पौर्णिमेचा चंद्र जसा एक एक
दिवस खुलत राहतो. तसं माणसाचं आयुष्य आहे. रोज काहीतरी आपण शिकत असतो किंवा अनुभवत
असतो. एखाद्या वेळी ठेच लागते. तर कधी एक पाऊल पुढे टाकत खड्डा चुकवत. या मार्गात आपल्याला
काही हात देऊन सहकार्य करणारे भेटतात. तर काहींच्याकडून आपण प्रेरणा घेऊन मार्गस्त होत राहतो. अश्या
स्त्रिया माझ्या आयुष्यात अनेक आहेत. त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा मिळत राहिली.
जेव्हा तुम्ही सर्वसामान्य घरातून बाहेरच जग पाहण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा
यशस्वी लोकांच्या कष्टांची कथा माहिती असावी लागते . ज्यांनी समाजात आपले स्थान
निर्माण करण्यासाठी संघर्ष केला तसेच आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढा दिला
तर दुसऱ्याला न्याय मिळावा म्हणून कार्य केले अश्या माणसांची माहिती मिळवावी
लागते. तेव्हा कुठे तुम्हांला संघर्ष करायला बळ मिळते. अश्या काही लढाऊ स्त्रियांचा
आज थोडक्यात आढावा .ज्या स्त्रियांना मी कधी भेटले नाही.पण त्यांच्या कार्यांनी
मला प्रेरणा मिळाली.त्या सगळ्या आदर्श स्त्रिया तुमच्याही आदर्श आहेत. त्यांची
कीर्ती जगजाहीर आहे. त्यांचे मोठेपण सर्वांना मान्य आहे.
प्रथम वंदन तूज गणराया असे
म्हणत कोणत्याही कार्याची सुरुवात करतो. ज्या स्त्रीने शिक्षणाचा पहिल्यांदा श्री
गणेशा केला अश्या स्त्रीचा उल्लेख सुरुवातीला करणार आहे. त्या म्हणजे सावित्रीबाई
फुले. त्यांनी देश स्वतंत्र होण्याआधी महिलांना स्वतंत्र होण्याचा शिक्षणाद्वारे मार्ग
दिला होतो. पूर्वीच्या काळी मुलींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असा कोणताच हक्क तिला
नव्हता. तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय पुरुषप्रधान वर्ग करत असे.सावित्री बाईनी
त्या काळात स्वत: शिक्षण घेतले. आणि मुलींची शाळा सुरु करण्यात मोठा हातभार लावला.
मुलींना शिक्षण देण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या, लोकांनी त्यांच्या अंगावर शेण
फेकले, शिव्या दिल्या तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्या काळातील लोकांनी
सगळ्या प्रकारे त्रास देऊन पहिला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
मला असे वाटते की आज आपण
सगळ्या स्त्री शिक्षण घेत आहोत, त्यामागे सावित्रीबाईचे कष्ट आणि त्याग आहे. पण आपण
त्यांना विसरलो आहोत असे वाटते किंवा त्यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळत
नाही. नव्या पिढीच्या मुलींना तर त्यांचे नावही नीट माहित नाही. मला आठवते जेव्हा
पुणे विद्यापीठाचे नामविस्तार करण्यात आले तेव्हा सावित्रीबाईचे नाव का ? असा
माझ्या सुशिक्षित मैत्रीणीला प्रश्न पडला होता. का नको असे विचारले तर त्यांचे
कार्य चांगले आहे पण पुणे विद्यापीठच चांगल होत. पुणे विद्यापीठ म्हणताना कसा
पुणेकर असल्याचा माज वाटतो. असे एकीने सुनावले होते. पण त्यावेळी आणि आजही माझे
उत्तर हे आहे की ज्या स्त्रीने मुलींच्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन केला तिला
आपण काय दिल? उपकार म्हणून फक्त एका विद्यापीठाला नाव दिल तर फार मोठ कार्य नाही .
पण निदान सुरुवात तरी झाली याच समाधान आहे.
सावित्रीबाईचा सगळा इतिहास
जगजाहीर आहे पण पुन्हा आजच्या पिढीला समजून सांगावा लागेल, ज्यामुळे त्यांच्या
कार्यांची जाणीव तरी आमच्या पिढीला आणि भविष्यातीलही पिढीला राहील. माझ्यासाठी सावित्रीबाईचे
संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी भावना एका ब्लॉगमध्ये तर कधीच मांडता
येणार नाही. तरीही अगदी थोडासा आढावा घेतला कारण प्रेरणादायी स्त्रियांमध्ये
सर्वांत महत्त्वाचे नाव आहे .
दुसरे नाव आहे साधना ताई
आमटे याचं, त्यांना बाबा आमटे यांची पत्नी म्हणून सगळे ओळखतात पण सामाजिक क्षेत्रात
त्यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांचा समाज
कल्याणासाठीचा त्याग याविषयी ऐकले आणि त्यांचे पुस्तक समिधा वाचायला घेतले. तेव्हा
वाचताना त्यांच्या जीवनकथेचा अनुभव घेतला आला. त्यांचे कष्ट आणि कुष्टरोगी यांची केलेली
सेवा व आनंदवनाचे बदलते स्वरूप आणि बरेच काही. पुन्हा एखादी स्त्री असा त्याग करणार नाही असे वाटत असतानाच माझी
ही धारणा त्यांच्याच सुनाकडून मोडली गेली. मंदा ताई आमटे यांनी आपल्या सासूबाईचा
वारसा उत्तम पद्धतीने पुढे नेला. सासू सुनेची चढाओढ अनेक घरात पाहायला मिळते, मला
वाटते या दोघीतही चढाओढ आहे पण समाज कल्याणासाठी, समाज सेवेसाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी
त्याग करण्याची. आज अश्या अनेक स्त्रियांची गरज आहे. आजही दानिन्यासाठी आणि मानपान
याहून लग्न मोडतात तेव्हा या स्त्रियांचा आदर्श घ्यावा.
मेघा पाटकर अजून असेच एक नावं
.त्या पंचतारांकित समाजसेवक नाहीत अगदी साधी साडी नेसलेल्या पण अत्यंत धाडसी
समाजसेविका आहेत . नर्मदा बचाव आंदोलन याच्या बातम्या पाहून त्यांची चाहती झाले.
आपण पण समाजसेवा क्षेत्रांत काम केले तर असेच चिकाटीने करायचे असे ठरवले होते. एक
वेळ गुजरातला जाऊन त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं असे ठरवल होत. पण परवानगी नाही
मिळाली, मग बसले गप्प. सामाजिक इंटरशिप करताना गुजरातला जायची संधी होती पण तीही
कारणास्तव ती चुकली. पण मेघाताई यांच्या कार्यापासून नेहमी प्रेरणा मिळत राहिली.
एवढे मोठे आंदोलन सुरु करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम
केले . त्या नेहमी गरीब आणि गरजू लोकांसोबत काम करतात. मग शहरातील झोपडपट्टीतील लोक असो
वा लावासातील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी तयार असतात. त्यांची साधी राहणी आणि
उच्च विचारसरणी यामुळे त्या सगळ्यांसाठी नेहमी प्रेरणादायी आहेत. म्हणूनच माझ्याही.
या
सगळ्या स्त्रियांना भेटण्याचा कधी योग आला नाही पण त्यांचे कार्य बरेच काही शिकवून
गेले. अश्या अजून काही स्त्रिया आहेत त्यांचा उल्लेख पुन्हा कधीतरी ....
उद्या
दसऱ्याचा सण आनंदाचा आणि उत्साहाचा .... म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आणि उत्साह
देणाऱ्या सगळ्या मैत्रिणीच्या आठवणीना उजाळा द्यायचा विचार आहे ... मग भेटू
उद्या...
No comments:
Post a Comment