही कारण ते  आपल्या स्वबळावर स्वता:चे रक्षण करायला सक्षम झाले आहेत . ...
या प्रसंगी  एक ओळ आठवते ..... आकाशी उंच झेप घे रे पाखरा .......




Tuesday, 9 August 2016

कारभारीण आहे खंबीर, आमचा मात्र निरोप घ्यावा

शेतकऱ्यांच्या कणखर स्त्रियांची गोष्ट 

माणसाचा पोशिंदा जगला पाहिजे. असे किती वाटत असले तरी देशातील परिस्थिती वाईट झाली आहे. हजारो शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र राज्यात यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. निसर्गराजा शेतकऱ्यावर नाराज होऊन रुसून पळून गेला की काय असे वाटत राहते. तीन- चार वर्ष सतत दुष्काळ, विहिरी,तलाव,तळी कोरडी पडायला लागली. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जायचं कुठ ? डोक्यावर कर्जाचा बोजा आणि डोळ्यासमोर पाण्याविना व्याकूळ झालेली जनावर. सगळं वातावरण कसं निराशामय झालाय . यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण त्याची कारभारीण मात्र खंबीरपणे आणि कणखरपणे या परिस्थितीत तग धरून आहे. कदाचित शेतकऱ्यापेक्षा जास्त दुख सोसत ती आज परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. उलट संकटाशी सामना न करता शेतकरी आत्महत्या करणे स्वीकारत आहे. त्याचवेळी ती या समाजातील वाईट नजरापासून ते रोजच्या पोटापाण्याचा समस्या एकटीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा महिलांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यांचा आढावा मांडणारा हा लेख. 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या आधारे शेतकरी आत्महत्येसाठी मुख्य कारणे म्हणजे दिवाळखोरी, कर्जाचा डोंगर, शेतीशी संबंधित विषय नापिकी, नैसर्गिक आपत्तीने संकट, गरिबी, कौटुंबिक समस्या, आजारपण आदी आहेत. ही कारण सरकार नोंदी  आहेत. या आत्महत्या करणाऱ्यांची संख्या पहिली तर २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे १३७५४ व ११७७२ जणांनी आत्महत्या केल्या. तर २०१४ मध्ये  ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. २०१५ मध्ये ही संख्या अजून वाढलेली आहे. जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या सगळ्या पुरुष शेतकऱ्यांनी केली. यात महिलांची संख्या अगदीच नगण्य आहे. पण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही उलट वाढतोय. पण आत्महत्या केल्यावर सरकार पैसे देतेय म्हणून काहीजण आत्महत्या करत आहेत असे मराठवाड्यात महिलांसाठी काम करण्याऱ्या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्तीने सांगितले. तिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण अजून माहिती घेतल्यावर कळलं की आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होत आणि उलट पैसेही मिळतात म्हणून आपल्या घरच्याला मिळतील पैसे या उद्देशाने हा आत्महत्या वाढत आहे.  यासंदर्भात एका शेतकऱ्याच्या पत्नीशी संपर्क केला. तिचा नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलल्यावर अनेक गोष्टीचा उलगडा झाला आणि सत्य परिस्थिती बाहेर आली. खरचं काहीजण असे करतात. पण शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाही तर वाढतात याची माहिती मिळाली. 

 आत्महत्या केली त्याची बातमी दिसते पण त्यानंतर काय? लेखाची माहिती गोळा करताना मात्र भयानक चित्र समोर आले. शहरातील लोकांना वाटते शेतकऱ्यांना काय पैसे मिळतात पण त्यांना किती पैसे मिळतात? ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. ते पैसे मिळवण्याचा प्रवास किती कठीण आहे याची जाणीव झाली. या सगळ्या परिस्थितीला शेतकऱ्याची बायको सामोरे जातेय. बऱ्याच वेळा एकटी असते ती, कशी सामोरे जाते हे तिच तिलाच माहिती. बारा विश्व दारिद्र्य आणि भविष्याची चिंता खायला तीन –चार तोंड या सगळ्यातून जगायची प्रेरणा कुठून आणते हा प्रश्न आहे. पण आई ती आई असते. काही झालं तरीही पोराबाळांना खाऊ पिऊ घालून संसारचा गाडा खंबीरपणे ओढते आहे. यासाठी तिला सलामच करायला हवा. 

मराठवाडातील एकल महिला संघटना ही संस्था अनेक वर्षपासून महिलांच्यासाठी काम करते. विशेषतः विधवा, परीतक्ता, घटस्पोटीत, प्रौढ कुमारिका अशा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, तसेच त्यांना न्याय आणि समता मिळावी म्हणून कार्य सुरु आहे. संस्थेत काम करणारी लक्ष्मी वाघमारे हिच्या मते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांचे प्रश्न दिवसेदिवस वाढू लागले आहेत. एक तर या महिला आयुष्यभर ‘चुल मुल’ यामधून बाहेर पडलेल्या नसतात आणि घरचे पुरुष पडूही देत नाहीत पण अचानक नवऱ्याने आत्महत्या केली की सगळी लढाई तिला एकटीने लढावी लागते. घरच्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी तिलाच पाहाव्या लागतात. यामुळे  आयुष्याचा जोडीदार सोडून गेला याचं दुख करायला वेळ मिळत नाही. तरीही ती परिस्थितीला वैतागून आत्महत्या करत नाही किंवा धीर सोडत नाही लढत राहते. समाजाच्या वाईट नजराशी, दुष्काळच्या भयाण वास्तवाशी, नातेवाईकांच्या टोमणाशी आणि कधीतरी स्वत:शी स्वत:ची  असलेली लढाई लढत असते. 

अगदी कोवळ्या वयात बोहल्यावर चढलेली ती पोरगी, चांगलं –वाईट कळेपर्यंत दोन पोरांची आई झालेली असते. पुर्वी आजारपण किंवा अन्य कारणांनी विधवा झालेल्या नशिबाला दोष देत पण आता या शेतकऱ्यांच्या विधवांनी कोणाला दोष द्यावा? असा प्रश्न पडतो. आपला नवरा आपल्याला संकटात एकटा सोडून गेला याचा राग येतो त्यांना, मी त्याचा संसार का सांभळू असा प्रश्नही पडत असला तरी त्याचे आई- वडील, बहिण- भाऊ, आजी –आजोबा आणि स्वतःची मुले यांची सगळ्यांची जबाबदारी विलया पेलत असते. सरकारकडून मिळणारी मदत मिळवण्यासाठी तिला घराबाहेर जावं लागत. घराबाहेर न पाडलेल्या स्त्रीला एकटीला कोणी उभं करत नाही. या कामासाठी कोणाची मदत घ्यायची तर त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागतो. जर दिला नाही तर अर्धा पण हिस्सा मिळत नाही. म्हणून मन मारून अर्धा हिस्सा त्याला देऊन मिळणाऱ्या पैसेची वाट पाहते. येणाऱ्या पैश्यात घरातलेच हिस्सेदार होतात तेव्हा मात्र मन घट्ट करून परिस्थितीला लढा देण्याशिवाय उपाय नसतो. एकदा का पैसे मिळण्याची आशा दिसली की पहिले घरातील नातेवाईक हिस्सेदार म्हणून उभे राहतात त्याच्यावर आमचीही जबाबदारी होती म्हणून हिस्सा मागतात. अशा काही प्रकारामुळे येणारे पैसे रखडतात. हिस्सेकारी वाढले की येणारी रक्कम स्वत:च्या कुटुंबाला उशिरा आणि कमी मिळते तसेच सावकाराच भूत मानगुटीवर बसलेले असते. कधी कधी सावकाराच्या वागण्यावरून हा माणूसच आहे का असा प्रश्न पडतो. पण तिला सावकाराचे कर्जही फेडल्याशिवाय उपाय नसतो. कर्ज फेडण्यासाठी मात्र कोणी हिस्सेकारी नसतो .  कोणी नातेवाईक मदत करत नाही. उलट पैसे मागायला येऊ नये म्हणून अंतर ठेऊन वागतात. 

स्त्री ही जास्त सहनशील असते. असे आपण नेहमी म्हणतो पण संकटाकाळात ती ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळते. यावरून तिच्या सहनशीलता आणि कणखर वृत्तीचे दर्शन होते. असेच काहीसे दृश्य मराठवाड्यात पाहायला मिळते. नवऱ्याने आत्महत्या केल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.तरीही मुलांचा विचार करून परिस्थितीशी लढत असते. संस्था सरकारी योजनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते पण अनेक कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे तिला फायदा मिळत नाही. तसेच जमीन ,घर पतीच्या नावावर असल्यामुळे तिला ही मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी ती पहिल्यांदा सरकारी लालफितीत अडकते . तिथून बाहेर काढणारे त्याचा चांगला दाम पण घेतात. अशा अनेक पाळतीवर संकटांशी सामना करत ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी न थकता, निराश न होता चालत राहते. 
अशाच एका आईची व्यथा बीड मधील आंबेवाड गावातील २५–२६वर्षीय मनीषा तिकडे हिच्या नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलताना जाणवले की तिला नवऱ्याचा राग येत होता, फक्त एक –दीड लाखासाठी त्याने आत्महत्या करावी असा प्रश्नही सारखा सतावत होता. तसेच वाईट पण वाटत होते. कर्ज काही फार जास्त नव्हते पण आता माझ्या पोराबाळांना होणार त्रास त्या कर्जापेक्षा लाखो पट्टीने जास्त आहे, हे जाणवते होते. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवच रान करावं लागतंय, पण पाऊस-पाणी म्हणून काम नाही, काम नाही म्हणून पैसा नाही म्हणून सगळं कसं दुष्टचक्र बनलाय, अशी एकूण परिस्थिती. ती पुढे बोलताना म्हणाली “तो मला आणि माझ्या पोरांना सोडून गेला पण आमचा विचार केला नाही. आता मी पण तसचं केल तर ? पण पोराकडे बघून जगते. ताई माणस (पुरुष )पुढचामागचा विचार करीत नाहीत. त्यांच्यानंतर हा उघड्यावर पडलेला संसार कसा सांभाळायचा ?असा प्रश्न जगू देत नाही आणि मरू पण देत नाही.” आपल्या जीवनाची चित्रकथा मांडताना तिने सांगितले की शेतात काम करताना नवऱ्याच्या डोळ्यांना काहीतरी लागले होते, त्याची शस्त्रक्रिया करायला ३०-४० हजार खर्च झाले. शेतीसाठी सावकारकडून १ लाख घेतले होते. दुष्काळामुळे पीक नाही आले आणि कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे नवरा लय काळजी करायचा. तेव्हा मी त्याला सांगायचे की “कर्ज काय राहत असत व्हाय, आज ना उद्या फिटेल की कशाला काळजी करता” पण त्यांनी एक दिवस न सांगताच आत्महत्या केली मागे फक्त एक पाच वर्षाचा व दुसरा आठ वर्षाचा मुलगा आणि कर्जात अखंड बुडालेला संसार राहिला. दोन दिवस रडायला लोक आली, आज कोणी विचारत पण नाही , सरकारने मदत दिली पण ७५ % रक्कम पाच वर्षासाठी पोस्टात टाकली. हातात उरले तीस हजार  नाम संस्थेने १० – १२ हजार दिले पण एवढेसे पैसे कुठवर पुरणार? आता रोज सकाळी आज काय खायचं यांची चिंता पडते. मजुरीला जाते पण कधी आहे तर कधी नाही असा सगळा प्रकार. चार दिवस लोक आले वाईट वाटत म्हणून पोराकडे पाहून निघून गेले. आज पोरगा दिवसभर रडत बसला तरी कोणी पाहत नाही. पोरांना सगळ कळतंय आपला बाप असत तर ही हाल झाली नसती. त्यांना कोण समजवणार तुमचा बाप संकटाशी न लढता निघून गेला. त्याने धीर सोडला.  पण मी नाही सोडला आणि सोडणार पण नाही. पोरांना शिकून मोठ्ठ करणार. आज पाऊस नाही म्हणून काय झालं अर्ध्या भाकरीवर जीवन काढू, पुढच्या वक्ताला येईल की पाऊस मग करीन पोराची हौस-मौज. 

संस्था अशाच काही महिलांना रोजगार मिळावा म्हणून कार्य करते. यातून काहीजणी मशीन शिकून आणि बचत गटाच्या माध्यमातून जीवन सुधाण्यासाठी पुढे सरसावल्या आहे. आता गरज आहे शेतकऱ्यांनी समजण्याची की संकटाना सामोरे जाण्याची आणि कारभारीण कणखर आणि खंबीर आहे म्हणून तिला एकट सोडून न जाण्याची. सरकारने या विधवा आत्महत्या केल्यावर पैसे देण्यापेक्षा आत्महत्या करू नये म्हणून काम करावे. 

एक विनंती : पाऊसपाणी नाही म्हणून दुष्काळ पडतोय हे मान्य आहे सावकारच, सरकारच कर्ज , पोरीचं लग्न आणि अजून बऱ्याच अडचणी आहे पण याच दु:ख तर घरातील स्त्री- पुरुषांना, नवरा- बायको असो आई –मुलगा या सगळ्यांना सारखं आहे मग आत्महत्या करताना पुरुष का आघाडीवर आहेत ? स्त्री म्हणून तिलाही या सगळ्या गोष्टीचं समान दु:ख आहे. ती परिस्थितीशी लढा देत आहे. ती सहनशील म्हणून तिच्यावर तुमच्या संसारच ओझं टाकून तिला असं अर्धवट वाटेत सोडून जाऊ नका. 


(स्त्रीसक्षमीकरण पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेला  लेख -एप्रिल २०१६)







Monday, 8 August 2016

सिर्फ नाम ही काफी है- डॉ. कलाम सदैव प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व


 'सिर्फ नामही काफी है' असं म्हणतात. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबाबतीत असंच आहे. डॉ. कलामराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीची उत्सुकता वाढू लागली. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बुक लव्हर ग्रुपचा एक प्रोग्राम होता, त्यावेळी मी त्यांच्या एका पुस्तकाविषयीचे मत मांडले होते. त्यामुळे डॉ. कलाम यांची फक्त राष्ट्रपती अशी  ओळख आहे यापेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे शास्त्रज्ञ आणि लहान मुलांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व अशी झाली. सकाळ वृत्तपत्रानं शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात माझा भाऊ गोविंदची निवड झाली होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम आले होते. लहान मुलांशी मनसोक्त संवाद साधून कोणाच्या डोक्यावर हात, तर कोणाशी हस्तांदोलन करुन आपलंसं केलं. त्यात गोविंदही होता. त्यानं ही आठवण सांगितल्यावर तर मला त्यांना भेटण्याची इच्छा अधिकच बळकट झाली. त्यानंतर वानवडीतील अपंग शाळेच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं समजलं आणि आम्ही  त्यांना पाहायला जायचं ठरलं. पण कसं भेटणार, असा प्रश्न मनात होताच. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी जाताना घराजवळील मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला होता. चौकशीअंती राष्ट्रपती या रस्त्यानं वानवडीला जाणार असल्याचं समजलं मी आणि माझा भाऊ राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट पाहू लागलो.
काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रपतींचा ताफा समोरून जाऊ लागला त्यात  दोन तीन मोठ्या काळ्या गाड्या आल्या , त्याचवेळी आमच्या सोबत प्रतीक्षा करत असलेल्या शाळेतील मुलांनी हात वर करून टाटा करत असल्याचा इशारा केला. नकळत आम्हीही त्यांना साथ दिली. आश्चर्य म्हणजे चक्क एका गाडीतून एका व्यक्तीनं प्रतिसाद दिला. काळ्या काचेतून धूसरशी दिसणारी ती व्यक्ती डॉ. कलाम होती. कलामसाहेबांनी आम्हांला टाटा केल्याचा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर पुन्हा वानवडीला त्यांना भेटायला जायचं ठरलं. त्या कार्यक्रमाचे पास नव्हते तरीही जायचं ठरले. निदान बाहेर उभा राहून भाषण ऐकता येईल म्हणून मी, भाऊ, मावसबहीण असे सगळे सायकलीवर निघालो. वानवडी चार ते पाच किलोमीटर अंतर लांब होती , म्हणून भरभर सायकल चालवत आम्ही वानवडीत पोहचलो पाहतो तर काय सगळीकडे कडक बंदोबस्त होता. काहीतरी कारण सांगून अपंग शाळेजवळ पोहचलो. तरीही 200 मीटर अंतरावर थांबवलं. त्यामुळं आम्ही तिथं पोहचताच 10 मिनिटांनी राष्ट्रपतींचा कार्यक्रम संपला. गाडीत बसण्यासाठी म्हणून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून किंचितस दर्शन झालं. आम्ही धन्य पावलो. मला दिसले मला दिसले  म्हणत पुन्हा घराकडे गेलो. त्यांना भेटायची अजून इच्छा निर्माण झाली.

पुढे पत्रकारिता शिक्षण घेण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्य वृतीच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं कळलं. माझा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांना समोरासमोर पाहायला मिळणार म्हणून आणि घरचे खूप आनंदी होतो. कार्यक्रमाच्या दिवशी आई आणि मी हॉटेल ब्लू डायमंडला पोहचलो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं हॉटेल पाहून डोळे दिपले. ज्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती तो क्षण आला. महामहीम कलामसाहेब याचं आगमन झालं,त्यांना डोळे भरून पाहिलं. शिष्यवृत्ती मिळालेल्या अनेक मुली होत्या. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते शिष्य्वृतीचं वितरण सुरु होतं. मनात एक भीती होती, माझी भेट होईल ना. तेवढ्यात माझं नाव पुकारलं मी पुढे जाऊन उभी होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर उभी राहण्याची संधी मिळाली होती. शिष्यवृत्ती स्वीकारताना त्यांनी माझी चौकशी केली. पदवीला कोणता विषय होता असे विचारले ?बँकिंग विषय असल्याचं बोलले तेव्हा, 'वेरी गुड, कीप इटअप! या विषयात काम करण्याची गरज आहे, 'असं बोलले.
  त्यांच्या या दोन वाक्यांनी आणि सोबत काढलेल्या फोटोनं माझ्यात एक नवा उत्साह संचारला. त्यांनी दिलेला संदेश कायम लक्षात ठेऊन कामाला लागले, 'देशभक्त होण्यासाठी देशाच्या सीमेवर लढायला जायची गरज नाही; फक्त आपलं काम प्रामाणिक आणि व्यवस्थित करा व आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिक्षित करा. नाही जमले तर आपल्या आई वडिलांना शिकवा. आणि नेहमी विद्यार्थी म्हणून राहा खूप मोठे व्हाल. 'त्यांच्या या संदेशानं माझ्या जडणघडणीत अनेक सकारात्मक बदल झाले. असा हा अवलिया कायमच माझ्या स्मरणात राहील.
माझ्या आयुष्यात मला जे काम करायचे होते ते करायला मिळाले नाही तेव्हा फार नाराज होते पण  कलामसाहेब यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन मी पुढे वाटचाल सुरु ठेवते. 

स्वप्न खरी होतात याचा प्रत्यय तुम्हाला भेटल्यावर आला. कोटय़ावधी ह्रदयांचे प्रेरणास्थान, राष्ट्राचा खरा रिअल हिरो, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत, राष्ट्राची खरी शान असणारा, राष्ट्रासाठी जगणारा आणि या राष्ट्राला 2020 व्हिजन देणारा महामानव यापेक्षा  खऱ्या अर्थाने दुरदृष्टी असलेला नेता. अशा नेत्याला आयुष्यात एकदा भेटायचं असं स्वप्न मी ही पाहिलेलं, एक दिवस प्रत्यक्षात उतरलं .विश्वास बसत नव्हता पण त्यांच्या हस्ते माझ्या दुसर्या स्वप्नाची मुुर्हूतमेढ होत होती. राष्ट्रपती या सर्वाच्च पदावर अत्यंत साधी राहणी, कुठलाही मेकअप नसताना चेहऱ्यावरील तेज, प्रेरणादायी बोलणे तुमच्याविषयी लिहीताना शब्द अपुरे पडत आहेत.

तुमची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागणार आहेत.आंबेडकर, टिळक, सावरकर, आगरकर आणि महात्मा गांधी किंवा भगतसिंग यांच्यासारखे अनेक देशासाठी लढणारे आम्ही पाहिले नाही पण देशाला योग्य दिशा देणारे कलामसाहेब पाहिले, यामुळे आमची पिढी खूप भाग्यवान आहे. आजच्या वातावरणावरून पुढच्या काळात तुमच्यासारखे खरे आदर्श व्यक्ती पाहायला मिळतील याबाबत मला शंका वाटते.
तुम्ही आयुष्यभर प्रेरणादायी राहाल यात काही शंका नाही. 

Saturday, 6 August 2016

देवदूताने एकादशीचा जीव वाचवला ......

काल आमच्या इंदीचा वाढदिवस होता. ही इंदी म्हणजे आमच्या गाईचे वासरू इंद्रायणी. हा ब्लॉग लिहिण्याचे कारण की एका वर्षापूर्वी तिच्या जन्मानिमित्त अचानक दोन दोन देवदूताची भेट झाली.त्यांनी आम्हांला जी काही मदत केली त्यामुळे काल आम्ही इंदीचा वाढदिवस साजरा करू शकलो. फार काही विशेष केलं नाही पण यानिमित्त त्या देवदूतांची फार आठवण आली. तिला आणि तिच्या आईला म्हणजे एकादशीला वाचवणारे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका हाकेवर आमच्यासाठी धावत आले. त्याचे पद आणि त्याचे शिक्षण कशाचाही गर्व न करता हे डॉक्टर आपल्या पेशाला प्रामाणिकपणे निभावणारा हे देवदूत म्हणजे डॉ.अनिल आणि त्यांचे मित्र डॉ. तेजुरकर.

अगदी बरोबर एक वर्षापूर्वी २१ ऑगस्टला दुपारी बाराची वेळ असेल, घरातील काम सुरु होते. तेवढ्यात आई अचानक आली आणि म्हणाली “एकादशी प्रसूतीकळा देतेय आज नक्की डिलिवरी होणार.” डॉक्टरला फोन लावला तर ते अलिबागला गेलेले होते. आता काय करायचं ? असा प्रश्न पडला. गाईची डिलिवरी कशी होते ? काय काळजी घ्यायची याची फार माहिती नव्हती. डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातील तारीख दिली होती म्हणून आम्ही निवांत होतो. पण अशा अडचणीच्या वेळी डॉक्टर गावी गेले तर कोणाला बोलवावं ते कळेना, गावात सगळ्या अशा गोष्टी कशा हाताळायच्या ते माहिती असते. पण शहरात कोणालाच काही माहित नसतं, जवळपास गोठाही नाही, आम्ही सगळेजण टेन्शन मध्ये होतो. या गडबडीत एक सुंदर आणि गोंडस वासरू या जगात येत होत. ते छोटेसे वासरे पाहून आमचा सगळा तणाव पाण्यात साखर विरघळावी तसा निवळला होता पण आनंदावर विरजण पडले आणि गाईचे डिलिवरी होताना तिचे आतडे बाहेर पडले. तिची ही पहिलीच वेळ. कोणी अनुभवी माणूस नाही. आमची नुसती तारांबळ उडाली. बाबाच्या एका मित्राला बोलवायला कोणी तरी गेलं पण त्यांना येण्यासाठी उशीर झाला तोपर्यंत गाय वेदनेने सैरवैर करत होती. बाबा तिचे आतडे हातात घेऊन गाईच्या मागे धावत होते. आतड्याचे वजन ३०-४० किलो असेल किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे असेल. वेद्नेपुढे तिला काही कळत नव्हते म्हणून नुसती पळत सुटली होती, बाबा तिच्या मागे पळून पळून दामले होते. डॉक्टरांनी फोनवर जवळ कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलवा असे सांगितले पण जनावरांचा डॉक्टर वेळेवर काही केल्या सापडेना. यामुळे आमची फजिती होणार असे लक्षात आले. वारंवार फोन केल्यावर आम्हांला कोणी डॉक्टर भेटले नाही तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा नंबर देता का ? असे विचारल्यावर एका डॉक्टरचा नंबर दिला त्या डॉक्टरानी मला जमणार नाही असे सांगितले तर अजून एकजण म्हणाला “आलो तरी अशा वेळी काही करता येत नाही, ते आतडे आत जाईल का प्रयत्न करा ते गेले तर ठीक नाहीतर काही खरे नाही.” मग आमचा धीर सुटत चालला होता, आम्ही प्रयत्न करून ते आतडे गाईच्या शरीरात टाकत होतो पण गाय तिला होत असलेल्या वेदनेमुळे कळा देऊन आत गेलेले आतडे बाहेर टाकत होती. यावेळी मात्र गायची ताकत एखाद्या हत्तीसारखी वाटत होती . या अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे कसे जायचे समजत नव्हते. आज इंदी एका वर्षात तिच्या आईसारखी दिसत आहे पण त्यावेळी मात्र दोघी मायलेकी वाचतात की नाही असे वाटत होते.

 अचानक लक्षात आले की शेजारी रेसकोर्स आहे तिथे घोड्याचे डॉक्टर असतील. मी गाडी काढली शेजारच्या रेसकोर्सला पोहचले तेव्हा कळाले डॉक्टर तर दुसऱ्या रेसकोर्सला असतात तिकडे गेले तर तीन –चारी गेट फिरल्यावरही डॉक्टर काही भेटेना. मग रखवालदाराला परिस्थिती सांगून विनंती केली त्यांनी सांगितले छोटे डॉक्टर काही माहिती नाही पण आत मोठे डॉक्टर बसलेत. मी धावत दवाखान्यात गेले आणि समोर बसलेल्या डॉक्टर त्यांनाच सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी विचारलं “ तुमचा डॉक्टर कुठे ?” ते बाहेरगावी गेले म्हणूनच तुमची मदत हवीय अशी मी विनंती केली. त्यांनी लगेच एकजणाला गाडी काढायला सांगितली “सगळं समान घे बोलले “. माझा तर विश्वास बसेना. मी पुढे पुढे आणि डॉक्टरची गाडी मागे , हे दृश्य पाहून रेसकोर्समधील लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते, त्या दिवशी सुट्टी होती म्हणून माझा अवतार फार बिघडलेला होता म्हणून लोक अधिक बघत ही कोण? रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉक्टर का हिच्याबरोबर जात आहेत. असा प्रश्न त्यांच्या तोंडावर दिसत होता. पण घरी सगळं ठीक असावं अशी प्रार्थना करत होते. इतक्या लांबून डॉक्टर घेऊन जाते पण .... असा मनात उगाच शंका येत होती. अगदी ३-४ मिनिटांच अंतर कोसभर वाटू लागले. मी डॉक्टरांना घेऊन आले आहे हे पाहून आई-बाबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

डॉक्टरांनी घरी पोहचताच कामाला सुरुवात केली, अंगावर किती महाग कपडे आहेत याची काळजी न करता त्या मातीत आणि चिखलात गाईचे उपचार सुरु केले. पुढील अर्धा- एक तास नुसती पळपळ सुरु होती. गाई पळून पळून दमली होती. ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती आणि अजून वासराला दुध ही पाजले नव्हते. त्याला जवळ घेणे तर लांबच होत. डॉक्टरानी आपले काम सुरु केल्यामुळे आमची नुसती बघ्याची भूमिका उरली होती. ते डॉक्टर घोड्यावर उपचार करत असल्यामुळे गाईची ही परिस्थिती त्यांच्या हाताबाहेरची आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गायीला भुलीचे इंजेक्शन देऊन शांत केले. आणि त्यांचा खास मित्र आणि गाईचा विशेषज्ञ डॉ. तेजूरकर त्यांना फोन केला आणि लवकर ये सांगितले. इकडची सगळी परिस्थिती सांगितली. डॉ. तेजुरकर उरुळीकांचनला होते पण मित्राचा फोन आला म्हणून ते डॉक्टर येण्यासाठी तयार झाले. पोहचण्यासाठी एक तास लागणार होतो. तोपर्यंत गाईने हिंमत सोडू नये असे वाटत होते.

डॉक्टराला सगळी परिस्थितीची माहिती असून ते आम्हांला धीर देत होते. सगळं ठीक होईल. तो एक तास आम्ही युगासारखा काढला. तोपर्यंत वासरू डोळे उघडून आईकडे पाहू लागले. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होते पण आईचा स्पर्श आणि दुधाशिवाय ते शक्य नव्हत. आमचा जीवही त्यांच्याबरोबर तुटत होता पण काहीच मार्ग नव्हता. डॉक्टरानी शक्कल लढवली की गाईचे झोपलेल्या अवस्थेत दुध काढून पिलाला द्यायचे आणि तसं केलंही त्यामुळे  १०-१५ मिनिटात वासरू उभं राहिलं. त्यावेळी आम्ही आनंद आणि दुख एकत्र अनुभवत होतो.

तेवढ्यात डॉ. सावंत आले, आम्ही त्यांनाही आम्ही फोन केला होता. त्यांनी परिस्थिती पाहून प्रयत्न करू बोलले आणि काम सुरु केले. ते ज्या प्रकारे गायीला इंजेक्शन देते होते ते पाहून डॉ. अनिल आणि सोबत आलेले डॉ. म्हणाले की जनावर असले तरी तय्ना जीव आहे जरा जपून प्रेमाने द्या. असे तर दुसऱ्या देशात केले तर तुमची पदवी काढून घेतील. यामुळे ते दोघे किती संवेदनशील डॉ आहेत याची जाणीव झाली. डॉ. सावंतचा अनुभव परिस्थिती सांभाळायला कमी पडत होता, त्यांना जमणार नाही हे लवकरच लक्षात आले. मग काय करावे सुचत नव्हते,तेवढ्यात एक गाडी वाजली, डॉ. तेजूरकर आले. वाऱ्याच्या वेगाने आले त्यांनी २० -३० मिनिटात जी काही मेहनत घेतली त्यावर आम्ही सगळे आवक झालो. कामाचा वेग, कामाचे ज्ञान आणि मेहनत यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे डॉ. तेजूरकर. अक्षरशः धावत येऊन अंगावरील शर्ट काढला आणि कामाला लागले मित्राला नीटसे बोललेही नाही. लगेच त्या चिखलात बसून उपचाराला सुरुवात केली. वारा लागल्यामुळे आतडे सुजले होते, डॉक्टर जीवानिशी प्रयत्न करून गायीच्या शरीरात आतडे बसवत होते पण गाईला होणारा त्रास त्यामुळे ती बाहेर काढून टाकत या सगळ्या प्रकारामुळे एकादशीचे मोठ्या प्रमाणत रक्त वाया गेले. त्यामुळे ती फार अशक्त झाली होती. तिने प्रयत्न सोडायच्या आत सगळं ठीक व्हावं म्हणून आम्ही देवाचा धावा करत होतो पण खरतरं दोन दोन डॉक्टररुपी देव आमच्या गाईला वाचवत होते. अखेरीस गायीच्या शरीरात सगळे आतडे बसवून त्याला टाके टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. याच दरम्यान तिला सलाईन दिले जात होते म्हणून तिला थोडीशी ताकत मिळाली. या ताकतीने तिने टाके तोडू नये असे डॉक्टराना वाटत होते. या सगळ्यात आमची एकादशी अर्धमेली झाली होती. अशक्तपणामुळे जमिनीवर निपचित पडली होती. अर्धा तासांनी तिला शुद्ध आली ती वासराकडे पाहू लागली. वासरू तिच्याकडे जातच तिन्हे पान्हा सोडला आणि आम्ही सुटकेचा श्वास ....


अशा प्रकारे दोन देवदूतांनी आमच्या एकादशीचा आणि इंद्रायणीचा जीव वाचवला. डॉ. अनिल यांनी उपचाराचे आणि आणलेले साहित्य कशाचेही पैसे घेतले नाहीत. फक्त डॉ.तेजुरकारांची फी द्या. अजून काही साहित्य हवे असेल तर सांगा पाठवून देतो असे म्हणाले. या सगळ्या गडबडीत आम्ही रेसकोर्समधून आलेल्या डॉक्टरच नावं विचारयचं राहून गेलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विचारले या डॉ.चे नाव काय ? तेव्हा त्याने सांगितले की हे रेसकोर्समधील सर्वात मोठे डॉक्टर आहे त्यांना सगळे नाव डॉ. अनिल म्हणतात.अधिक चौकशी केल्यावर कळाले की रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉ. आहेत. एवढे मोठे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका विनंतीवरून आमच्या गायीसाठी आपले काम सोडून आले. याचे आम्हांला फार आश्चर्य वाटत होते. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आपल्या पेशाविषयी असलेला आस्था दिसत होती. 

आम्ही त्यांचे आभार मानत असतात त्यांनी सांगितले धन्यवादची काही गरज नाही हे तर  माझे कर्तव्य आहे. मी डॉक्टर आहे जर एखादे जनावर अडचणीत असेल तर त्याला मदत करणे माझं कामच आहे. मग तो रेसकोर्समधला घोडा असो वा तुमची गाय. डॉ. गेल्यावर आम्ही देवाचे आभार मानू लागलो की वेळेवर जर डॉ आले नसते तर आम्ही एकादशी आणि इंदी गमवून बसलो असतो. डॉक्टराच्या उपकाराने आम्ही भारावून गेलो होतो.


आणि एकादशी आणि इंद्रायणी या मायलेकींचा संगम पाहतच राहिलो.












Friday, 29 July 2016

सुपरवुमन रोहिणी कावडे मांगलेकर : नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा !

नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा : रोहिणी कवाडे मांगलेकर

लहानपणापासून चार भावंडामध्ये रोहिणीला अभ्यासात मध्यम गती होती. तरीही वडिलांना मात्र रोहिणी सर्वांपेक्षा वेगळी आहे असे वाटत होते. दहावीनंतर कॉमर्स घ्यायला निघालेल्या रोहिणीनी वडिलांच्या सांगण्यावरून मॉकनिकल इंजिनिअरच्या डिप्लोमाला ऑडमिशन घेतले. खूप अभ्यास करून उत्तम मार्कांनी डिप्लोमा पूर्ण केला. कॉलेज झाल्यानंतर निलेश मांगलेकर यांच्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. तिथे एका कंपनीत नोकरी करीत असताना मार्केटिंग काम जवळून पाहत आले. पुढे काही दिवसांनी पतीची बदली दिल्लीला झाली तेव्हा त्यांच्याच कंपनीत रोहिणी मार्केटिंगमध्ये रुजू झाल्या. तिथे सॉंफ्टवेअर मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना विक्रीचा चांगला अनुभव मिळाला. काही काळ काम केल्यावर पती-पत्नीला मातृभूमीची त्यांना  आठवण येत होती तसेच दोघेही कामात फार समाधानी नव्हते. तेव्हा मात्र स्वत:चे काहीतरी करू असा विचार करून नोकरी सोडून कोल्हापूरला आले.
पुण्यात अनेक आय टी कंपन्या आहेत म्हणून त्यांनी कोल्हापूरला काम सुरु केले. स्वत: पती –पत्नी आणि एक नोकर तसेच काही तुटपुंजी गुंतवणूक यावर काम सुरु करण्यात आले. आज त्यांच्याकडे चाळीस कर्मचारी असून पुणे , कोल्हापूरला असे दोन ऑफिस आहेत. तसेच अन्य काही जिल्ह्यात जसे सांगली , सातारा त्यांची कामे सुरु आहेत. सुरुवातीच्या काळात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रोजेक्टसाठी सहकार्य करणे. तसेच सामन्य लोकांना आयटी सर्व्हिस देणे सुरु केले. त्यांनी आय टीच्या विविध क्षेत्रात काम सुरु होते. त्याचवेळी लक्षत आले की कोल्हापूरला रिवर्स इंजिनिअरिंग मध्ये सर्व्हिस देणारी कंपनी नाही .तेव्हा कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची सर्व्हिस देणारी त्यांनी पहिली कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी मशिनरी घेतली. फक्त तीन लाख गुंतवणूक केलेल्या त्या कंपनीचा आज दोन कोटी टनओवर झाला आहे.
रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये चांगला जम बसल्यावर त्यांनी बाकीच्या सर्व्हिसकामे आणि मुलांचे प्रशिक्षणवर्ग बंद केले. कारण प्रशिक्षणवर्ग संध्याकाळी असायचे त्यामुळे रात्री उशीरपर्यंत काम करावे लागत असे. पुन्हा सकाळी ऑफिस आणि संध्याकाळी प्रशिक्षणवर्ग यामुळे कामाचा प्रचंड ताण जाणवत असल्यामुळे प्रशिक्षणवर्ग बंद करून पूर्ण वेळ रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये लक्ष द्यायचे ठरवले. कोल्हापूरला काही कंपन्या बाहेरून सर्व्हिस घेत असत . अनुभवी लोक नसल्यामुळे अनेक सर्व्हिसेस आउटसोर्स करत होते तेव्हा रोहिणीताईच्या कंपनीने त्या कंपनीला आत्मविश्वास दिला की आउटसोर्स करण्यापेक्षा आम्ही तुमची कामे करून देतो. उत्पादन आणि इंजिनिअरिंग संदर्भातील अन्य कामे रोहिणीताईच्या कंपनीने करायला घेतली. यामुळे त्यांच्या कामाने वेळ घेतला. आणि कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाले .
त्यांना नेहमी वाटायचे की आयटी क्षेत्र खूप वाव आहे, पण काही करायला संधी मिळत नव्हती. दोन वर्षापूर्वीपासून देशात आयटी क्षेत्राला चांगले दिवस आले तेव्हापासून त्यांनीही मात्र या क्षेत्रात उतरायचे ठरवले. आतापर्यंत जे काम करत होत्या त्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांनी पुण्यातील एका संस्थेशी भागीदारी करून ‘श्रीनेम टेक्नोलॉजी’ नावाने कंपनी सुरु केली त्याअंतर्गत सर्वसामान्य लोकांना आयटीशी निगडीत समस्यावर उपाय उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी   मोबाइल ऑप्लिकेशन बनवणे, सेल्स, ट्रेनिंग, आणि गरजेनुसार त्यांना सुविधा पुरविणे अशा रीतीने कंपनीचे काम सुरु आहे.

रोहिणीताईला स्वत:ला सेल्समध्ये जास्त रस आहे म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केले तरीही त्यात काही रमल्या नाही. एक बिजनेसमॉन म्हणून त्या स्वत:ला जास्त सक्षम मानतात. त्यानुसार कामही करतात. म्हणूनच पाच वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली आहे. आर्थिक समस्यावर मात करून त्यांनी आज स्वता:ला सिद्ध केले आहे. एक शांत व लाजाळू मुलगी ते आज एक बिजनेसवूमन असा प्रवास करताना त्यांच्यात अनेक बदल झाले. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक उंची वाढली म्हणूनच त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत.  


Tuesday, 19 July 2016

कलेला वाहून घेतलेल्या कन्याकुमारी भोईटेची उंच उभारी !

स्वप्न पहा पण त्यावर विश्वास ठेऊन, त्याला कृतीची जोड दिली तर तेच कार्य जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. त्यावर निष्ठा ठेऊन आणि वेळ दिला की ते स्वप्न प्रत्यक्षात उतरते. या उक्तीप्रमाणे कन्याकुमारी भोईटे आयुष्य घडत गेले.
सोलापुरातील एका सुशिक्षित कुटुंबात कन्याकुमारीचा जन्म झाला. अगदी मुक्त वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासून त्यांची कलेकडे ओढ होती. त्यामुळे कागदी फुले, पॉट पेंटींग, आणि विविध प्रकारचे कलाकुसरीच्या वस्तू बनवत असे. वाढत्या वयानुसार कलेची कल्पकता वाढत गेली. यामुळे त्यांना अशा विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा छंद जडला. त्यामुळे त्या आपली कला जोपासण्यासाठी बाजारातून विविध वस्तू खरेदी करत असत. सतत नवीन काहीतरी बनवायचं आहे यासाठी प्रयत्नशील असत. या सगळ्यामध्ये त्यांनी नियमित अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केले नाही. कॉलेजमध्ये असताना त्यांनी पुष्पगुच्छ करण्याची कला शिकल्या. यामधून त्यांना एक वेगळी दृष्टि मिळाली. निसर्गातील विविध वस्तू वापरून त्या कलाकुसरीच्या वस्तू बनवू लागल्या. अगदी सुकलेली पाने-फुले जे मिळेल त्यामध्ये आपली कला शोधत असे. अनेक प्रदर्शनात त्यांनी आपली कला सादर केली. त्यामुळे त्यांना अनेक बक्षीस मिळाली. त्यांच्या कलेचे घरातल्यांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांना कौतुक होते. आपली कला जोपसताना त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी पूर्ण केली.

शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सोलापूरमधील एका महाविद्यालयात मायक्रोबायोलोजीच्या प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. या पदावर त्यांनी आठ वर्ष काम केले. या दरम्यान त्यांनी पी.एच.डी.ला करायला सुरुवात केली. त्याच काळात त्याचे लग्न शिवराज भोईटेशी झाले. पती गोव्याला राहत असल्यामुळे त्या गोव्याला राहायला गेल्या. तिकडे एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करत असताना संसार आणि काम यामुळे त्यांना पी.एच.डी.चे लिखाण करायला वेळ मिळत नसे म्हणून त्यांनी काम सोडून पी.एच.डी.साठी पूर्ण वेळ द्यायचा असे ठरवले त्यानुसार त्यांनी पी.एच.डी पूर्ण केली. घरी बसून काही काम करता येईल अशा संधी त्या शोधू लागल्या.
एक दिवस त्यांच्या मैत्रिणीने त्यांना एक भेटवस्तू म्हणून क्लीलिंगचा सेट दिला. त्याच्याविषयीची उत्सुकता वाढल्यामुळे त्यांनी इंटरनेटवर क्लीलिंग कलेची माहिती मिळवली. त्यापासून विविध वस्तू बनवायची पद्धत त्या इंटरनेटवर शिकल्या. घरी विविध आकाराच्या वस्तू जसे फुले, आकर्षक डिझाईन बनवू लागल्या. त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून आणले आणि आणखीन काही वस्तू बनवल्या. इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन पद्धती शिकून त्यांना या कलेची गोडी निर्माण झाली. यामधून त्यांनी एक अत्यंत देखणी बाहुली बनवली. ती बाहुली नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीला खूप आवडली. तेव्हाच त्यांना या अशी एक अजून बाहुली बनून दे अशी मागणी आली.
आपली कला जगापुढे सादर करायची संधी शोधत असताना आय. टी कंपनीत या वस्तू विक्रीस ठेवू असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार पती व भाऊ यांच्यासमोर मांडला. दोघांचा होकार आल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली पण त्यांच्याकडे फक्त पंधरा दिवस शिल्लक होते. तरीही त्यांनी विविध वस्तू बनवल्या जसे थ्रीडी दिवे, मेणबत्ती, बनवल्या. या वस्तू विक्री करताना व्यावसायिक रीतीने त्याची पाकिंग करून त्यांचे कंपनीत प्रदर्शन ठेवले. कंपनीत भरपूर प्रतिसाद मिळाला. या कलेविषयीची आवड निर्माण झाल्यामुळे त्या आपल्या कामात नवनवीन संशोधन करून विविध वस्तू बनवू लागल्या. अशा प्रकारे एका कलेच्या माध्यमातून कन्याकुमारीचे आयुष्य बदलायला सुरुवात झाले. यामधून त्यांनी QuillEssence: सर्जनशीलता Curls "ची सुरुवात केली. नातेवाईक, आजूबाजूचे लोक त्यांच्या कामाचे कौतुक करत असे. तसेच त्यांचे पती त्यांच्या कलेचे कौतुक करताना आणखीन कसे चांगले करता येईल यासाठी प्रोत्साहन देत.
गोव्यात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु असताना कन्याकुमारी यांनी मेणबत्तीपासून संता पर्यंत अनेक वस्तू बनवून विक्रीसाठी ठेवल्या. याला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कन्याकुमारी यांनी बनवलेल्या वस्तू पणजीत जीसीसीसीच्या महिला विभागाच्या वतीने आयोजित अस्तुरी या प्रदर्शन ठेवल्या होत्या. प्रदर्शनात त्यांच्या कामाचे खूप लोकांनी कौतुक केले.त्यांचे हे पहिले व्यावसायिक प्रदर्शन होते. प्रदर्शनामुळे त्यांच्या प्रोडक्टला एक मोठे व्यासपीठ मिळाले. तसेच मागणीत वाढ झाली, लोकांच्या आवडीनुसार भेटवस्तू बनवून देऊ लागल्या. या प्रदर्शनामुळे त्यांना नवीन प्रेरणा मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रोज नवनवीन वस्तू बनवून पाहत असे. कॉडेल होल्डर, फोटो फ्रेम, वॉल फ्रेम, वॉल आणि डोर हॉगिंग, दागिने, डॉल, कॉपरेट गिफ्ट आणि आणखी खूप काही. त्यांच्या कामाचे सगळेजण कौतुक करत असतात. त्यांना या कामातून शांतता आणि तणावमुक्त राहण्यास मदत मिळते म्हणून हे काम, काम राहिले नाही तर एक छंद बनला आहे.

त्यांनी बनवलेल्या वस्तू देश -विदेशात पोहचल्या आहेत. दुबई, श्रीलंका, जर्मनी अशी मोठी यादी आहे. या कामामुळे त्यांची समाजात एक ओळख निर्माण झाली आहे. त्यांना जे हवे ते करायला मिळते म्हणून त्या खूप आनंदी आहेत. कुटुंबातील सहकार्यामुळे त्या आज स्वता: ची ओळख निर्माण करू शकल्या. पतीच्या पाठिंब्यामुळे त्या आज स्वता: चा व्यवसाय सुरु करू शकल्या. हा व्यवसाय पती- पत्नीच्या भागीदारीत सुरु केला असून त्यासाठी पती नेहमी मदत करतात.
नुकतीच त्यांना पी'एचडी पदवी मिळाली असून शैक्षणिक व्यवसायासोबत आपली जोपसणार आहेत तसेच कलेच्या आणि व्यवसाय म्हणून त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. 

त्याचबरोबर कामाचा वाढता व्याप पाहून टीमचा विस्तार करणार आहेत. काही लोक त्यांच्या ही कला शिकण्यासाठी येत आहेत तर यासंदर्भातील नियमित कार्यशाळाही सुरु करणार आहेत. भविष्यात ई कॉमर्स कंपनी सुरु करण्याचा विचार आहे.

Friday, 15 July 2016

मॅनेजमेन्ट गुरु : शिलाईकाम करणाऱ्या सुनंदा ताई ,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व


चित्रपटात अनेक वेळा पाहिलं की हिरोची आई शिलाईमशीनवर कपडे शिवते आणि हिरोला शिकवते आणि त्यांचे पालनपोषण करते. तिने एका मशीनवर काम सुरु केलेले असते आणि चित्रपटाच्या अखेरीस ती एका मोठ्या दुकानाची मालकीण झालेली असते. हिरो आता गरीब, दुबळा राहिलेला नसून शिकून श्रीमंत झालेला असतो. पूर्वी असे दृश्य अनेक भारतीय चित्रपटात दिसत असे. पण असे वास्तवात कुठे असे घडते असे आपल्याला वाटते. पण एका माऊलीने  शिलाईमशिनच्या सहाय्याने आपले घर –संसार सांभाळून दोन्ही पाल्यांना आपल्या पायावर उभे केले. आज दोघांची आपआपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे.

ही माऊली म्हणजे सुनंदा दत्तात्रय राक्षे. बालपणापासून काहीतरी नवीन शिकायची हौस. त्यांचे बालपण हे बारामतीत होळकर सादोबाची वाडीत गेले. घरी वडिलोपार्जित कपडे शिवायचा व्यवसाय होता त्यामुळे त्या घरात आईला हातावर शिवताना पाहत असत. शेजारी एक बंगाली बाई होती, ती मशीनवर कपडे शिवत असे, आपल्यालाही असे कपडे शिवता यावे म्हणून त्या बंगाली बाईकडे जाऊन मशीनकाम शिकत असत. हळूहळू शिक्षण पूर्ण करताना शिलाई मशीनवर कपडे शिवण्याची कला जोपासली. दहावीला असताना लग्न ठरले शिक्षण पूर्ण करायची जिद्द असल्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पेपर दिला. कोणतेही काम घेतले की पूर्ण करायचे ही सवय अगदी लहानपणापासून जपली आहे. हेच त्याच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच आज यशस्वी व्यावसायिक आहेत.


लग्नानंतर घोरपडी राहायला आल्यावर काही तरी करावं सारख वाटत असे, शांत बसायची सवय नव्हती म्हणून त्यांनी शिवणकाम शिकायला सुरुवात केली. दोन महिने क्लास केला. पहिला दसरा म्हणून सासूबाईने कानातले घ्यायचे ठरवले होते, तेव्हा राक्षे ताई म्हणाल्या की मला त्यापेक्षा कपडे शिवायची मशीन घ्या. सप्टेंबर १९८३ घरात पहिली मशीन आली. घरचे कपडे शिवायला सुरु केले मग मैत्रिणी आणि शेजारील स्त्रियाच्या ब्लाउज शिवून दिले. कामाच्या बाबतीत गुणवत्ता आणि दर्जा चांगला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक कपडे शिवायला येऊ लागले. कधी जाहिरात किंवा बॉनर लावायची गरज पडली नाही. त्यामुळे शाळेच्या गणवेश ऑडर मिळायला लागल्या. लग्नसराई,दिवाळी, ईद, नाताळ अशा मोठ्या सणावाराला भरपूर काम मिळू लागले. अगदी मायतीचा ब्लाउजचे काम आले तरी नाकारले नाही. कारण काम काम असते म्हणून सगळ्या प्रकारचे काम स्वीकारले.

कामाचा वाढता व्याप पाहून राक्षे ताईच्या पतीने सांगितले की तू दुकान सुरु कर, आम्ही सहकार्य करू कामात असे सांगितले. सासूबाईनी पदर खोसून तयार झाल्या. राक्षेताई दिवसभर दुकानात काम करत असल्यामुळे घरातील सगळे कामे सासूबाई स्वत करत. कधी स्वयंपाक करावा म्हणून अपेक्षाही केली नाही. १९८९ ला घरालागत असलेल्या खोलीत दुकान सुरु केले. एका मशिनच्या माध्यमातून सुरु झालेले काम हळूहळू वाढत गेले तशा मशीनही वाढत गेल्या. पन्नास हजार रुपये भांडवलाची गुंतवणूक करून मोठ्या थाटाने दुकान सुरु केले. त्यामुळे कामाचा व्याप वाढला तशी कमाईही सुरु झाली. कामामध्ये राक्षेताईचे पती त्यांना मदत करत असत. दिवसभर एका खासगी कंपनीत काम करून आल्यावर संध्याकाळी ते पत्नीच्या कामात सहकार्य करत. अगदी कपड्यांना काचा करण्यापासून ते सर्व काम करत. काही समस्या असेल तर भक्कम पाठिंबा देत असत.

सगळे छान सुरु असताना एक दिवस त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला,त्यांच्या पतीने निधन झाले. त्यांचा आधार गेला पण सासूबाईनी धीर दिला. त्यामुळे काही दिवसांतच त्या पुन्हा कामाला लागल्या. त्यावेळी त्यांची चिमुकली मीनल त्यांच्या कामात मदत करू लागली. सासूबाईनी संसाराचा सगळा कारभार हातात घेतला आणि फक्त कामावर लक्ष दे म्हणाल्या. त्यांच्या या पाठिंब्यामुळे घरातील उत्पन्न सुरु राहिले. त्या नेहमी म्हणायच्या की “कमाईतील दोन पैसे नेहमी अडीअडचणीला बाजूला ठेवावे” त्यांच्या या सल्ल्यामुळे मला बचतीची सवय लागली आणि त्यामुळे या अडचणीच्या काळात आणि  व्यवसाय वाढीला खूप मदत झाली. म्हणून कधीही पैश्याच्या अडचणीमुळे कामात खंड पडला नाही. उलट यामुळे बचतीची सवय लागली. असे राक्षेताई सांगतात.
आजपर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनी कधी मागे पाहिले नाही. त्यांनी स्वत:चा संसार सांभाळताना अनेक महिलांना रोजगार दिला. त्यांना शिलाईमशीन शिकवली , काहींनी यांच्याकडे राहून आपल्या संसाराला हातभार लावला तर काहींनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्यांच्या शिष्यापैकी अनेकजणी यशस्वी व्यवसायिक आहेत. काहीतर स्वता:चे दुकान टाकले आहे. आतापर्यंत १०५६ मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

काळानुसार शिलाईकाम हे फक्त कपडे शिवणे राहिले नसून एक फॅशन इंडस्ट्री तयार झाली आहे. त्या अनेकजणींचे फॅशनबेल  ड्रेस शिवतात आणि लोकांना नव्या फॅशनबाबत सांगतात पण त्या स्वतः मात्र फार साध्या पद्धतीने राहणे पसंत करतात.

आता रेडीमेड कपड्याचा काळ आहे. या बदलत्या काळानुसार त्यांनी स्वता:च्या कामात बदल करून घेतले त्यामुळे दुकान कधी तोट्यात गेले नाही. साधा लहान मुलींचा फ्रॉक ते शांतीचा ड्रेस असो वा मैने प्यार किया मधला माधुरीचा ड्रेस त्यांनी टीव्हीवर पाहून शिवून दिला. आता नेटवर शोधून नवीन फॅशनचा ड्रेस शिवतात. रेडीमेड कपड्याचा त्यांच्या व्यवसायावर कधीही परिणाम झाला नाही त्यांनी काळानुसार बदल केले म्हणून आज रेडीमेड ड्रेसचे फिटिंगचे काम त्यांच्याकडे येतात. कुंची ते अनारकली सगळ्या प्रकारचे कपडे शिवतात. ग्राहकांशी कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकावे म्हणूनच त्यांच्याकडे तीन पिढीतील लोक येतात. आजी ते नाती पर्यंत असे अनेक ग्राहक त्यांच्याकडे येतात. धावपटू नंदा जगताप ते सिंधुताई सपकाळ अशी मोठी यादी आहे.  दुकान आर्मी एरियात असल्यामुळे देशाच्या कोपऱ्यातील स्त्रिया यांच्याकडे येतात त्यांच्या आवडी आणि संस्कृतीनुसार त्यांचे कपडे या शिवून देतात. त्यांनी मला येत नाही म्हणून कधी ग्राहकाला परत पाठवले नाही. नवनवीन गोष्टी शिकून त्या स्वत: ला यशवीरित्या सिद्ध केले आहे. म्हणूनच दिल्लीला बदली होऊन गेलेल्या लोकांना तर कुरियरने कपडे दिल्लीला पाठवतात.

 
लोणारी समाजातील गरजू मुलींना शिक्षणासाठी त्यांनी  सासूच्या  नावे शिष्यवृत्ती  सुरू केली आहे.  तसेच समाजातील अनेक गुणवंतांचा सत्कार केला जातो. अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.  त्यांनी आयुष्यात अनेक संकटावर मात  करून स्वतः ला सिद्ध केले आहे. असे सगळ्यांनी करावे म्हणून त्या  इतरांना  समुपदेशन करतात. कुटुंबातील असो वा  समाजातील आणि ओळखीचे त्यांना समुपदेशन करतात. त्यांना संकटाशी कसे लढायचे हे शिकवतात. त्यामुळे समुपदेशक म्हणूनही  आजकाल ओळखल्या जात आहेत. यामुळेच कुटुंबातील सगळ्या बहीण-भाऊ  त्यांना आदर्श मानतात. 

या कामामुळे त्यांना सकाळ आणि मिटकॉन द्वारे देण्यात येणाऱ्या उद्योजिनी पुरस्कारसाठी तीन वेळा नामांकन मिळाले आहे. तसेच त्यांच्या समाजाच्या वतीने यशस्वी महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे. खरतर सुनंदा ताईचे पुरस्कारापेक्षा काम खूप मोठे आहे.


त्यांच्याशी बोलताना जाणवले की सुनंदाताई म्हणजे जबाबदारीची जाणीव, प्रमाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर व तंतोतंत पालन करणाऱ्या आहेत. याचमुळे त्यांच्याकडे आलेले ग्राहक कधीही नाराज होत नाही.
त्या शेवटी म्हणतात की माझ्या आवडीने मला म्हणजे शिलाईकामाने मला जगण्याची हिंमत, संसार सांभाळण्याची ताकत आणि समाजात पैसा, सन्मान दिला.
सुनंदा ताई खऱ्या अर्थाने मॅनेजमेन्ट गुरु आहेत. टाईम मॅनेजमेन्ट, फायनान्स मॅनेजमेन्ट हे त्यांच्याकडून शिकायला मिळते तर ग्राहकसंबध कसे जपावे हे कुठल्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये शिकायला मिळणार नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे मिळते. कमिटमेंटच यापेक्षा चांगल उदाहरण शोधून सापडणार नाही. 

Friday, 8 July 2016

कोल्हापूरची तेजस्विनी युवकांसाठी आदर्श उदाहरण



बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे तेजस्विनीचे आहे. पाच वर्षाची असल्यापासून ती भरतनाट्यम शिकत आहे. ७ वी ला असताना तिने भरतनाट्यमची सर्वात अवघड आयागितरम परीक्षा दिली. तेव्हा ती गुजरातला राहत होती. दहावीनंतर कोल्हापूरला आल्यावर तिने स्वत: क्लास घ्यायचे ठरवले, शेजारील दोन- तीन मुलीला घेऊन क्लास सुरु केला. आज तिच्याकडे नियमित येणाऱ्या ४५-५० मुली आहेत. इंजिनिअरींगचे शिक्षण चालू असताना या क्लासच्या माध्यमातून ती घरी दहा- बारा हजार देते. यामुळे ती शिक्षण पूर्ण व्हायच्या आधी ती स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी आहे.
गुरु संयोगिता पाटीलच्या मार्गदर्शनामुळे ती आज भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या क्षेत्रातील अनेक टप्पे पार करायला काहीना आयुष्य जाते, तेव्हा तेजस्विनीने अगदी लहानवयात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. ती इथे थांबली नाही तर पुढे जाऊन स्वत:चा आणखीन एक क्लास सुरु केला असून मुलींना भारतीय पारंपारिक नृत्य शिकवत आहे. गुरूच्या द्वारे आयोजित एका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ती आणि तिच्या शिष्य सहभागी झालाय होत्या. ज्यामध्ये पहिल्यांदा २००० मुलीनी एकत्र येऊन भरतनाट्यम सादर केले. कोल्हापूरच्या शाहू स्टेडियममध्ये हा रंगारंग कार्यक्रम पार पडला.

तेजस्विनी फक्त भरतनाट्यममध्येच नाही तर अभ्यासातही फार हुशार आहे. तसेच ती रेडीओ मिरचीच्या रेडीओ जॉकी स्पर्धेत टॉप टेन मध्ये नंबर पटकावला होता. टोमॅटो एम एम मध्ये तिने काही काळ काम केले आहे. तिच्या कॉलेजने तिला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. तिच्या यशाची वाटचाल पाहून तिला के . आय . टी प्राईड पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
तिला भरतनाट्यमसोबत सामाजिक कार्यात खूप रस आहे म्हणून कॉलेजच्या मानस कमिटीची सक्रीय सभासद आहे , यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया पासून अभ्यासातील अडचणीपर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. वैयक्तिक असो अन्य काही समस्या असेल तर या कमिटीच्या सहकार्य केले जाते. या सगळ्यात तेजस्विनीचा नेहमी पुढाकार असतो.
विश्वजित काशीद यांनी एका  सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तेजस्विनीला आपली कला सादर करायची संधी दिली आहे, ज्यामध्ये १० जुलैला अफगाणी विद्यार्थी यांना आपली भारतीय कला, संस्कृतीची ओळख आणि त्याची शिकवण दिली जाणर आहे. पारंपारिक नृत्य प्रकार ते भरतनाट्यम असे सगळे प्रकार शिकवले जाणार आहेत याची सगळी जबाबदारी तेजस्विनीवर आहे.
युनोस्कोच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठात एका कार्यक्रमात तिला सहभाग घेण्याची संधी मिळाली तेव्हा तिने पाकिस्तानमधील युवक त्यांच्या समस्या आणि उपाय यावर प्रोजेक्ट सादर केला होता. जगभरातील युवकवर्ग आणि भारत- पाक युवकांचे संबध सुधारण्यासाठी हा प्रकल्प युनोस्कोच्यावतीने आयोजित केला जातो.
भविष्यात तिच्या ग्रुपच्या मदतीने पन्हाळा गडावर वृक्षारोपण करण्यात येणार असून ते व्यवस्थित संशोधन करून केले जाणार असून स्वच्छता मोहीम सुरु केली जाणर आहे. तिचे योग्य नियोजन आता सुरु आहे . लवकरच हा प्रकल्प पन्हाळगड वरील पर्यटकांना दिसणार आहे.
अशी बहुगुणी तेजस्विनी युवक वर्गासाठी एक आदर्श विद्यार्थीसह शिक्षकही आहे.








Monday, 4 July 2016

गृहिणी ते उद्योजिका असा मृणाल चव्हाणचा प्रवास सुरु

सवड ही कधी आवड होईल काही कळत नाही. अशाच सवडीने तिला काहीतरी करायला प्रेरणा मिळाली. मोकळा वेळ आणि आवड यातून मृणाल चव्हाण यांच्या मृ स्कूल ऑफ आर्टची पायाभरणी सुरु झाली आणि आज ते कोल्हापूरच्या आर. के नगरमधील नामांकित आर्ट स्कूल बनले आहे.

 

मृणाल यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड त्यामुळे कॉलेजमध्ये कमर्शियल आर्ट घेऊन शिक्षण पूर्ण केले. कोलापुरच्या कला निकेतन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात दोन वर्ष काम केले. पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूरला परत आल्यावर आजूबाजूच्या मुलांना चित्रकला शिकवायला सुरुवात केली. एका विद्यार्थीपासून सुरु झालेला प्रवास मोठा होत गेला. हळूहळू विद्यार्थी वाढू लागले. काही दिवस त्या दुसऱ्यांना शिकवत होत्या पण स्वतः काहीतरी शिकावे म्हणून भरतनाट्यम शिकण्याची इच्छा घरी बोलवून दाखवली , घरच्यांची परवानगी घेऊन कोल्हापूरला जायला तयार झाल्या पण इतर काही विद्यार्थीनी असेच  नृत्य प्रकार शिकू इच्छित होत्या, मग आपण सात-आठ किलोमीटर लांब जाण्यापेक्षा शिक्षकाला इथे बोलवूया यासाठी इतर विद्यार्थिनी तयार झाल्या अश्या प्रकारे मृ स्कूल ऑफ आर्टची सुरुवात झाली.
घराच्या बाजूला मोकळ्या जागेत क्लास सुरु झाला. मग हळूहळू विद्यार्थी वाढू लागले. नृत्यसाठी आजूबाजूच्या अनेक मुली येऊ लागल्या. मुलांना काहीतरी शिकावे म्हणून इच्छा होती त्यानुसार तबला शिकवण्यासाठी शिक्षक बोलवले. त्यानंतर गिटार शिकवण्यासाठी काहीजण उत्सुक होते म्हणून गिटारचा क्लास सुरु झाला. परिसरातील महिलांना दुपारी वेळ असतो म्हणून गायन शिकवे असे वाटत होते म्हणून गायनचा वेगळा विभाग सुरु करण्यात आला. सात –आठ विद्यार्थी असलेला क्लास आता त्यामध्ये ७०- ८० विद्यार्थी झाले. यामुळे गावातच विविध कला शिकवण्याचे केंद्रच आर. के नगरमध्ये सुरु झाले. क्लासचा दर्जा टिकवण्यासाठी विशारद कलाकाराची नेमणूक शिक्षक म्हणून केली.
लग्नानंतरही वडिलांनी दिलेल्या जागेत क्लास सुरूच होता.पत्नीची आवड पाहून पतीने प्रोत्साहन दिले तू फक्त क्लास घेऊ नको त्याचे स्कूल म्हणून सुरु कर म्हणजे याचा मोठ्या प्रमाणत विस्तार करता येईल, असे सांगितले . त्यासाठी सासऱ्यानी सुनबाईला एक फ्लट भेट म्हणून दिला. मग काय घराजवळच मृ स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली. पती आणि सासरच्या मंडळींनी पाठिंबा दिला म्हणून एक गृहिणी आज उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे.
या स्कूलमुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक महिलांना शनिवार आणि रविवारी वेळ मिळेल तेव्हा दोन तास आपली आवडती कला शिकायला मिळत आहे. यामुळे सगळ्या महिलांना रोजच्या रुटीनमधून थोडासा चेंज मिळतो आणि एखादी कलाही जोपासायला मिळत आहे, म्हणून सगळ्याजणी आनंदी आहेत. याच श्रेय जाते ते मृणाल चव्हाण यांना.



Thursday, 9 June 2016

वीज न वापरणाऱ्या डाॅ. हेमा साने यांची अनोखी कहाणी


अलीकडेच पर्यावरणदिन झाला सगळेजण मेसेज करत होते. कोणीतरी झाडे लावताना फोटो काढून सोशल मिडीयावर टाकत होते. तो दिवस संपला की सगळ संपल . पण संपूर्ण आयुष्य म्हणजे पर्यावरणदिन आणि त्यांची रक्षा करणे हा धर्म समजून रोज काम करणाऱ्या डॉ.हेमा साने या मात्र आपल्या सगळ्या पेक्षा वेगळ्या आहेत.

डॉ.हेमा साने यांची शिक्षण पाहिलं लक्षात येईल किती महान व्यक्तीबद्दल बोलत आहे. त्याचं शिक्षण आहे,  M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology .त्यांच्या पाहिल्यावर वाटणार पण नाही त्या एवढ्या उच्चशिक्षित आहेत.


पुण्यातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ.हेमा साने यांनी त्यांच्या बालपणापासून वीज वापरलीच नाही,त्यांच्या कामाबाबत  छोटीसी चित्रफित 'चल हवा येऊ द्याया कार्यक्रमात दाखवण्यात आली.ती पाहिल्यावर  या महान स्त्रीबद्दल आणखीन आदर वाटला.

आपल्या एवढ्या जवळ असून त्यांना भेटता आले यांची खंत वाटत राहिली.एम्प्रेस गार्डनमध्ये त्या एकदा लेक्चरसाठी आल्या होत्या. पण त्यादिवशी मला जाता आले नाही. भावाने माहिती दिल्यावर त्यांना भेटायची उत्सुकता अजून वाढली. पुढे आज उद्या करून राहून गेले.

त्या M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology आहेत. तरीही  त्यांचा इतिहासाचादेखील गाढा अभ्यास आहे. त्यांनी गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणून काम केलेले असून  त्या पाणी विहिरीवरून आणतात! आयुष्यात कधी वीज वापरली नाही किंवा टेलिफोन वापरलेला नाही. सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे वनस्पतीप्राणी पक्षी हे त्यांचे विश्व .त्यांच्या घरातसगळीकडे वेली,झाडेझुडपे दिसतात त्यामुळे आजूबाजूला सगळ्या प्राणी ,पक्षी कीटकांचा  मुक्त वावर दिसतो. यामुळेच त्यांनी  वनस्पती शास्त्राशी संलग्न काही पुस्तके लिहिली आहेत. तसेच काही  पाठ्यपुस्तके लिहिले तेही कंदिलाच्या उजेडात!

आता त्या सौर उजेचा दिवा वापरतात.नोकरीतील शेवटच्या दहा वर्ष  त्यांनी लुना वापरली तोपर्यंत त्या पायीच जात होत्या. त्यानंतरदेखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात..!
हे सगळ वाचून आश्चर्य वाटत असेलआता पर्यंत त्यांना पाहिजे तसा त्यांचा सन्मान केला गेला नाही. किंवा त्यांच्या सखोल अभ्यास त्याबाबत दाखल घेतली गेली नाही. त्यांच घर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे जागाकडे आशा लावून काहीजण बसले आहेत. घर हे नुसते घर नसून सर्व प्राणिमात्रांच्या आश्रयस्थान आहे.
त्यांच्या कामाची दाखल घेऊन झी मराठी वाहिनीने  त्यांना माई पुरस्कार देणार आहे. याचा आनंद आणि अभिमान वाटतो.
.
'साधी राहणी उच्च विचारसरणी'चे तंतोतंत उदाहरण असलेल्या वयाची ७५ वी ओलांडलेल्या या उच्चशिक्षित व प्रेरणादायी स्त्रीच्या निसर्गाप्रती समर्पणाला साष्टांग दंडवत! __/\__ 
आता मात्र लवकरच भेटायला जाईल.....