Tuesday, 20 October 2015

मला भेटलेल्या रणरागिणी......



 आयुष्यात आपल्याला रोज अनेक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून  किंवा अनुभव देऊन जातात. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून तसेच परिस्थितीमधून बरेच काही शिकतो त्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. आज अश्या स्त्रियांचा उल्लेख मी करणार आहे की त्यांनी मला बरेच काही दिलं ते शब्दात सांगता किंवा व्यक्त करता येणार नाही . त्यांना भेटल्यावर दरवेळेस  मला काहीतरी शिकायला मिळालं आहे. ते त्या स्त्रीच्या स्वभावानुसार असेल किंवा तिच्या व्यक्तिमत्वानुसार असेल किंवा मिळालेल्या वेळेनुसार असेल पण मी कधी रिकाम्या हाती परतले असे . कधी असं झालं नाही खरच!
पहिल्यांदा ज्यांनी मला सामाजिक क्षेत्राशी निगडीत राहण्याची दिशा दाखवली. अश्या लता जाधव मॅडम यांच्याविषयी. कारण मी चौथीत तुम्ही कोण होणार असा निबंध लिहायला सांगितल्यावर मी समाजसेवक होणार असा लिहीला होता. पण तो कोणत्या आधारावर किंवा कुठून माहिती मिळाली होती आठवत नाही. त्यावेळी माझ्या वर्गशिक्षिका म्हणाल्या  होत्या हा निबंध लिहायला सोपा आहे पण तसं व्हायला फार अवघड आहे. का अवघड आहे हे खूळ बरेचं दिवस डोक्यात होते. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना लता जाधव मॅडमनी मला एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला पाठवले. मानवाधिकार यासंदर्भात कार्यक्रम होता, त्यावेळी असे समजले संस्थेने एका सामाजिक इंटरशिपचे आयोजन केले आहे. मी त्यासंदर्भात जाधव मॅडमला विचारले, त्यांनी लगेच अर्ज भर सांगितले. त्यामुळे तुला वेगळा अनुभव मिळेल. आणि नवीन जग पाहायला मिळेल. त्यानुसार अर्ज भरून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीला गेले, तिथे धान्य बँक या विषयावर काम करणाऱ्या संस्थेत एक महिना राहून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . सगळ्यात महत्वाचे माझ्या नशिबाने निपाणीतील बिडी कामगाराचे जग पाहायला मिळाले, मी अकरावी असताना यावर एक धडा मराठीच्या पुस्तकात होता. जे विश्व प्रत्यक्षात पाहण्याचा वेगळाच अनुभव होता. हे सगळ जाधव मॅडममुळे शक्य झाले होते. पुढे अनेक वेळा त्यांनी काही सामाजिक कार्यक्रम असेल तर मला त्याची माहिती दिली त्यामुळे पुण्यातील सामाजिक संस्थांची मला माहिती मिळाली, तर काही संस्थासोबत काम करायची संधी मिळाली. लोकशाही उत्सव यामुळे सगळ्या प्रकारच्या संस्थाचे काम जवळून पाहता आले. यासाठी जाधव मॅडमनी मला प्रोत्साहन दिले. माझी मराठी भाषेची आणि लिखाणाची आवड त्यांच्यामुळे वाढीस लागली. कॉलेजमध्ये बुक लव्हर्स या कार्यक्रमात नवनवीन पुस्तकांवर चर्चा व्हायची , तेव्हा त्यात मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा. आमची फक्त अभ्यासू विषयावर नाही तर करियरच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा व्हायची. त्यांचे नेहमी योग्य मार्गदर्शन मिळायचे. त्या स्वत: उत्तम लेखिका आहेत म्हणून  करीयरमधील अडचणी आणि संकट यावर नेहमी मार्गदर्शन करत. पत्रकारिता करियर निवडल्यावर यामध्ये स्थिर व्हायला लागणारा काळ यासंदर्भात अनेक वेळा त्यांनी मला मार्गदर्शन केले. आजही त्या माझी अगदी आपुलकीने चौकशी करतात, काम कसे सुरु आहे याची विचारपूस करतात. माझे नशीब चांगले आहे म्हणून अश्या शिक्षिका मिळाल्या. त्यांनी मला जीवन जगण्याची कला शिकवली...
दुसरी स्त्री म्हणजे जागृती यात्रेच्या संस्थापक सदस्य रेवती मॅडम, त्यांची माझी पहिल्यांदा भेट  जागृती यात्रे दरम्यान झाली. जागृती यात्रेच्या मुख्य सदस्य यापैकी एकजण मराठी आहे असे समजल्यावर खूप समाधान वाटले. तसेच आनंद ही झाला. यात्रेत त्यांची ओळख झाली. त्या लंडनला राहतात पण मराठी छान बोलतात हे फार वेगळं वाटत होत. हळूहळू यात्रेत त्यांची ओळख वाढली. गृहिणी किंवा सर्वसामान्य महिलांच्या रोजगाराविषयी त्यांचे विचार माझ्या विचारांशी जुळत असल्याने एकदा उडीसाला जात असताना खूप वेळ यावर चर्चा करत होतो. प्रत्येकवेळी यात्रेत गेल्यावर आपलं कोणीतरी आहे. याची जाणीव व्हायची. आता यात्रेचा व्याप खूप वाढला आहे, नाहीतर पूर्वी अनेक वेळा रेवती मॅडम यांना विविध गप्पा मारायला वेळ मिळत असे. एकदा लिखाणाची व वाचनाची आवड या विषयवार गप्पा सुरु असताना माझ्या आवडत्या लेखिका मीना प्रभू या रेवती मॅडमच्या सासूबाई आहेत हे समजले. मला त्यांची पुस्तके फार आवडतात पण माझ्याकडे  त्यांचे एखादे पुस्तक नाही असे सांगितल्यावर मी पाठवते तुला असं म्हणाल्या . खरचं काही महिन्यांनी माझ्यासाठी लंडनहून मीना प्रभुंच एक पुस्तक घरी आलं. असं काही घडल्यावर खूप छान वाटत. समोरची व्यक्ती वेळातवेळ काढून आपल्यासाठी काहीतरी करते त्यावेळेस खूप समाधान वाटते.
आम्ही लंडनला गेल्यावर रेवती मॅडमला फोन केला. त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा  त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून मला आणि माझी मैत्रीण रितासाठी वेळ काढला. आम्हांला भारतीय हॉटेलमध्ये घेऊन गेल्या. तिथे पंधरा दिवसानंतर भारतीय नाश्ता केला. तेव्हा खूप आनंद झाला. कारण पंधरा दिवस आम्ही भारतीय जेवणाला मुकलो होतो. त्यापेक्षा एवढी मोठी व्यक्ती आपल्यासाठी वेळ काढते याचं नवलही वाटत होत. त्यांचा तिथे निरोप घेताना जसं कोणीतरी आपल्या  माणसाला निरोप देत आहोत अशी भावना तयार  झाली. कारण दुसऱ्या देशात असताना आपल्या ओळखीचे किंवा आपल्या भाषेत बोलत असेल तरी आपुलकीची भावना तयार होते.  रेवती मॅडम तर ओळखीच्याच होत्या. नेहमी मदत करणाऱ्या रेवती मॅडमनी मला नेहमी खूप काही दिल आहे, मग ते  भावाच्या शस्त्रक्रियेच्यावेळेलाही. त्यांच्याकडून नेहमी खूप शिकायला मिळाते की तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपलेपणा आणि माणुसकी सोडायची नसते.
आणखीन एक शिक्षिका उषा  माळी मॅडम . त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमी प्रेरणादायी वाटते . या म्हणजे आदर्श शिक्षिका काय असते याचे उत्तम उदाहरण आहेत त्या . त्यांनी मला कधी शिकवले नाही, त्या आमच्या शाळेत आल्या तेव्हा मी कॉलेजला शिकायला गेले होते. पण त्यांची पर्यावरण आणि सामाजिक कार्य या विषयातील आवड यामुळे आमची ओळख झाली. त्या आमच्या एम्प्रेस गार्डन मित्र परिवारमधील सक्रीय सदस्य आहेत. त्या विद्यार्थ्यांची फक्त शिक्षक नव्हे तर आईसारखी काळजी घेतात. आजही गरीब विद्यार्थांना जमेल तसे सहकार्य करतात. विशेष करून गरीब मुलामुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. मानसिक असो आर्थिक किंवा घरगुती समस्या यामध्ये आपल्या परीने त्या नेहमी सहकार्य करतात. एकदा एका मुलीला पालक शाळा लांब आहे म्हणून शाळेत जाऊ देत नव्हते. तेव्हा त्यांनी आमच्या सगळ्यांकडे तिला सायकल देण्यासाठी चौकशी केली. तसेच मुले शैक्षणिक ज्ञानाबरोबर इतर सर्व विषयात पारंगत व्हावी म्हणून मुलांना विविध कार्यक्रमाला घेऊन जातात. जर रात्री उशीर झाला अनेक वेळा मुलांना बसस्टॉप वर आणि मुलींना तर घरी सुद्धा सोडतात. म्हणूनच मला यांच्याकडून आपण काम करताना १०० % प्रयत्न कसे करायचे हे शिकायला मिळाले.
अजून एक स्त्री आहे तिला सगळे आम्ही निर्माणी अम्मा म्हणतो, म्हणजे डॉ.राणी बंग.गडचिरोलीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आणि जेष्ठ समाजसेविका. २००६ मध्ये त्यांना भेटायची संधी मिळाली. युवक –युवतींच्या समस्या यावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मला निर्माण शिबिराची माहिती मिळाली. त्यांना मी या शिबिराला यायचं असे बोलले . त्यांनी लगेच  गडचिरोलीला ये असे सांगितले  शिबिराची अधिक माहिती घेण्यासाठी एका कार्यकर्तीची भेट घे म्हणाल्या. अश्या रीतीने पुण्यातील ग्रुपसोबत मी गडचिरोलीला पोहचले. आम्ही पोहचल्यावर सगळेजण धावत जाऊन अम्माला भेटले मी मात्र नवीन असल्यामुळे लांब उभे राहून पाहत होते. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. तिथे काही दिवस राहून त्यांच्या कार्याची माहिती मिळाली. तेव्हा कळाले की त्यांनी कसे उमेदीच्या काळात जंगलात राहून आदिवासी लोकांसाठी आरोग्याच्या सुविधा पुरविल्या,नक्षलवाद्यांना न  घाबरता आपले कार्य सुरु ठेवले. त्यांच्या कार्यांविषयी मी काय सांगणार सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या  योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांसाठी आदर्श व्यक्ती आहेत. म्हणून माझ्यासाठी  त्या आदर्श स्त्री आहेत.

शेवटी पण अगदी महत्वाची व्यक्ती म्हणजे रुपाली कलाटे मॅडम. त्यांची माझी  खूप कमी वेळा भेट झाली  पण त्यांचे व्यवहारिक ज्ञान आणि कष्ट करायची पद्धत यामुळे मी त्यांची चाहती झाले. त्या फार प्रसिद्ध व्यक्ती नाहीत पण त्याची  चलाख बुद्धी कित्येकांना भुरळ पडते. पहिल्यांदा नंदू सराची पत्नी म्हणून ओळख झाली पण त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे एक वेगळे स्थान मनात निर्माण झाले आहे. त्या तितक्याच प्रेमळ आहेत. पण त्यांचा चांगल्याला चांगल्या आणि वाईटाला वाईट असा बिनधास्त स्वभाव आपल्याला बरेसं काही शिकवून जातो.
या सगळ्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. मला जमेल तसं मी त्यांच्याकडून बरेचं काही शिकले आणि अजूनही शिकते व त्याचा आपल्या दररोजच्या जगण्यात उपयोग करते.अजून काय सांगणार !जर काही त्यांच्याकडून घेता आले नसेल तर असं म्हणेल मज पामराला माफी असावी ....




















No comments:

Post a Comment