नवरात्री
विशेष ब्लॉग लिहिताना काही स्त्रींची मनात यादी केली होती .त्यावेळी कल्पना नव्हती
की ती यादी जेव्हा शब्दरूप घेऊ लागेल तेव्हा एवढी मोठी होईल, नवरात्रीचे चार दिवस
राहिले आहे. आता मला कळेना की या सगळ्या स्त्रियांची महती नऊ दिवसात कशी मांडायची.
कारण काही प्रत्यक्षात भेटलेल्या आणि अप्रत्यक्षरित्या भेटलेल्या व प्रेरणा
देणाऱ्या अश्या अनेक स्त्रिया आहेत, जर त्या सगळ्यांचा उल्लेख केला नाही तर ही
लेखमालिका अपूर्ण राहील. म्हणून या पुढे एका दिवशी एकापेक्षा जास्त स्त्रियांची
महती लिहिणार आहे. सुरुवात ही बचत गटाच्या महिलापासून, कारण त्या सगळ्याजणी खूप
अत्यंत बिकट परिस्थितीवर मात आयुष्याला नवीन वळण देत आहेत. कुठल्याही मोठ्या
बिजनेस किंवा मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकल्या नाहीत . तरीही आपला छोटासा बिजनेस
उत्तम प्रकारे चालवत आहेत.
एमसीजे(पत्रकारिता)
करत असताना माझ्यासोबत शिकत असलेल्या एकाने वृत्तपत्रात पार्ट टाईम काम करणार असे
विचारले होते, मग काय लगेच होणार दिला कारण पत्रकार म्हणून काम करायला मिळणार होते,
तेच तर मला पाहिजे होते, कोर्स पूर्ण होण्याआधी काम करायला मिळते यासारखी आनंदाची
गोष्ट नव्हती. दै.संध्या नावाच्या वृत्तपत्रात कामाला सुरुवात केली तेव्हा पत्रकार
संघातील पत्रकार परिषद जायचे व त्याची
बातमी करायची असे काम माझ्या वाट्याला आले. त्यात चांगले वाईट अनुभव येत राहिले.
पण मी ज्या उद्देशाने पत्रकारितेत आले ते काम म्हणजे समाज कल्याणाच्या बातम्या
देण्याची इच्छा होती, पण तसे काही करता येत नव्हते. सामाजिक विषयातील माझी आवड पाहून
दै.संध्याचे निवासी संपादक शिंदे सर यांनी मला पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरु
असलेल्या बचत गटाच्या चळवळीवर लेख लिहायला सांगितला. मी कामाला लागले तेव्हा
कोणाची ओळख नव्हती म्हणून पहिला लेख कसाबसा लिहून दिला . सरांना लिखाणापेक्षा माझी
काम करायची तळमळ त्या लेखातून दिसली असेल त्यांनी मला दुसरा लेख महिला बचत
गटाअंतर्गत व्यवसाय कसा करतात किंवा सक्सेस स्टोरी या विषयावर करायला सांगितले. इथून माझी खरी सुरुवात झाली. रोज एका बचत गटाच्या कामाचा आढावा
घेणारा लेख लिहू लागले. जवळपास सहा महिने ही लेखमालिका जोरदारपणे सुरु होती. एवढं
काय तर काही महिन्यात पत्रकारितेतील काही
लोक बचत गटाचे वृत्तपत्र म्हणून दै. संध्याला ओळखू लागले होते. दै.संध्या लहान
वृत्तपत्र म्हणजे त्याचा खप खूप कमी होता म्हणून माझे लेख मर्यादित लोकांपर्यंत
पोहचत होते. पत्रकारितेतील कोणी मला याबद्दल शाबासकी दिली नाही किंवा लेखमालिका
चांगली सुरु आहे असे बोलले पण नाही . बचत
गटातील अनेक अशिक्षित महिला लेख दुसऱ्याकडून वाचून घेत आणि कौतुक करीत तसेच अनेक
वेळा आभार मानत असत. मला ही अश्या प्रकारचे काम करायचे होते म्हणून मी पत्रकारितेतील
मुख्य प्रवाहाकडे दुर्लक्ष केले. भविष्यात आपल्याला तेच करायचे आहे म्हणून निश्चत
होते. आज त्याच थोडं दुख होत कारण पांढरपेशातील वृत्तपत्रांना लोकांचे दुख
विकण्याची सवय झाली ते पण आपल्या फायद्यासाठी, जर तोटा झाला तर तेही नको असते. मग
तिथे एखाद्या फुटकळ नटीला कशी सर्दी झाली , कुठ्याल्या दवाखान्यात गेली याचा
सविस्तर आढावा चालतो.
बचत
गटातील महिलांकडून मला खूप शिकता आले. या सहा महिन्यात माझा एखादया बिजनेस स्कूलचा
छोटासा कोर्स झाला असे समजा. या सहा महिन्यात रोज एका बचत गटाची सक्सेस स्टोरी
लेखाच्या माध्यमातून मांडत असे. त्यासाठी बचत गटाचा महासमूह सावित्री या संस्थेत जात
असे कारण तिथे अनेक महिला बचत गटा संदर्भातील योजना जाणून घेण्यासाठी येत असत.
त्या महिला बचत गटाविषयी माहिती मिळवून दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या महिलाला भेट
द्यायला जात असे. त्यांचे काम आणि प्रगती पाहून कधी कधी थक्क व्हायची. कसं केले असेल याचं उत्तर शोधताना माझ्या
लेखासाठी माहिती मिळवत असे. बचत गट मेळावापासून भीमथडी यात्रा आणि महाराष्ट्रातील
सर्वात मोठे बचत गट प्रदर्शन यांना भेटी देऊन एक एक स्टोरी मिळवत असे. यामुळे
सगळ्या स्तरातील बचत गटाचे काम पाहता आले. बचत चळवळीतील अनेक चढ –उतार आणि हेवे-दावे
आणि राजकारणी लोकांचा हस्तक्षेप आणि यशस्वी गटाला आम्ही कशी मदत केली म्हणून
राजकीय लोकांचे श्रेय मिळवण्यासाठीचे भांडणही पाहायला आणि अनुभवायला मिळाले. या
बचत गटाच्या कार्याला चळवळीचे स्वरूप पुणे महानगरपालिका मधील सहाय्यक आयुक्त उमराणीकर यांनी दिले होते . सर्वसामान्य महिलाही बचत गटातील
समस्या घेऊन त्यांच्याकडे जात असे. त्यांनी गरीब वस्तीतील अनेक सुशिक्षित मुलींना
या बचत गट समूहाची जबाबदारी दिली होती त्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळत होता
तर वस्तीतील शिक्षित गृहिणीना आपल्या वस्तीतील बचत गटाच्या संदर्भातील माहितीची
देवाण-घेवाण करणाऱ्या म्हणजे बचत-गट व मनपा मधील या महिला दुवा असत. ही आजही पद्धत
सुरु आहे. मला या लेख मालिकेसाठी सर्वसामान्य बचत गटातील महिला असेल किंवा
आयुक्तापर्यंत सगळ्यांनी खूप मदत केली. प्रत्येकाकडून मला शिकायला मिळाले. एक दिवस
या महिलांना नेहमी मदत करणारे आयुक्त यांना अचानक देवआज्ञा झाली तेव्हा सगळ्यांना
आपला आधार गेला असे वाटत होते. कारण आयुक्तांची दुसऱ्या विभागात बदली होत असताना
बचत गटाचे अधिकारी तेच राहावे म्हणून मोर्चा पण केला होता. तेव्हा या महिलांचे
रुद्ररूप ही पाहायला मिळाले होते.
सहा
महिन्यात दीडशे लेख लिहिले असतील, त्या प्रत्येक गटाची वेगळी कहाणी आहे. प्रत्येक
गटाकडून काही तरीही शिकायला मिळाले, सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती
म्हणजे त्या महिलांची जगण्याची जिद्द आणि संकटाना झुंज देण्याची पद्धत. अनेकजणी
झोपडपट्टी राहत असून उत्तम बिजनेस वूमन म्हणून काम करत आहेत . हे त्यांच्या कामाने
सिध्द केले होते. तर काही त्या दिशेने प्रवास सुरु होता. संसार, मुलांचे संगोपन,
सासू- सासरेचे काम तर काही दारुडा नवऱ्याचा मार खात संसाराचा गाडा खंबीरपणे ओढत
होत्या. सुरुवातीला त्या पण सर्वसामान्य स्त्रीसारख्या लाजऱ्या, घाबरत घराबाहेर
पडल्या. नंतर बचत गटाच्या कामामुळे त्यांच्या आर्थिक, वैचारिक, सामाजिक परीस्थितीत
बदल घडत गेले . राजकीय व्यक्तींना तोड देतील असे भाषण करू लागल्या. यासाठी त्या
सगळ्या महिलांनी खूप परिश्रम घेतले होते. त्यांची कहाणी शब्दात मांडताना मला फार
छान वाटायचे एक वेगळा आनंद मिळायचा. तो लेख पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद
खुलायचा तो मला मिळणाऱ्या पैश्यापेक्षा हजार पट्टीने मोठा होता. पण वृत्तपत्र
मालकांला या लेखमालिकेत व्यवसाय दिसला नाही. म्हणून मालिका बंद करा असा आदेश आला.
माझे लेखमालिकेचे काम थांबून मला इतर काम दिले. मी पुन्हा नव्याने सुरुवात म्हणून
कामाला लागले. पण आजही मला त्या महिलांची जिद्द आणि चिकाटी आठवते. त्यात खास
उल्लेख करावा लागेल अश्या अनेक आहेत, पण काहींचा धावता आढावा लिहावा लागेल नाहीतर
आजचा लेख खूप मोठा होईल.
ज्यांनी
कधी बचत गटाच्या मेळाव्याला भेट दिली असेल त्यांना जळगावचे मांडे बनवणाऱ्या
महिलांचा बचत गट तर आठवत असेल त्या दोघी जावा इतर महिलांच्या मदतीने पुरणाचे मांडे
बनवत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी असे. अगदी पाचशे रुपये भांडवलावर काम
सुरु केले होते. आज लाखों रुपयांची उलाढाल करतात. त्या मी लेख लिहिण्याआधीच
पुण्यात प्रसिद्ध होत्या पण मी भेटायला गेले तेव्हा मात्र अगदी सामान्य
महिलांसारखे वागत होत्या. मला स्वत: चहापाणी करणे यातून त्यांचा मोठेपणा अनुभवता
आला. येरवड्या जेल मधील कैदी महिलांचा बचत गट याची स्टोरी करताना अनेक अडचणीला
तोंड देऊन परवानगी मिळाली ती एका बचत गट कार्यकर्तीमुळे तेव्हा कैदी म्हणून
त्यांचे प्रश्न आणि जेलमुळे बचत गटावरील मर्यादा अश्या गोष्टी जाणून घेता आल्या.
तसेच बुधवार पेठेतील महिला यांचा एक गट आणि तृतीयपंथी यांच्या गटाची स्टोरी तर
पहिल्यांदा मी ब्रेक केली होती. दगडू शेठ गणपतीजवळ त्यांच्यासाठी काम करणारी एक
सामाजिक संस्था आहे तिच्या मदतीने आणि आशा या बचत गट सामुहिका हिने मला त्यांची
ओळख करून दिली.तेव्हा त्यांचे विश्व आणि त्यांच्या समस्या याचीच चर्चा जास्त झाली.
बचत गटाच्या माहितीचा अभाव तरीही सामाजिक संस्थेच्या मदतीने तीन वर्ष बचत गट सुरु
होता. तृतीयपंथी म्हटलं तरी भीतीचे वातावरण निर्माण होते पण त्या गटाचा अध्यक्ष
अगदी सर्वसामान्य व्यक्तीसारखा होता. बचत गटाच्या सुविधेची माहिती फार नव्हती , पण
आमच्यासाठी सरकार काही करत नाही असा सुरु ऐकायला मिळाला. बाकीच्या सारखे बचत
गटाच्या माध्यमातून काही व्यवसाय करता येत नाही याची खंत तो करत होता.
असे
अनेक अनुभव आहेत, अनेक बचत गट आहेत त्यांना या लेखात न्याय देता आला नाही. पण मला
या बचत गटामुळे मला करीयरच्या सुरुवातीला खूप शिकायला मिळाले. माझ्या कामाची दिशा
यामुळे स्पष्ट झाली होती. तसेच बचत गटाच्या अभ्यासाचा उपयोग करून कॉलेजचा प्रबंध तयार केला होता. बचत गटामुळे महिलांचे संवाद कौशल्य कसे वाढले व त्याचा समाजावर
सकारात्मक झालेला परिणाम या विषयावर शोधनिबंध सादर केला. आणि बचत गट या विषयावरील
लिखाणाला स्वल्पविराम मिळाला. भविष्यात पुन्हा या विषयात काही तरी करता येईल याची
खात्री आहे.
No comments:
Post a Comment