Tuesday, 20 November 2018

पॅडवूमन....



 सणासुदीत तिला लांब ठेवले जाते. देवघर असो की स्वयंपाकघर दोन्हीपासून चार हात लांब राहायचे तिने. मासिक पाळीच्या त्या चार दिवसात अपवित्र ठरवून बाहेर बसविलेल्या कुठल्याही स्त्रीची मानसिक घालमेल संपता संपत नाही.

 पण जी हा कचरा वाहून नेते तीच काय ? तिला कोणत्या नजरेला सामोरे जावे लागत असेल रोज ? कोणती वागणूक मिळत असेल.

पाचवीला दारिद्र्य पुजलेले अशा घरात जन्माला आली संगीता चितारे. अगदी लहान वयात लग्न झालं आणि मग दोन मुलं. असा संसार सुरू झाला .नवरा मोलमजुरी करून संसार चालवत होता. संगीता मात्र अभ्यासात हुशार असल्याने पुढचं शिक्षणही चालू ठेवून बारावीची परीक्षा दिली. लहानपणापासून शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे बी. एड.पदवी  घेतली. त्याकाळी कॉलेजमध्ये   हुशार मुलींमध्ये संगीताचा पहिला - दुसरा नंबर असायचा .कॉलेज संपून बरेच दिवस झाले पण काही  नोकरी मिळत नव्हती . नवऱ्याच्या एकट्या जीवावर संसार काय उभारी घेत नव्हता. नोकरीसाठी रोज नेते मंडळी आणि मंत्र्याच्या कार्यालयाच्या पायर्‍या चढत होती. पण नोकरी काही लागेल . खचली नाही आज ना उद्या मिळेल एकेक दिवस पुढे ढकलत होती. नवरा दोन पैसे कमवत होता. म्हणून घरीच मुलांचे संगोपन करत संसारात रमु लागली. एक दिवस तिला दौंड येथील शाळेतून फोन आला .  कामाला सुरुवात झाली, पण काम कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे निम्माच पगार मिळू लागला . तरीही सुरुवात आहे म्हणून सहा वर्ष काढली .त्यानंतर कायम स्वरुपी  कायमस्वरूपी जागा निघाल्यावर त्यासाठी शाळे कडून पैसे मागण्यात आले. सहा ते सात लाख रुपये कुठून भरायचे त्यामुळे काम सोडून दिले दुसरीकडे नोकरी लागेल या विचाराने आणखीन सहा-सात महिने निघून गेले . एक दिवस नियतीने घाला घातला. संगीताताईच्या  पतीचे अल्पशा आजारपणाने निधन झाले. सगळा संसार उघड्यावर पडला.  हसती खेळती दोन मुले आणि उघड्यावर पडलेला संसार सांभाळत संगीताताई पुन्हा उभ्या राहिल्या.
आता मात्र रोज नवीन संघर्ष सुरू झाला घरात खायला कण नाही आणि हाताला कुणी काम देईना अशा अवस्थेत माहेरून थोडीफार मदत झाली आणि सहा-सात महिने कधी निघून गेले कळले नाही. दरम्यान मनपाच्या शाळेत शिक्षक भरती सुरू होती. यासंदर्भात स्थानिक नेत्यांना कामा संदर्भात वारंवार विनंत्या करून झाल्या . पण पैसे भरल्याशिवाय नोकरी नाही त्यांना सांगण्यात आले. हातात पदवी असून नोकरी मिळत नव्हती . तसेच मूलही मोठी होऊ लागली होती. कामाशिवाय पर्याय नव्हता धुण- भांडी करणे मनाला पटत नव्हते. शिक्षणाचा उपयोग करून कुठल्यातरी कार्यालयात काम करावे प्रयत्न सुरू होते. एक दिवस संस्थेचे काही लोक कामासाठी महिला शोधत होते. कामासाठी सगळ्याजणी हो म्हणत होत्या पण कामाचा स्वरूप पाहून कुणीही पुढे सरसावत नव्हतं. कारण ते काम होतं सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे. संपूर्ण वस्तीमधून फक्त संगीताताईंनी कामाला होकार दिला न देऊन करतील तरी काय घरात पोरांच्या पोटात पडलेली आग विजवण्यासाठी शिकल्या-सवरल्या आईने आज एक पाऊल पुढे उचललं होतं. पदवी घेऊनही जर काम मिळत नसेल आणि पोरांची पोट भरता येत नसेल ही पदवी तरी काय कामाचे हा विचार करून त्यांनी कामाला होकार दिला.

 नोव्हेंबर 2014 मध्ये कामाला सुरुवात झाली. अगदीच अत्यल्प मानधनात काम सुरू केले. घरोघरी जाऊन सॅनेटरी नॅपकिन जमा करणे आणि जमा केलेले नॅपकिन डिस्पोजल मशीन मध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावणे. अशा स्वरूपाचं काम संगीता ताई गेली चार वर्ष करत आहेत.  महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन रोज सॅनेटरी नॅपकिन गोळा करून आणतात. प्रोजेक्ट मध्ये जाऊन त्याचे वर्गीकरण करून त्यानुसार त्याची विल्हेवाट लावतात. कचरा उचलतात त्यापेक्षाही हीनदर्जाचे समजले जाणारे हे काम त्या गेल्या अनेक वर्षांपासून करतात. नॅपकिनची विल्हेवाट लावताना अतिशय घाणेरडा वास येतो त्यामुळे संगीता ताई सकाळी नाष्टा करून येतात ते रात्री घरी गेल्यावर जेवतात. कामाच्या ठिकाणी पाणी प्यायची इच्छा होत नाही असे सगळे वातावरण आजूबाजूला असते. कचरा प्रकल्पात एका कोपऱ्यात सॅनेटरी नॅपकिन डिस्पोजल साठी एक छोटीशी रूम बांधून दिलेली आहे त्यामध्येच एक मशीन आहे त्यावरही सगळे काम सुरू असते. ती मशीन हाताळणे हे कौशल्याचं काम आहे त्या मशीनमध्ये योग्य प्रमाणात घेतले जातात आणि योग्य तापमानावर त्यांची विल्हेवाट लावली जाते हे अतिशय किळसवाणे काम अत्यंत कौशल्यपूर्ण करत असतात. मशीन मध्ये फक्त कागद आणि सॅनेटरी नॅपकिन त्याची विल्हेवाट लावली जाते. चुकून जरी प्लास्टिक आत मशीनमध्ये गेले तर काम बंद पडते .त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक आलेल्या कचऱ्यातून वर्गीकरण करून सॅनेटरी नॅपकिन काढून आणि मशीन मध्ये टाकावे लागतात.आता मात्र त्यांचा मुलगा त्यांच्या मदतीला येत आहे. त्यामुळे त्या अधिक क्षमतेने काम करू शकतात. 

संगीताताई यांनी सांगितले की ,हे काम अतिशय हीन दर्जाचे समजले जाते परंतु समाजाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे काम आहे. आम्ही कचरा गोळा करायला गेलो की अनेक महिला आणि पुरुष आमच्या पासून चार हात लांबून चालतात. यामुळे जुन्या काळात जशी दलितांना वागणूक मिळत होती त्याची अनुभूती मिळते. काही लोक तर लांबून जा असेच सांगतात. आपल्याकडे मासिक पाळी आधीच अपवित्र समजली जाते त्यात वापरण्यात येणारी नॅपकिन ही अपवित्र आणि तो कचरा नेणारे लोक ते तर अधिक अपवित्र समजले जातात. माणसासारखे माणसाने पण ज्या पद्धतीने वागणूक मिळते ते पाहून अनेक वेळा डोळे भरून येतात पण पोटाची आग डोळ्यातलं पाणी मिटून घेते. मी पुन्हा कामाला लागते. रोज सगळ्या जगाची घाण आम्ही साफ करतो तेव्हा खूप  वाईट वाटते पण त्यातून मिळणाऱ्या पैशामुळे माझ्या पोरांची फोटो भरतात . मुले शिकून ती मोठी होतील या आशेने मी पुन्हा दुसर्‍या दिवशी कामाला येते. घरची परिस्थिती यामुळे मुलगा पुढे  शिकू शिकला नाही आता मला मदत करतोय यातच समाधान आहे. आपले शहरांमध्ये हजारो टन कचरा जमा होतो त्याची योग्य विल्हेवाट लावायला आपली यंत्रणा कमी पडत आहे आमची संस्था आणि आम्ही यासंदर्भात जनजागृती करत आहोत परंतु अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. तेव्हाच कुठे आम्हालाही थोडा सन्मानाने जगता येईल. आम्हाला मिळणारी हीनतेची वागणूक कमी होईल. अनेक वर्ष मी माझी ओळख लपून काम केले. समाज काय म्हणेल माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांना जर कळालं तर मी एवढी शिकूनही असे काम करते याची भीती होती. एक दिवस ठरवलं पोटासाठी काम करतोय चोरी नाही, काय काम करतोय सांगायला लाज कसली बाळगायची. आणि मी बिनधास्त काम करू लागले.

संगीताताईचे काम पाहून घोरपडी गावात रणरागिणी संस्थेच्यावतीने महिलादिनानिमित्त त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जमलेल्या महिलांना त्यांच्या कामाची माहिती देत होत्या.त्यावेळी अनेक महिलांनी नाक मुरडले. पण जेव्हा त्यांनी हे काम करण्यामागील त्यांची कहाणी सांगितली. तेव्हा मात्र अनेकजणींना रडू आवरले नाही. घोरपडी गावातील त्या छोट्याश्या गल्लीत हा सगळा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पाहुणे रडतात आणि जमा झालेले प्रेक्षकही रडत आहेत. असे दृश्य कदाचित पाहायला मिळते. या सगळ्यांना संगीताताईसाठी काहीतरी करायची इच्छा होती. संगीताताईने आयुष्यात पहिल्यांदा एवढा सन्मान पाहिला होता. कुणीतरी त्यांचा आदर करत आहे म्हणून त्यांना भरून आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यात कितीतरी वेळ माझ्यापाशी येऊन धन्यवाद बोलू लागल्या. आजवर मला ज्या समाजाने नाकारलं होतं, त्यांनीच माझा सत्कार केला यासाठी  माझे आभार मानू लागले होते. माझ्यासाठी त्यांना या समाजाने स्वीकारले हीच मोठी गोष्ट होती.

कालपरवाच त्यांची मी चौकशी केली काम कसे सुरु आहे असे विचारल्यावर त्या म्हणाल्या दोन महिने झाले घरीच बसू आहे, काम बंद झालं. घरात जाणवणारे मी आणि माझा मुलगा दोघेही घरी आहोत. पहिल्यापेक्षा जास्त वाईट अवस्था झाली. आमच्या संस्थेचं कॉन्टॅक्ट रद्द झाले पण दुसरी संस्था मला काम देणार आहे . हा त्यांचा जीवनाकडे असलेला आशावाद मन जिंकून घेतो .तरीही दुसर काम असेल तर सांगा कारण दोन महिने झाले एक वेळ जेवण करून दिवस काढत आहोत . मुलाला पण बघा काम तो कमवू लागला तरी जरा किती बदलेल. हा त्यांचा जीवनाविषयी असलेला आशावाद मन जिंकून घेतो.

अशा कष्टाळू आणि आशावादी महिलांकडे पाहिलं की वाटतं कितीही संकट आली तरीही त्या उभ्या आहेत नवीन आशेवर आणि जिद्दीवर . नाहीतर आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी साठी आत्महत्या करणारी माणसे खूप आहेत त्या सगळ्यांनी अशा संगीताताई कडून जगण्याची उमेद घ्यायला काय हरकत आहे.

                                           (घोरपडीमध्ये रणरागिणी संस्थेने सत्कार करताना...)

Saturday, 17 November 2018

उद्योजक आईची कथा


एक.... दोन...तीन..... मोजता न येणाऱ्या अशा अनेक संकटाला सामोरे जाणारी रणरागिणी... संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षगाथा. अशा धाडसी आणि कर्तृत्ववान महिला म्हणजे सुजाताताई शहा. नशिबाने खूप काही हिरावले पण कष्टाच्या आणि जिद्दीने जोरावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. आणि आज त्या यशस्वी उद्योजक म्हणून कार्य करत आहे. सर्वात जास्त सेल करणाऱ्या पेट्रोलपंपाच्या मालकीण म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.

ही ओळख बनवणे एवढे सोपे नव्हते, अत्यंत खडतर प्रवास करून त्या आजच्या पदावर पोहचल्या आहेत. बालपणी पाच बहिणी आणि भावासोबत हसत- खेळत चालू असताना देवाने त्यांची आई हिरावली पण आत्याने त्यांचा आणि भावंडाचा मायेने सांभाळ केला. वडिलांचे  दुकान असल्यामुळे वाढत्या वयानुसार त्यांना दुकानातील बारकावे शिकायला मिळाले आणि व्यवसायाचे बाळकडू इथून मिळाले. वडील आणि आत्या जर दुकानावर नसतील खंबीरपणे त्या दुकान सांभाळत असत. व्यवसायाचे धडे मिळत असले तरी वकील होण्याचे स्वप्न त्या पाहू लागल्या. आणि त्यानुसार अभ्यासात प्रगती सुरु होती. एक दिवस अचानक बहिणीने आंतरजातीय विवाह केला आणि सगळी परिस्थिती बदलली. ७०च्या दशकात एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या कुटुंबाला गावातील लोक एकप्रकारे वाळीत टाकत. त्यामुळे सुजाताताईचे घराबाहेर पडणे आणि कॉलेज बंद झाले, बारावीची कशी बशी परीक्षा दिली. तेव्हा ओळखीच्या पाहुणे वडिलाला भेटायला आले आणि त्यांनी पुण्यातील निरंजन शहा त्याचे स्थळ सुचवले. काही दिवसांतच सुजाताताई निरंजन शहा यांच्या अर्धांगिनी बनून पुण्यात आल्या. शिक्षणाची खूप इच्छा होती पण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संसाराचा गाडा चालवताना त्यांना स्वत: इच्छा बाजूला ठेवावी लागली. लातूरहून पुण्याला आल्यावर त्यांचा वेगळा प्रवास सुरु झाला.पुणे आणि लातूर मधल्या सांस्कृतिक आणि इतर बदलाने त्यांना पुण्यात रमायला उशीर लागला पण त्यांनी इथल्या पद्धती शिकून घेतल्या. हॉटेलमध्ये जाणे म्हणजे पाप अशी लातूरमध्ये समज होती. तरीही आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी खाल्ली. पुण्यात रस्ता क्रॉस करणे, फोन डायल करणे अशा अनेक नवनवीन त्या गोष्टी पुण्यात आल्यावर शिकल्या.

संसार सुरळीत होता पण त्यांच्या डोक्यात आपण काहीतरी स्वत:च कराव असे सारखे वाटत असे. त्याचवेळी दुकानाची वाटणी झाली आणि स्वता:चे दुकान सुरु झाले. सुजाताताई स्वत:च्या किराणा दुकानातील सगळे छोटे छोटे काम करत असत. ते काम करताना त्यांना आनंद मिळे. काम करताना त्यांना बराच वेळ तेव्हा त्या पुस्तक वाचन आणि स्वेटर विणणे अशी बारीकसारीक काम करत. संसाराचा गाडा छान सुरु होता पण त्याला काही नवीन पालवी येत नव्हती. लग्नाच्या बारा वर्षानंतर सुजाताताईच्या घरात पाळणा हलण्याचे संकेत मिळाले. त्याचवेळी त्यांचा नवरा अचानक आजारी पडला. तपासणीतून एक किडनी फेल झाल्याचे समजले. दुसरी लहानपणापासून छोटी असल्यामुळे ती असून उपयोग नव्हता. तेव्हा पुण्यात किडनीच्या शस्त्रक्रियेची सुविधा नव्हती. शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचार सुरु होते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले. सुजाताताई पुन्हा एकट्या पडल्या. 

दुकान आणि इतर सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. पती गेल्यावर संपत्तीवरून सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबातील वाद वाढत असल्याने त्यांच्यावर गर्भवती असताना प्रचंड तणावाला सामोरे जावे लागले. अशाच वातावरणात सुजाताताईनी गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी सुनिशा असे मुलीचे नाव ठेवले. चार महिन्याची असताना मुलीला अचानक कावीळ झाला. मुलगी पाच दिवस कोमात गेली. जेव्हा ती कोमातून बाहेर आली तेव्हा तिच्या हालचाली सामान्य वाटत नव्हत्या. हात – पायाची हालचाल कमी झाली. घरी आणण्यावर तिची काळजी घेण्यासाठी राजू नावाचा मुलगा मदत करायचा. अगदी लहानपणीच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो सुनिशाला रोज दवाखान्यात घेऊन जात असे. काही दिवसांनी ती उपचाराला प्रतिसाद देऊन ती हळूहळू ती चालायला शिकली. ३-४ वर्षाची झाल्यावर बालवाडीत टाकले परंतु तिचे शाळेत मन रमत नव्हते, सारखी रडायची. कसेतरी एक काढल्यावर चांगले शिक्षण मिळावे म्हणून नुमवी शाळेत टाकले चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर तिथला अभ्यास आणि धावपळ जमेनासे झाले. त्यासाठी घराजवळ एका शाळेत टाकले तिथल्या गोडबोले शिक्षकांनी तिला अगदी मुलीप्रमाणे सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली हळूहळू तिची प्रगती सुरु झाली. त्या शिक्षक शाळा सोडून परदेशात गेल्या. त्यानंतर तिला शाळेत जावेसे वाटत नव्हते. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. अशा पद्धतीने तिची शाळा सुटली गेली...


सासू-सासऱ्याची साथ असताना मुलगी दहा महिन्याची असताना सासू एका अपघात गेल्या . काही दिवस सासरे राहिले. काही आत्या राहिल्या अशा पद्धतीने जीवन पुन्हा झाले. मुलीला सांभाळायला राजू होता . तो दिवसभर मुलीचे जेवणापासून सगळे काम करत असे. त्या पुन्हा पोटपाण्यासाठी दुकानावर बसत. त्याच बरोबर त्यांच्या नवऱ्याने सिंहगड रोड काही जागा घेतली होती तिचा व्यवहार पूर्ण करून त्यावर नवऱ्याने बंगला बांधायचे काम सुरु केले होते  त्यांचे स्वप्न पूर्ण करताना खूप धावपळ झाली. परंतु सगळ त्या जिद्दीने करायच्या. कधी थांबायच्या नाही. अडचण, संकट आले की त्यावर उपाय शोधून पुढे जायचे एवढे उद्दिष्ट ठेऊन आपले काम करत राहायच्या. पुढे रोडलगत जागा असल्याने त्यांना ती विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी अनेकजण विचारत असत. त्यांनी याकडे काही दिवस फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी त्यात दिसणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन त्यांनी एकजणाला जागा भाड्याने द्यायला तयार झाल्या. तो व्यक्ती तिथे पेट्रोलपंप टाकणार तेव्हा इंडियन ऑईल कंपनीच्या लोकांनी तुम्ही स्वता:च पेट्रोलपंप टाका असे सुचविले . सुनिशाची जबाबदारी अन्य बाकी कामामुळे जमेल का  अशी शंका होती. करून पाहू असा विचार करून त्या पेट्रोलपंपासाठी मुलाखतीला गेल्या तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की ३००० टार्गेट दिल तर किती महिन्यात किती सेल दुप्पट करणार . त्यांनी उत्तर दिले की २-३ महिन्यात ५००० लिटर सेल करू असे उत्तर दिले. त्यावर अधिकारी म्हणाले एक –दोन महिन्यात कसा एवढा सेल करणार ? सुजाताताई म्हणाल्या. आमच्या रोड दररोज आरटीओच्या आकडेवारीनुसार अंदाजे काही हजार गाड्या जातात त्यातील १० % लोकांनी जरी पेट्रोल भरले तरी मी माझे टार्गेट पूर्ण करू शकेल. सुजाताताईचा आत्मविश्वास पाहून त्यांना पेट्रोलपंप मिळाला. परंतु राजकीय लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. एक महिला पुढे जात असताना पुरुषी अहंकार दुखावला जातो. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला. रहिवासी लोकवस्तीत पेट्रोलपंप होऊ नये म्हणून स्थानिक राजकारणी लोकांनी आयुक्तांना पत्र पाठवून तक्रार केली. त्याला उत्तर म्हणून सुजाताताईनी पेट्रोलपंपची स्थानिक नागरिकांनीची मागणी असलेले पत्र आयुक्तांना दाखवले.


पेट्रोलपंप सुरु झाल्यावर स्थानिक राजकारण्यांनी अनेक कुरघोडी केल्या. अनेक खोटे ग्राहक येऊन भांडणे करायचे. एकजण पेट्रोलमध्ये पाणी म्हणून गोंधळ घालू लागला. लोक आणून तुमचा पंप बंद पडू. असे म्हणाला तेव्हा चाळीस लोक घेऊन  आला वाद करू लागला. सुजाताताईनी पोलिसांना बोलविले आणि त्यावेळी माझ्या पंपावरून पुन्हा पेट्रोल भर त्यात पाणी असले तर मी पंप बंद करते पण नसेल तर तुझ्याविरोधात तक्रार करणार असे सांगितले. तेव्हा त्याला राजकीय नेत्याचा फोन आला माझा गैरसमज असे म्हणत लोक घेऊन मागे फिरला. तेव्हा सुजाताताई त्याच्या विरोधात तक्रार करणार तेव्हा त्या माणसाने माफी मागितली.  सुजाताताईनी मोठ्या मनाने माफ केले. अशाच प्रकारे अनेक ग्राहक आणून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला गेला. पण त्या अशा संकटावर अगदी हुशारीने तोडगा काढत आणि पुढे जात म्हणून आजही त्यांचा सर्वात जास्त सेल करणारा पेट्रोलपंप आहे.

सगळे सोंग करता येते पैश्याचे करता येत नाही. याप्रमाणे सुजाताताई यांना एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका बँकेत ४५ लाख होते ती बँक अचानक बंद पडली. आता करणार काय असा प्रश्न होता. कामगार रडायला लागले आम्ही ३-४ महिने बिनपगारी काम करू असे म्हणाले. तेव्हा बँक मनेजरचा फोन आला असाल तश्या या चेक द्या . आपले लोकांशी चांगले संबंध असतील ते लोक मदत करतात. बँक मनेजर फोन केला म्हणून संध्याकाळपर्यंत माझे पैसे मला मिळाले नाहीतर खूप अवघड झाले असते. कारण इंडियन ऑईलमध्ये उधारीवर काम होत नाही. पुढे ती बँक सहा महिन्यानंतर फेडरल बँकेत विलीन झाली. आयुष्यातील सर्वात आर्थिक संकट फक्त चांगल्या संवादामुळे सहज सुटले.

पंप सुरु केल्यापासून अनेक लोक जून काम पंपावर काम करतात.  नितीन नावाचा व्यक्ती पेट्रोल टाकणारा आज पंपाचा मनेजर झाला. शिकायची इच्छा असेल तर माणूस कुठल्याही पदाला पोहचू शकतो याचे उदाहरण म्हणजे नितीन. पंपाची सगळी जबाबदारी तो एकदा समर्थपणे निभावतो. त्यामुळे मला जरा निवांत वेळ मिळतो. वर्षातून एकदा  सगळ्यांना घेऊन ट्रीपला जाते. अनेकांनी समुद्र कधीही पहिला नव्हता त्यांना पाहायला मिळाला. त्यांच्यासोबत मी ट्रीपला जाते. कामगारासोबत खाते –पिते म्हणून कधीही आमचे मालक आणि कामगार राहिले नाही. एका कुटुंबातील सदस्य आहोत असेच वाटते. अशाप्रकारे कामगाराला योग्य सुविधा दिल्याने कामगार खुश असतात. सगळ्यांना पीफ, आरोग्य विमा, विमा अश्या सर्व सुविधा देते त्यामुळे सगळेजण व्यवस्थित काम करतात.स्वच्छता हा आमचा धर्म असल्यासारखे आम्ही काम करतो. पंपावर स्वच्छेतेसाठी माणूस नाही सगळ्यांनी झाडू मारायचा. रोज सकाळी प्रार्थना होते त्यानंतर मी स्वत: चहा करून देते. ५० कर्मचारी काम करतात दोन शिफ्ट मध्ये काम चालते. दिवाळीला सर्वाना कुटुंबासोबत आम्ही पंपावर बोलवतो त्यांना पूजा कार्याला लावतो. ड्रायव्हर गाडीची पूजा करतो तर पेट्रोल सोडणारा पंपाची त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण असते.


 आर्थिक स्थिरता आल्यावर सामाजिक कामाकडे मन वळले. एकदा गांधी भवन येथे गेल्यावर अंध मुलींनी जेवण देत असत. एकदा त्या मुलीची चर्चा ऐकली त्यांना आवडले पदार्थ त्या एकमेकींना सांगत होत्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सुजाताताईला खूप छान वाटले. सुजाताताईना त्या मुलींनी कानातले दाखवले, कपडे दाखवले. आम्ही किती छान दिसतो ना अशा बोलत होत्या. तेव्हापासून त्यांनी रडायचे बंद केले आणि कोणाला रडू पण देत नाहीत. अशा अनेक मैत्रिणी आणि कामगार यांना त्या समजून सांगतात कि रडल्यावर तुमचे दुख कमी होत नाही मग त्यावर उपाय शोधा. अशा प्रकारे अनेक सामाजिक कामात मदत करत असतात. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतो पण ते कार्यक्रम पंपवर करतो कारण इथल्या कर्मचार्यांना त्यात सहभाग घेता यावा. या १५ ऑगस्टला परिसरातील शाळेत आम्ही फळा देणे, बेंच दिले. मोठा कार्यक्रम केला. असे अधूनमधून चालूच असते.

शेवटी बोलताना म्हणल्या की, व्यवसाय आणि सामाजिक कार्य छान सुरु आहे आता आयुष्यच असेच चालू ठेवायचे आहे. एकच इच्छा आहे की माझ्या मुलीचे लग्न करायचे मला तिची काळजी आहे. ती संसाराला चांगली कि मी माझ्या जबाबदारी थोडी मोकळी होईल. असे बोलताना त्याचे डोळे पाणावले आणि आम्ही निशब्द झालो.

अशा कर्तृत्ववान , धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी स्त्रीला, प्रेमळ मालकीण आणि हिंमतीवान आईला पाहिल्यावर अनेकजणीना प्रेरणा मिळते. 

Wednesday, 9 August 2017

तरुणाईची यात्रा: डायरी ऑन व्हील


  सर्वसामान्य स्त्री जेव्हा शासकीय अधिकारी होते तेव्हा ती आपल्या कामाला  पूर्ण  न्याय देत असते. तो न्याय देण्यासाठी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत असते आणि पाहत असते. अशाच एका नवीन गोष्टीच्या शोधत असताना विद्युत वरखेडकर यांना जागृती यात्रेची माहिती मिळाली आणि त्या जागृती यात्रेत सहभागी झाल्या. यात्रेहून आल्यावर त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शेकडो सकारात्मक तरुणाई आणि त्यांचे काम पाहून त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली. यात्रेतून परत आल्यावर त्यांनी घरच्याना आणि मित्रमंडळीना जागृती यात्रेची गोष्ट्र सांगितली. यात्रेविषयी बोलण्यासारखे खूप काही होते,पण काय सांगणार आणि काय नाही असा प्रश्न पडत असे. तेव्हा त्यांनी यात्रेविषयीचे अनुभव एकत्रित मांडण्याचा विचार केला. यात्रेत आलेले अनुभव आणि सकारात्मक तरुणाईकडून घेतलेली प्रेरणा यातून ‘डायरी ऑन व्हील’ या पुस्तकाची निर्मिती झाली.  

 पुस्तकाच्या लेखिका या शासकीय पदावर मोठ्या अधिकारी आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विद्युत वरखेडकर सर्वांना परिचित आहेत. जागृती यात्रेमुळे त्यांच्यातील लेखिका ही जगासमोर आली. ‘डायरी ऑन व्हील’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार विजय नाईक, जागृती सेवा संस्थापक शशांक मनी त्रिपाठी, माणदेशी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना गाला सिंह आणि इंडियन रिसर्च अकॅडमीच्या प्रमुख डॉ. शबाना खान आदि मान्यवर उपस्थित होते.

यात्रेमुळे विद्युत वरखेडकर यांना संपूर्ण देशातील आणि परदेशातील विविध तरुणाईशी संवाद साधता आला. त्यांच्या कामाबद्दल माहिती घेता आली. अनेक नवउद्योजक त्यांच्या संकल्पना घेऊन यात्रेत आले होते. उद्योगाचा विकास यावर त्यांचे विचार आणि संकटावर मात करण्यासाठी राबविलेले उपाय अशा अनेक गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्या. यात्रेत प्रत्येक दिवस त्यांना एक वेगळीच उर्जा मिळत राहिली. हीच उर्जा पुस्तक लिहिताना खूप उपयोगी पडली. अशा प्रकारे या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकातून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. अशी आशा विद्युत वरखेडकर त्यांना वाटते.



यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आजूबाजूच्या सकारत्मक वातावरणामुळे नवीन जिद्द मिळत असते. शासकीय अधिकारी म्हणून एक गोष्ट फार महत्वाची वाटते की देशातील तरुणाई जर देशाच्या विकासाचा विचार करत असेल तर त्यांना देशातील मुख्य प्रश्नांशी जोडले पाहिजे म्हणजे त्यांच्या विचारातून हे प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल. अशा तरुणाईला आवश्यक मार्गदर्शन आणि त्यांच्या निर्मितीला हातभार लावणे हेच यात्रेचे उद्दिष्टे आहे. असे विद्युत वरखेडकर यांनी सांगितले.

२००८ सालापासून ही यात्रा सुरु झाली आहे. यात्रेच्या दरम्यान सुमारे 8000 किलोमीटरचा प्रवास केला जातो. देश-परदेशांतील सुमारे ४००-५००नवउद्योजक या यात्रेत सहभागी होऊन सामाजिक व व्यावसायिक उद्योजिकता प्रशिक्षण घेत असतात . यात्रेदरम्यान हा युवावर्ग अनेक नामवंत व्यक्तींशी संवाद साधतो. ज्यामध्ये अरविंद आय केअरचे डॉ. अरविंद, ग्राम विकास, संस्थेचे जो माडीयेथ, आणि गुंज संस्थाचे अंशू गुप्ता अशा अनेक दिग्गज व्यक्तीसोबत चर्चा करताना त्यांना देशातील काही जटील समस्यावर सोपी, कायमस्वरूपी उपाययोजना कशी राबविली याचे प्रशिक्षण मिळते. यामधून तरुणांना उद्योगशीलतेला प्रेरणा मिळते. यामध्ये ग्रामीण आणि शहरातील उद्योगशील तरुण सहभागी होतात. उद्योगातून देशासाठी मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून दिली जाते. अशा व्यक्तींकडून युवकांनी प्रेरणा घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारावा व देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान द्यावे असा या यात्रेचा उद्देश आहे.

जागृती यात्रा दरवर्षी 24 डिसेंबरला मुंबईतून सुरु होते. देशातील विविध 10 रोल मॉडेलला भेट देत 8 जानेवारीला यात्रा परत मुंबईत येते. त्यामध्ये अंदाजे 40% महिला सहभागी होतात तसेच काही दिग्गज व्यक्तीही यात्रेसोबत असतात. या युवकांमधून रोजगार देणारे तयार व्हावे, त्यांनी आपल्या परिसरात काम सुरु करून तिथल्या समस्या सोडवाव्या. आतापर्यंत 3700 युवकांनी या यात्रेचा लाभ घेतला असून पाचशेहून जास्त लोकांनी स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु केला आहे. ते उद्योग कृषी, आरोग्य, उर्जा, पाणी-स्वच्छता, वास्तुनिर्माण, शिक्षण अशा सात क्षेत्रात विस्तारले आहेत.

यात्रेच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक युवकाने डायरी ऑन व्हील’ हे पुस्तक जरूर वाचावे.

Thursday, 6 July 2017

लघुकथा - अपूर्ण राहिलेलं प्रेम....

एक अपूर्ण

टीव्हीवर तो दिसताच घड्याळाचे काटे काही महिने मागे फिरू लागले.अचानक सल टोचावी तसे डोळे घट्ट मिटून टीव्ही बंद केला. समोर पडलेले वर्तमानपत्र चाळताना पुन्हा तेच. जगातील सर्व सुख पायाशी लोळत असतानाही ती दु:खी. त्याच्यासाठी झोपडीतील मीठ-भाकर खायला तयार असलेली, त्यांच्या एका नकारामुळे अचानक आलेल्या श्रीमंताच्या घरीची मागणी तिला काही करता नाकारता आली नाही. ती सूनबाई झाली पण प्रेमळ पती मिळून पत्नी नाही.त्यांच्या आठवणीने डोळ्यात आलेले अश्रू अनेक काळाने ओघळले असते पण " काय करता राणीसरकार" असा श्रीमंताचा आवाज आला आणि डोळ्यांतील असावं डोळ्यातच राहिली.....

कातरवेळ

अनेक प्रयत्न करूनही नको असलेला तरीही हवाहवासा वाटणारा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. डोक्यातील विचारचक्र सुरु होते. एकमेकांशिवाय न जगण्याच्या आणाभाका हवेत विरून गेल्या होत्या. राहिल्या त्या फक्त आठवणी चांगल्या व वाईटची सरमिसळ असलेल्या. तो आयुष्यातून तर गेला मनांतून काही जाईना. एक दिवस अचानक पुढे दिसला, कातरवेळी नजरानजर झाली पण नाही पण. अचानक जुन्या दुःखाची खपली ओरबडून काढावी तसं काहीसं झालं तिला, एक वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावर यश तेज दिसत होत. तिला ते ओजरत्या नजरेत दिसले. त्याला मात्र फक्त तिच्या गळ्यातले भाळेमोठे मंगळसूत्रच दिसलं. एकही शब्द न बोलता पुढचा प्रवास सुरु झाला. त्यांच्यासोबतच्या आठवणीने अल्पसा आनंद मिळाला परंतु त्याचवेळी घरी असलेल्या श्रीमंताची आठवणही झाली. गैरसमजाने फार मोठी चूक झाली होती दोन जीवाचे मार्ग वेगळे झाले तरीही दुःखाच्या एकच धाग्याने बांधले गेले होते.

एकांत
‘तुझं हास्य आहे मधाळ
करून गेले मला घायाळ
तुला पाहताच हरते भान
मग राहत नाही मी माझी
असते फक्त मी तुझी’
जुन्या सामानात चुरगळलेल्या कागदावरचे शब्द वाचताना डोळे जड झाले होते. या अलिशान बंगल्यात आल्यापासून तिचे समान अडगळीत पडले होते. तिचा आवडता एकांत वेळ तिला मिळत असूनही नको होतो. माहेरी असताना ती एकांत मिळायची वाट पाहत असे. कारण तेव्हा तर तो तिला भेटायचा तिथे नसतानाही फोनवर, मेसेजवर. सगळे मेसेज वाचून वाचून अगदी पाठ झाले होते. आता तोच एकांत असह्य्य करत होतो. इथे मात्र श्रीमंतांना सावकारीतून वेळ मिळत नाही आणि घरात काम नाही.  हाताखाली चार नोकरचाकर. टीव्ही तिला आजकाल आवडत नाही. सगळ्या प्रेमकथेने भरलेल्या मालिका तिला आता रुचत नाही. जे सुटले त्यासाठी रडता येत नाही, आहे त्याचा उत्सव करता येत नाही. अशा कोंडीत सापडलेली ती असावं थांबवू शकत नाही मग दिवसभर ते डोळ्यात जमा होतात आणि डोळ्यातच विसावतात. कारण आता ते राणीसाहेबांच्या डोळ्याला शोभत नाहीत. ती मात्र पुन्हापुन्हा आता तिची भूमिका बदलीय हे विसरून जाते. अशाच विचारांच्या जाळ्यात अडकलेली असताना श्रीमंत तिथे आले हे तिला कळाले नाही. हातातला कागद घेऊन स्मित हास्य करून “छान लिहिलेस, माझ्यावर एवढं प्रेम करतेस ? मी मात्र तुला वेळ देत नाही,मी पुरता अडकलोय बघ कामात. असं म्हणत खोलीत निघून गेले, आणि त्यानंतर बंगल्यात निनावी शांतता पसरते....




सच्चा कलाकार
तिच्या गळ्यातले मंगळसूत्र डोळ्यासमोरून जात नव्हते. इच्छा असतानाही तिला न बोलताच तो पुढे निघून गेला तो फक्त शरीराने पण मनाने तर तिथेच मुक्काम ठाकला होता. ओळखीचा चेहरा असूनही मात्र धुसरसा दिसत होतो, दिसत होते ते फक्त आणि फक्त मंगळसूत्र. विरहाने पूर्णपणे तुटलेला तरीही त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. कारण तो कलाकार होता. वेगवेगळ्या भूमिका करताना आपली खरी भूमिका विसरून गेला होता. तिच्या रूपाने किंचितसा भूतकाळ समोर आला, पण भावनांना आवर कशी घालायची ते त्याच्याकडून शिकावं. खरतरं हाच त्याचा स्वभाव आहे, याच स्वभावामुळे त्याने तिला नकार दिला तेव्हा तो शांत होता. तिच्या रडण्याचा आवाजाने याला पाझर फुटला नाही. तसचं त्याच्या तुटलेल्या हृदयाचा आवाज तर बाहेर येणेच शक्य नव्हते. कदाचित आवाज येऊ न देणे त्याला चांगल जमत. तिच्या अलिशान घराचे आणि चारचाकीचे स्वप्न, पूर्ण होत असेल तर आपण का तिला मोडक्या झोपडीत न्यावे म्हणून त्याने तिला नकार दिला पण तिने हे स्वप्न त्याच्यासोबत पहिले होते. हे तो विसरला होतो. त्या अलिशान स्वप्नात तो नसेल तर ते स्वप्न कसले ? तो तर वनवास. शहरात येऊन काहीच महिने झाले असतील तेव्हा कॉलेजात ती भेटली. त्याच्या कलेवर प्रेम करणारी. त्याच्यातील सच्च्या कलाकाराला दाद देणारी, शहर आपलसं करायला शिकवणारी, त्याच्या सतत मागेपुढे करणारी, काय हवं नको पाहणारी. काही दिवसांत त्याच्यासाठी सरस्व झाली होती.पण हे त्याने कधीच सांगितले नाही. त्याचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसायचं म्हणून तिनेही कधी विचारलं नाही. ही मैत्री कधी तोडणार नाही ना असं जेव्हा ती विचारत असे तेव्हा तो म्हणत " कधीच नाही."
आज मात्र ती फार दूर गेलीय अगदी स्पष्टपणे सांगायचं तर दूर केलीय. तिच्या आनंदासाठी आणि उज्जवल भविष्यासाठी. " एक कलाकार नेहमी फाटक्या झोळीचा,अट्टल सट्टेबाज असतो. लागली तर चांदी नाहीतर मंदी" हा त्याचा आवडला डायलॉग .
आज यशाची पायरी चढताना तिची वारंवार आठवण येतेय, ती सोबत असती तर?.....

Tuesday, 3 January 2017

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या कार्यास व त्यांना विन्रम अभिवादन. ज्यांच्या त्यागामुळे आणि कष्टामुळे भारतीय स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली, त्या सावित्रीबाईविषयी या देशातील हजारो मुलींना माहितीही नाही. शाळेत इतिहासात शिकवतात म्हणून परीक्षेपुरते सावित्रीबाईचे नाव लक्षात ठेवतात. बस्स. काही सामाजिक संस्था, काही समाजातील लोक त्यांना आपले मानतात म्हणून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी तरी साजरी केली जाते. बाकी इतर विशेष करून तरुण वर्ग त्यांना विसरूनच गेला आहे.
आज मात्र गुगल ने त्यांना स्मरणार्थ डूडल बनवून या ‘सो कॉल्ड’ या मुलींना सावित्रीबाईच्या कामाची आठवण करून दिली आहे.
 




पाच वर्षापूर्वी लंडन गेल्यावर तिथले लोक आपला इतिहास किती जपून ठेवतात, हे पाहायला मिळाले. एखाद्या तुटलेल्या चर्चचे दगड असो किंवा पुरातन वास्तू अगदी काळजीपूर्वक जतन करतात. पण आपल्याकडे मात्र ऐतिहासिक वास्तूचे हाल जगजाहीर आहे. आपला इतिहास आणि संस्कृती खूप संपन्न आहे पण फक्त त्याची काळजी घेत नाही ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी राहिली की नाही अशी शंका वाटते. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सावित्रीबाई फुले ज्या शाळेत शिकवत होत्या, ती शाळासुद्धा अनेकजणांना माहिती नाही. अशी ऐतिहासिक वास्तू लोकांना पाहायला मिळावी म्हणून प्रशासनाकडून काही विशेष प्रयत्न पण केले जात नाही. तिच परिस्थिती किल्ले आणि गड यांची आहे, या परिस्थितीत वर्षानुवर्षे मात्र सुधारणा होत नाही. याचे मात्र वाईट वाटत राहते.

कॉलेजमध्ये असताना डॉ. वृषाली रणधीर यांच्या सावित्रीबाई फुले या एकपात्री प्रयोगामुळे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. यामुळे सावित्रीबाईविषयी आणखीन आदर वाढला. धन्यवाद रणधीर मॅडम तुमच्यामुळे निदान त्यांच्या कष्टाची छोटीशी झलक पाहायला मिळाली, कॅलर्स वाहिनीवर महात्मा फुले यांच्या जीवनपटावर एक १० भागांची मालिका दाखवली गेली, त्यांचा संघर्ष १० भागात सांगणे शक्य नाही पण नाही पेक्षा काहीतरी दाखवले यात त्यांचे आभार. ती मालिका पाहताना माझे बाबा म्हणाले यांनी लोकांसाठी किती सहन केले पण यांचे कार्य आजच्या लोकांना फार माहिती नाही. हे चुकीचे आहे. माझ्या न शिकलेल्या बाबा हे कळते पण शिकलेल्या आणि स्वतःला सरकार म्हणवणाऱ्या कोणत्याही पक्षाला कळत नाही. फक्त त्याचं नाव वापरता येते. सावित्रीबाईच्या कष्टाची कहाणी मोठ्या पडद्यावर अजून कोणाला दाखवावी का वाटली नसेल (कोणाला माहिती असेल सांगा) त्यांचे संघर्षमय आयुष्यावर नक्की एखाद्या चित्रपट बनू शकतो. पण आपल्याकडे चित्रपट बनवणाऱ्याना अशी संघर्ष करणारी लोक दिसत नाही. सावित्रीबाई फुले यांची महती असो इतिहासातील थोर व्यक्तीचे महत्त्व समजायला आमचा समाज अजून प्रगल्भ झाला नाही असे वाटत राहते.
याविषयी अजून खूप लिहिण्यासारखे आहे पण पुढे कधी तरी

Tuesday, 25 October 2016

या चिमण्यानों परत फिरा घराकडे......

साधारण एका महिन्यापूर्वी एका येलो सनबर्डने (शिंजीर) जोडप्याने आमच्या आंगणात आपले घरटे बांधायला सुरुवात केली. दरवर्षी घराच्या आजूबाजूला शिंज घरटे घालतो. शत्रूपासून घरट्याचे रक्षण करण्यासाठी हा पक्षी माणसाच्या जवळ घरट बनवतो असे लक्षात आले. पिवळसर मादी व अत्यंत देखणा नेव्ही ब्लू रंगाचा नर अशी थोडीसे विजोड वाटावे असे हे जोडपे. नर  आणि मादीचा घराजवळ त्यांचा वावर वाढला की समजाव घरट्यासाठी जागेची शोधाशोध सुरु आहे. यावर्षी मात्र अगदी घराला लागुनच असलेल्या शतावरीच्या वेलीवर घरट बांधायला सुरुवात झाली. अगदी दोन- तीन दिवसांत काडी काडी जमवून सगळं घर तयार झालं. आपल्या हाताच्या तळव्यावर बसेल इतकं ते  लहान होते. योगायोगाने रविवार होता म्हणून त्यांच्या घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर फोटो टिपत गेलो. एका आठवड्यात त्या मादीने इवल्याशा घरट्यात चार अंडी दिली. 
आम्हांला भीती होती की पिल्ल झाल्यावर हे घरट लहान होईल, त्या चार पिल्ल कशी राहतील? या दरम्यान ती रोज अंडी उबवण्यासाठी बसत असे. नर मात्र आज्ञाधारक नवऱ्यासारखा तिला किडे, आळ्या आणून देत होता. लांब बसून तिच्यावर लक्ष ठेवत असे. एकजण घरट सोडून गेले तरी दुसरे घरट्याचे संरक्षणासाठी आजूबाजूला बसलेले असायचे. एके दिवशी खूप पाऊस झाल, आम्हांला वाटल आता काही घरट राहत नाही. पावसाने जड झाल्यावर पडेल पण निर्सगाची कृपा असे काही झाले नाही. काही दिवसांत त्या अंडीमधून एकएक करत चार पिल्ल बाहेर आली. आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी लहान होती, रोज सकाळी पिल्लांची खबरबात आम्ही घेत असू . किती मोठी झाली या उत्सुकतेने एकदा तरी घरट्यात डोकावत असू. तीन - चार दिवसांनी पुन्हा दुपारी अचानक पाऊस आला, यावेळी चारीही पिल्ल घरट्यात होती. काय झालं असेल अशी उगाच चिंता लागली. पण दुसऱ्या दिवशी आम्ही डोकावले तर तेच आम्हांला डोळे वटारून पाहत होते. पण पावसाने घरटे होते जीर्ण झाल्यासारखे दिसत होते. तसेच पिल्ल मोठी होत होती, त्यामुळे घरटेही ताणले जात आहे, असे वाटत होते.
 रोज एकतरी फोटो घेणे जणू आमचा दिनक्रम झाला होता, त्यामुळे ती पिल्ल आता आम्हांला घाबरत नव्हती तर डोळे बिचकत बघत होती. इवलाश्या घरट्यात एकमेकांवर दाटीवाटीने बसलेली पिल्ल पाहताना फार मज्जा वाटायची .त्यांचा नाजूकसा चिवचिवाट फारच आनंदायी होता. दिवसेदिवस घरटे पारदर्शी झाल्याने लांबूनच त्यांच्या हालचाली दिसत होत्या. एक दिवस सकाळी सकाळी एक पिल्लू घरट्याबाहेरच्या फांदीवर दिसले, घरट्यात डोकावले तर फक्त दोन शिल्लक होती. एक पिल्लू कुठे गेले असेल विचार करत असताना शेजारच्या फांदी दिसले. ऑफिसला झालेला उशीर यांचे घरट्याबाहेर पहिल्यांदा झालेले दर्शन यात काही सुचत नव्हते, दोघे बहिण-भांवडे त्यांचे फोटो काढत होतो. आई म्हणाली कामाला जायचे नाही का ? पण आम्ही मात्र तो क्षण गमावू इच्छित नव्हतो.ते पिल्ल इतके माणसाळलेले होते की गोविंदनी हात लावायचा प्रयत्न केला तर एक पिल्लू त्याच्या हातावर येऊन बसले. दोन-तीन मिनिट तसाच हात ठेऊन उभा होता. पिल्लू परत फांद्यावर जायचे नाव घेत नव्हते, मग अचानक उडून फांदीवर बसले आणि एकएक करत सगळे घरट्याच्या बाहेर आले. 
मला ऑफिसला उशीर झाला म्हणून निघून गेले तसे इकडेही सगळे आपआपल्या प्रवासाला लागले . घरी आल्यावर कळले की  दुपारपर्यंत होती आजूबाजूला आता मात्र दिसत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला पण फक्त लांबून आवाज येत होता ती पिल्ल मात्र दिसेनाशी झाली .... 


त्यांचे आम्हीही संरक्षण करत होतो ,घराजवळ  कावळा , बाहीर ससाणा  दिसला उडून जावा अनेकदा प्रयत्न केले. त्यांना रोज हात लावायची इच्छा होत असे पण निसर्गात हस्तक्षेप नको म्हणून लांबूनच पाहून समाधान मानत असू , एक मात्र आनंद झाला की उडून जाताना त्या पिल्लांनी आमची इच्छा पूर्ण केली. एकवेळ तर त्यांना एखाद्या पिंजऱ्यात टाकून कायम आपल्याच जवळ ठेवण्याचा मोहही झाला होता मात्र त्यांचे खरे विश्व काय आहे याची कल्पना असल्यामुळे तसं काही केलं नाही . ते सगळे  आपल्या पंखावर हा आसमंत काबीज करायला कायमची उडून गेली . आता मात्र त्यांची काळजी नाही कारण ते  आपल्या स्वबळावर स्वता:चे रक्षण करायला सक्षम झाले आहेत . ...
या प्रसंगी  एक ओळ आठवते ..... आकाशी उंच झेप घे रे पाखरा .......




Tuesday, 9 August 2016

कारभारीण आहे खंबीर, आमचा मात्र निरोप घ्यावा

शेतकऱ्यांच्या कणखर स्त्रियांची गोष्ट 

माणसाचा पोशिंदा जगला पाहिजे. असे किती वाटत असले तरी देशातील परिस्थिती वाईट झाली आहे. हजारो शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र राज्यात यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. निसर्गराजा शेतकऱ्यावर नाराज होऊन रुसून पळून गेला की काय असे वाटत राहते. तीन- चार वर्ष सतत दुष्काळ, विहिरी,तलाव,तळी कोरडी पडायला लागली. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जायचं कुठ ? डोक्यावर कर्जाचा बोजा आणि डोळ्यासमोर पाण्याविना व्याकूळ झालेली जनावर. सगळं वातावरण कसं निराशामय झालाय . यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण त्याची कारभारीण मात्र खंबीरपणे आणि कणखरपणे या परिस्थितीत तग धरून आहे. कदाचित शेतकऱ्यापेक्षा जास्त दुख सोसत ती आज परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. उलट संकटाशी सामना न करता शेतकरी आत्महत्या करणे स्वीकारत आहे. त्याचवेळी ती या समाजातील वाईट नजरापासून ते रोजच्या पोटापाण्याचा समस्या एकटीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा महिलांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यांचा आढावा मांडणारा हा लेख. 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या आधारे शेतकरी आत्महत्येसाठी मुख्य कारणे म्हणजे दिवाळखोरी, कर्जाचा डोंगर, शेतीशी संबंधित विषय नापिकी, नैसर्गिक आपत्तीने संकट, गरिबी, कौटुंबिक समस्या, आजारपण आदी आहेत. ही कारण सरकार नोंदी  आहेत. या आत्महत्या करणाऱ्यांची संख्या पहिली तर २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे १३७५४ व ११७७२ जणांनी आत्महत्या केल्या. तर २०१४ मध्ये  ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. २०१५ मध्ये ही संख्या अजून वाढलेली आहे. जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या सगळ्या पुरुष शेतकऱ्यांनी केली. यात महिलांची संख्या अगदीच नगण्य आहे. पण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही उलट वाढतोय. पण आत्महत्या केल्यावर सरकार पैसे देतेय म्हणून काहीजण आत्महत्या करत आहेत असे मराठवाड्यात महिलांसाठी काम करण्याऱ्या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्तीने सांगितले. तिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण अजून माहिती घेतल्यावर कळलं की आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होत आणि उलट पैसेही मिळतात म्हणून आपल्या घरच्याला मिळतील पैसे या उद्देशाने हा आत्महत्या वाढत आहे.  यासंदर्भात एका शेतकऱ्याच्या पत्नीशी संपर्क केला. तिचा नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलल्यावर अनेक गोष्टीचा उलगडा झाला आणि सत्य परिस्थिती बाहेर आली. खरचं काहीजण असे करतात. पण शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाही तर वाढतात याची माहिती मिळाली. 

 आत्महत्या केली त्याची बातमी दिसते पण त्यानंतर काय? लेखाची माहिती गोळा करताना मात्र भयानक चित्र समोर आले. शहरातील लोकांना वाटते शेतकऱ्यांना काय पैसे मिळतात पण त्यांना किती पैसे मिळतात? ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. ते पैसे मिळवण्याचा प्रवास किती कठीण आहे याची जाणीव झाली. या सगळ्या परिस्थितीला शेतकऱ्याची बायको सामोरे जातेय. बऱ्याच वेळा एकटी असते ती, कशी सामोरे जाते हे तिच तिलाच माहिती. बारा विश्व दारिद्र्य आणि भविष्याची चिंता खायला तीन –चार तोंड या सगळ्यातून जगायची प्रेरणा कुठून आणते हा प्रश्न आहे. पण आई ती आई असते. काही झालं तरीही पोराबाळांना खाऊ पिऊ घालून संसारचा गाडा खंबीरपणे ओढते आहे. यासाठी तिला सलामच करायला हवा. 

मराठवाडातील एकल महिला संघटना ही संस्था अनेक वर्षपासून महिलांच्यासाठी काम करते. विशेषतः विधवा, परीतक्ता, घटस्पोटीत, प्रौढ कुमारिका अशा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, तसेच त्यांना न्याय आणि समता मिळावी म्हणून कार्य सुरु आहे. संस्थेत काम करणारी लक्ष्मी वाघमारे हिच्या मते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांचे प्रश्न दिवसेदिवस वाढू लागले आहेत. एक तर या महिला आयुष्यभर ‘चुल मुल’ यामधून बाहेर पडलेल्या नसतात आणि घरचे पुरुष पडूही देत नाहीत पण अचानक नवऱ्याने आत्महत्या केली की सगळी लढाई तिला एकटीने लढावी लागते. घरच्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी तिलाच पाहाव्या लागतात. यामुळे  आयुष्याचा जोडीदार सोडून गेला याचं दुख करायला वेळ मिळत नाही. तरीही ती परिस्थितीला वैतागून आत्महत्या करत नाही किंवा धीर सोडत नाही लढत राहते. समाजाच्या वाईट नजराशी, दुष्काळच्या भयाण वास्तवाशी, नातेवाईकांच्या टोमणाशी आणि कधीतरी स्वत:शी स्वत:ची  असलेली लढाई लढत असते. 

अगदी कोवळ्या वयात बोहल्यावर चढलेली ती पोरगी, चांगलं –वाईट कळेपर्यंत दोन पोरांची आई झालेली असते. पुर्वी आजारपण किंवा अन्य कारणांनी विधवा झालेल्या नशिबाला दोष देत पण आता या शेतकऱ्यांच्या विधवांनी कोणाला दोष द्यावा? असा प्रश्न पडतो. आपला नवरा आपल्याला संकटात एकटा सोडून गेला याचा राग येतो त्यांना, मी त्याचा संसार का सांभळू असा प्रश्नही पडत असला तरी त्याचे आई- वडील, बहिण- भाऊ, आजी –आजोबा आणि स्वतःची मुले यांची सगळ्यांची जबाबदारी विलया पेलत असते. सरकारकडून मिळणारी मदत मिळवण्यासाठी तिला घराबाहेर जावं लागत. घराबाहेर न पाडलेल्या स्त्रीला एकटीला कोणी उभं करत नाही. या कामासाठी कोणाची मदत घ्यायची तर त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागतो. जर दिला नाही तर अर्धा पण हिस्सा मिळत नाही. म्हणून मन मारून अर्धा हिस्सा त्याला देऊन मिळणाऱ्या पैसेची वाट पाहते. येणाऱ्या पैश्यात घरातलेच हिस्सेदार होतात तेव्हा मात्र मन घट्ट करून परिस्थितीला लढा देण्याशिवाय उपाय नसतो. एकदा का पैसे मिळण्याची आशा दिसली की पहिले घरातील नातेवाईक हिस्सेदार म्हणून उभे राहतात त्याच्यावर आमचीही जबाबदारी होती म्हणून हिस्सा मागतात. अशा काही प्रकारामुळे येणारे पैसे रखडतात. हिस्सेकारी वाढले की येणारी रक्कम स्वत:च्या कुटुंबाला उशिरा आणि कमी मिळते तसेच सावकाराच भूत मानगुटीवर बसलेले असते. कधी कधी सावकाराच्या वागण्यावरून हा माणूसच आहे का असा प्रश्न पडतो. पण तिला सावकाराचे कर्जही फेडल्याशिवाय उपाय नसतो. कर्ज फेडण्यासाठी मात्र कोणी हिस्सेकारी नसतो .  कोणी नातेवाईक मदत करत नाही. उलट पैसे मागायला येऊ नये म्हणून अंतर ठेऊन वागतात. 

स्त्री ही जास्त सहनशील असते. असे आपण नेहमी म्हणतो पण संकटाकाळात ती ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळते. यावरून तिच्या सहनशीलता आणि कणखर वृत्तीचे दर्शन होते. असेच काहीसे दृश्य मराठवाड्यात पाहायला मिळते. नवऱ्याने आत्महत्या केल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.तरीही मुलांचा विचार करून परिस्थितीशी लढत असते. संस्था सरकारी योजनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते पण अनेक कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे तिला फायदा मिळत नाही. तसेच जमीन ,घर पतीच्या नावावर असल्यामुळे तिला ही मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी ती पहिल्यांदा सरकारी लालफितीत अडकते . तिथून बाहेर काढणारे त्याचा चांगला दाम पण घेतात. अशा अनेक पाळतीवर संकटांशी सामना करत ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी न थकता, निराश न होता चालत राहते. 
अशाच एका आईची व्यथा बीड मधील आंबेवाड गावातील २५–२६वर्षीय मनीषा तिकडे हिच्या नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलताना जाणवले की तिला नवऱ्याचा राग येत होता, फक्त एक –दीड लाखासाठी त्याने आत्महत्या करावी असा प्रश्नही सारखा सतावत होता. तसेच वाईट पण वाटत होते. कर्ज काही फार जास्त नव्हते पण आता माझ्या पोराबाळांना होणार त्रास त्या कर्जापेक्षा लाखो पट्टीने जास्त आहे, हे जाणवते होते. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवच रान करावं लागतंय, पण पाऊस-पाणी म्हणून काम नाही, काम नाही म्हणून पैसा नाही म्हणून सगळं कसं दुष्टचक्र बनलाय, अशी एकूण परिस्थिती. ती पुढे बोलताना म्हणाली “तो मला आणि माझ्या पोरांना सोडून गेला पण आमचा विचार केला नाही. आता मी पण तसचं केल तर ? पण पोराकडे बघून जगते. ताई माणस (पुरुष )पुढचामागचा विचार करीत नाहीत. त्यांच्यानंतर हा उघड्यावर पडलेला संसार कसा सांभाळायचा ?असा प्रश्न जगू देत नाही आणि मरू पण देत नाही.” आपल्या जीवनाची चित्रकथा मांडताना तिने सांगितले की शेतात काम करताना नवऱ्याच्या डोळ्यांना काहीतरी लागले होते, त्याची शस्त्रक्रिया करायला ३०-४० हजार खर्च झाले. शेतीसाठी सावकारकडून १ लाख घेतले होते. दुष्काळामुळे पीक नाही आले आणि कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे नवरा लय काळजी करायचा. तेव्हा मी त्याला सांगायचे की “कर्ज काय राहत असत व्हाय, आज ना उद्या फिटेल की कशाला काळजी करता” पण त्यांनी एक दिवस न सांगताच आत्महत्या केली मागे फक्त एक पाच वर्षाचा व दुसरा आठ वर्षाचा मुलगा आणि कर्जात अखंड बुडालेला संसार राहिला. दोन दिवस रडायला लोक आली, आज कोणी विचारत पण नाही , सरकारने मदत दिली पण ७५ % रक्कम पाच वर्षासाठी पोस्टात टाकली. हातात उरले तीस हजार  नाम संस्थेने १० – १२ हजार दिले पण एवढेसे पैसे कुठवर पुरणार? आता रोज सकाळी आज काय खायचं यांची चिंता पडते. मजुरीला जाते पण कधी आहे तर कधी नाही असा सगळा प्रकार. चार दिवस लोक आले वाईट वाटत म्हणून पोराकडे पाहून निघून गेले. आज पोरगा दिवसभर रडत बसला तरी कोणी पाहत नाही. पोरांना सगळ कळतंय आपला बाप असत तर ही हाल झाली नसती. त्यांना कोण समजवणार तुमचा बाप संकटाशी न लढता निघून गेला. त्याने धीर सोडला.  पण मी नाही सोडला आणि सोडणार पण नाही. पोरांना शिकून मोठ्ठ करणार. आज पाऊस नाही म्हणून काय झालं अर्ध्या भाकरीवर जीवन काढू, पुढच्या वक्ताला येईल की पाऊस मग करीन पोराची हौस-मौज. 

संस्था अशाच काही महिलांना रोजगार मिळावा म्हणून कार्य करते. यातून काहीजणी मशीन शिकून आणि बचत गटाच्या माध्यमातून जीवन सुधाण्यासाठी पुढे सरसावल्या आहे. आता गरज आहे शेतकऱ्यांनी समजण्याची की संकटाना सामोरे जाण्याची आणि कारभारीण कणखर आणि खंबीर आहे म्हणून तिला एकट सोडून न जाण्याची. सरकारने या विधवा आत्महत्या केल्यावर पैसे देण्यापेक्षा आत्महत्या करू नये म्हणून काम करावे. 

एक विनंती : पाऊसपाणी नाही म्हणून दुष्काळ पडतोय हे मान्य आहे सावकारच, सरकारच कर्ज , पोरीचं लग्न आणि अजून बऱ्याच अडचणी आहे पण याच दु:ख तर घरातील स्त्री- पुरुषांना, नवरा- बायको असो आई –मुलगा या सगळ्यांना सारखं आहे मग आत्महत्या करताना पुरुष का आघाडीवर आहेत ? स्त्री म्हणून तिलाही या सगळ्या गोष्टीचं समान दु:ख आहे. ती परिस्थितीशी लढा देत आहे. ती सहनशील म्हणून तिच्यावर तुमच्या संसारच ओझं टाकून तिला असं अर्धवट वाटेत सोडून जाऊ नका. 


(स्त्रीसक्षमीकरण पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेला  लेख -एप्रिल २०१६)







Monday, 8 August 2016

सिर्फ नाम ही काफी है- डॉ. कलाम सदैव प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व


 'सिर्फ नामही काफी है' असं म्हणतात. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबाबतीत असंच आहे. डॉ. कलामराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीची उत्सुकता वाढू लागली. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बुक लव्हर ग्रुपचा एक प्रोग्राम होता, त्यावेळी मी त्यांच्या एका पुस्तकाविषयीचे मत मांडले होते. त्यामुळे डॉ. कलाम यांची फक्त राष्ट्रपती अशी  ओळख आहे यापेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे शास्त्रज्ञ आणि लहान मुलांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व अशी झाली. सकाळ वृत्तपत्रानं शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात माझा भाऊ गोविंदची निवड झाली होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम आले होते. लहान मुलांशी मनसोक्त संवाद साधून कोणाच्या डोक्यावर हात, तर कोणाशी हस्तांदोलन करुन आपलंसं केलं. त्यात गोविंदही होता. त्यानं ही आठवण सांगितल्यावर तर मला त्यांना भेटण्याची इच्छा अधिकच बळकट झाली. त्यानंतर वानवडीतील अपंग शाळेच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं समजलं आणि आम्ही  त्यांना पाहायला जायचं ठरलं. पण कसं भेटणार, असा प्रश्न मनात होताच. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी जाताना घराजवळील मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला होता. चौकशीअंती राष्ट्रपती या रस्त्यानं वानवडीला जाणार असल्याचं समजलं मी आणि माझा भाऊ राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट पाहू लागलो.
काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रपतींचा ताफा समोरून जाऊ लागला त्यात  दोन तीन मोठ्या काळ्या गाड्या आल्या , त्याचवेळी आमच्या सोबत प्रतीक्षा करत असलेल्या शाळेतील मुलांनी हात वर करून टाटा करत असल्याचा इशारा केला. नकळत आम्हीही त्यांना साथ दिली. आश्चर्य म्हणजे चक्क एका गाडीतून एका व्यक्तीनं प्रतिसाद दिला. काळ्या काचेतून धूसरशी दिसणारी ती व्यक्ती डॉ. कलाम होती. कलामसाहेबांनी आम्हांला टाटा केल्याचा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर पुन्हा वानवडीला त्यांना भेटायला जायचं ठरलं. त्या कार्यक्रमाचे पास नव्हते तरीही जायचं ठरले. निदान बाहेर उभा राहून भाषण ऐकता येईल म्हणून मी, भाऊ, मावसबहीण असे सगळे सायकलीवर निघालो. वानवडी चार ते पाच किलोमीटर अंतर लांब होती , म्हणून भरभर सायकल चालवत आम्ही वानवडीत पोहचलो पाहतो तर काय सगळीकडे कडक बंदोबस्त होता. काहीतरी कारण सांगून अपंग शाळेजवळ पोहचलो. तरीही 200 मीटर अंतरावर थांबवलं. त्यामुळं आम्ही तिथं पोहचताच 10 मिनिटांनी राष्ट्रपतींचा कार्यक्रम संपला. गाडीत बसण्यासाठी म्हणून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून किंचितस दर्शन झालं. आम्ही धन्य पावलो. मला दिसले मला दिसले  म्हणत पुन्हा घराकडे गेलो. त्यांना भेटायची अजून इच्छा निर्माण झाली.

पुढे पत्रकारिता शिक्षण घेण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्य वृतीच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं कळलं. माझा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांना समोरासमोर पाहायला मिळणार म्हणून आणि घरचे खूप आनंदी होतो. कार्यक्रमाच्या दिवशी आई आणि मी हॉटेल ब्लू डायमंडला पोहचलो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं हॉटेल पाहून डोळे दिपले. ज्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती तो क्षण आला. महामहीम कलामसाहेब याचं आगमन झालं,त्यांना डोळे भरून पाहिलं. शिष्यवृत्ती मिळालेल्या अनेक मुली होत्या. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते शिष्य्वृतीचं वितरण सुरु होतं. मनात एक भीती होती, माझी भेट होईल ना. तेवढ्यात माझं नाव पुकारलं मी पुढे जाऊन उभी होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर उभी राहण्याची संधी मिळाली होती. शिष्यवृत्ती स्वीकारताना त्यांनी माझी चौकशी केली. पदवीला कोणता विषय होता असे विचारले ?बँकिंग विषय असल्याचं बोलले तेव्हा, 'वेरी गुड, कीप इटअप! या विषयात काम करण्याची गरज आहे, 'असं बोलले.
  त्यांच्या या दोन वाक्यांनी आणि सोबत काढलेल्या फोटोनं माझ्यात एक नवा उत्साह संचारला. त्यांनी दिलेला संदेश कायम लक्षात ठेऊन कामाला लागले, 'देशभक्त होण्यासाठी देशाच्या सीमेवर लढायला जायची गरज नाही; फक्त आपलं काम प्रामाणिक आणि व्यवस्थित करा व आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिक्षित करा. नाही जमले तर आपल्या आई वडिलांना शिकवा. आणि नेहमी विद्यार्थी म्हणून राहा खूप मोठे व्हाल. 'त्यांच्या या संदेशानं माझ्या जडणघडणीत अनेक सकारात्मक बदल झाले. असा हा अवलिया कायमच माझ्या स्मरणात राहील.
माझ्या आयुष्यात मला जे काम करायचे होते ते करायला मिळाले नाही तेव्हा फार नाराज होते पण  कलामसाहेब यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन मी पुढे वाटचाल सुरु ठेवते. 

स्वप्न खरी होतात याचा प्रत्यय तुम्हाला भेटल्यावर आला. कोटय़ावधी ह्रदयांचे प्रेरणास्थान, राष्ट्राचा खरा रिअल हिरो, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत, राष्ट्राची खरी शान असणारा, राष्ट्रासाठी जगणारा आणि या राष्ट्राला 2020 व्हिजन देणारा महामानव यापेक्षा  खऱ्या अर्थाने दुरदृष्टी असलेला नेता. अशा नेत्याला आयुष्यात एकदा भेटायचं असं स्वप्न मी ही पाहिलेलं, एक दिवस प्रत्यक्षात उतरलं .विश्वास बसत नव्हता पण त्यांच्या हस्ते माझ्या दुसर्या स्वप्नाची मुुर्हूतमेढ होत होती. राष्ट्रपती या सर्वाच्च पदावर अत्यंत साधी राहणी, कुठलाही मेकअप नसताना चेहऱ्यावरील तेज, प्रेरणादायी बोलणे तुमच्याविषयी लिहीताना शब्द अपुरे पडत आहेत.

तुमची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागणार आहेत.आंबेडकर, टिळक, सावरकर, आगरकर आणि महात्मा गांधी किंवा भगतसिंग यांच्यासारखे अनेक देशासाठी लढणारे आम्ही पाहिले नाही पण देशाला योग्य दिशा देणारे कलामसाहेब पाहिले, यामुळे आमची पिढी खूप भाग्यवान आहे. आजच्या वातावरणावरून पुढच्या काळात तुमच्यासारखे खरे आदर्श व्यक्ती पाहायला मिळतील याबाबत मला शंका वाटते.
तुम्ही आयुष्यभर प्रेरणादायी राहाल यात काही शंका नाही. 

Saturday, 6 August 2016

देवदूताने एकादशीचा जीव वाचवला ......

काल आमच्या इंदीचा वाढदिवस होता. ही इंदी म्हणजे आमच्या गाईचे वासरू इंद्रायणी. हा ब्लॉग लिहिण्याचे कारण की एका वर्षापूर्वी तिच्या जन्मानिमित्त अचानक दोन दोन देवदूताची भेट झाली.त्यांनी आम्हांला जी काही मदत केली त्यामुळे काल आम्ही इंदीचा वाढदिवस साजरा करू शकलो. फार काही विशेष केलं नाही पण यानिमित्त त्या देवदूतांची फार आठवण आली. तिला आणि तिच्या आईला म्हणजे एकादशीला वाचवणारे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका हाकेवर आमच्यासाठी धावत आले. त्याचे पद आणि त्याचे शिक्षण कशाचाही गर्व न करता हे डॉक्टर आपल्या पेशाला प्रामाणिकपणे निभावणारा हे देवदूत म्हणजे डॉ.अनिल आणि त्यांचे मित्र डॉ. तेजुरकर.

अगदी बरोबर एक वर्षापूर्वी २१ ऑगस्टला दुपारी बाराची वेळ असेल, घरातील काम सुरु होते. तेवढ्यात आई अचानक आली आणि म्हणाली “एकादशी प्रसूतीकळा देतेय आज नक्की डिलिवरी होणार.” डॉक्टरला फोन लावला तर ते अलिबागला गेलेले होते. आता काय करायचं ? असा प्रश्न पडला. गाईची डिलिवरी कशी होते ? काय काळजी घ्यायची याची फार माहिती नव्हती. डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातील तारीख दिली होती म्हणून आम्ही निवांत होतो. पण अशा अडचणीच्या वेळी डॉक्टर गावी गेले तर कोणाला बोलवावं ते कळेना, गावात सगळ्या अशा गोष्टी कशा हाताळायच्या ते माहिती असते. पण शहरात कोणालाच काही माहित नसतं, जवळपास गोठाही नाही, आम्ही सगळेजण टेन्शन मध्ये होतो. या गडबडीत एक सुंदर आणि गोंडस वासरू या जगात येत होत. ते छोटेसे वासरे पाहून आमचा सगळा तणाव पाण्यात साखर विरघळावी तसा निवळला होता पण आनंदावर विरजण पडले आणि गाईचे डिलिवरी होताना तिचे आतडे बाहेर पडले. तिची ही पहिलीच वेळ. कोणी अनुभवी माणूस नाही. आमची नुसती तारांबळ उडाली. बाबाच्या एका मित्राला बोलवायला कोणी तरी गेलं पण त्यांना येण्यासाठी उशीर झाला तोपर्यंत गाय वेदनेने सैरवैर करत होती. बाबा तिचे आतडे हातात घेऊन गाईच्या मागे धावत होते. आतड्याचे वजन ३०-४० किलो असेल किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे असेल. वेद्नेपुढे तिला काही कळत नव्हते म्हणून नुसती पळत सुटली होती, बाबा तिच्या मागे पळून पळून दामले होते. डॉक्टरांनी फोनवर जवळ कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलवा असे सांगितले पण जनावरांचा डॉक्टर वेळेवर काही केल्या सापडेना. यामुळे आमची फजिती होणार असे लक्षात आले. वारंवार फोन केल्यावर आम्हांला कोणी डॉक्टर भेटले नाही तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा नंबर देता का ? असे विचारल्यावर एका डॉक्टरचा नंबर दिला त्या डॉक्टरानी मला जमणार नाही असे सांगितले तर अजून एकजण म्हणाला “आलो तरी अशा वेळी काही करता येत नाही, ते आतडे आत जाईल का प्रयत्न करा ते गेले तर ठीक नाहीतर काही खरे नाही.” मग आमचा धीर सुटत चालला होता, आम्ही प्रयत्न करून ते आतडे गाईच्या शरीरात टाकत होतो पण गाय तिला होत असलेल्या वेदनेमुळे कळा देऊन आत गेलेले आतडे बाहेर टाकत होती. यावेळी मात्र गायची ताकत एखाद्या हत्तीसारखी वाटत होती . या अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे कसे जायचे समजत नव्हते. आज इंदी एका वर्षात तिच्या आईसारखी दिसत आहे पण त्यावेळी मात्र दोघी मायलेकी वाचतात की नाही असे वाटत होते.

 अचानक लक्षात आले की शेजारी रेसकोर्स आहे तिथे घोड्याचे डॉक्टर असतील. मी गाडी काढली शेजारच्या रेसकोर्सला पोहचले तेव्हा कळाले डॉक्टर तर दुसऱ्या रेसकोर्सला असतात तिकडे गेले तर तीन –चारी गेट फिरल्यावरही डॉक्टर काही भेटेना. मग रखवालदाराला परिस्थिती सांगून विनंती केली त्यांनी सांगितले छोटे डॉक्टर काही माहिती नाही पण आत मोठे डॉक्टर बसलेत. मी धावत दवाखान्यात गेले आणि समोर बसलेल्या डॉक्टर त्यांनाच सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी विचारलं “ तुमचा डॉक्टर कुठे ?” ते बाहेरगावी गेले म्हणूनच तुमची मदत हवीय अशी मी विनंती केली. त्यांनी लगेच एकजणाला गाडी काढायला सांगितली “सगळं समान घे बोलले “. माझा तर विश्वास बसेना. मी पुढे पुढे आणि डॉक्टरची गाडी मागे , हे दृश्य पाहून रेसकोर्समधील लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते, त्या दिवशी सुट्टी होती म्हणून माझा अवतार फार बिघडलेला होता म्हणून लोक अधिक बघत ही कोण? रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉक्टर का हिच्याबरोबर जात आहेत. असा प्रश्न त्यांच्या तोंडावर दिसत होता. पण घरी सगळं ठीक असावं अशी प्रार्थना करत होते. इतक्या लांबून डॉक्टर घेऊन जाते पण .... असा मनात उगाच शंका येत होती. अगदी ३-४ मिनिटांच अंतर कोसभर वाटू लागले. मी डॉक्टरांना घेऊन आले आहे हे पाहून आई-बाबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

डॉक्टरांनी घरी पोहचताच कामाला सुरुवात केली, अंगावर किती महाग कपडे आहेत याची काळजी न करता त्या मातीत आणि चिखलात गाईचे उपचार सुरु केले. पुढील अर्धा- एक तास नुसती पळपळ सुरु होती. गाई पळून पळून दमली होती. ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती आणि अजून वासराला दुध ही पाजले नव्हते. त्याला जवळ घेणे तर लांबच होत. डॉक्टरानी आपले काम सुरु केल्यामुळे आमची नुसती बघ्याची भूमिका उरली होती. ते डॉक्टर घोड्यावर उपचार करत असल्यामुळे गाईची ही परिस्थिती त्यांच्या हाताबाहेरची आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गायीला भुलीचे इंजेक्शन देऊन शांत केले. आणि त्यांचा खास मित्र आणि गाईचा विशेषज्ञ डॉ. तेजूरकर त्यांना फोन केला आणि लवकर ये सांगितले. इकडची सगळी परिस्थिती सांगितली. डॉ. तेजुरकर उरुळीकांचनला होते पण मित्राचा फोन आला म्हणून ते डॉक्टर येण्यासाठी तयार झाले. पोहचण्यासाठी एक तास लागणार होतो. तोपर्यंत गाईने हिंमत सोडू नये असे वाटत होते.

डॉक्टराला सगळी परिस्थितीची माहिती असून ते आम्हांला धीर देत होते. सगळं ठीक होईल. तो एक तास आम्ही युगासारखा काढला. तोपर्यंत वासरू डोळे उघडून आईकडे पाहू लागले. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होते पण आईचा स्पर्श आणि दुधाशिवाय ते शक्य नव्हत. आमचा जीवही त्यांच्याबरोबर तुटत होता पण काहीच मार्ग नव्हता. डॉक्टरानी शक्कल लढवली की गाईचे झोपलेल्या अवस्थेत दुध काढून पिलाला द्यायचे आणि तसं केलंही त्यामुळे  १०-१५ मिनिटात वासरू उभं राहिलं. त्यावेळी आम्ही आनंद आणि दुख एकत्र अनुभवत होतो.

तेवढ्यात डॉ. सावंत आले, आम्ही त्यांनाही आम्ही फोन केला होता. त्यांनी परिस्थिती पाहून प्रयत्न करू बोलले आणि काम सुरु केले. ते ज्या प्रकारे गायीला इंजेक्शन देते होते ते पाहून डॉ. अनिल आणि सोबत आलेले डॉ. म्हणाले की जनावर असले तरी तय्ना जीव आहे जरा जपून प्रेमाने द्या. असे तर दुसऱ्या देशात केले तर तुमची पदवी काढून घेतील. यामुळे ते दोघे किती संवेदनशील डॉ आहेत याची जाणीव झाली. डॉ. सावंतचा अनुभव परिस्थिती सांभाळायला कमी पडत होता, त्यांना जमणार नाही हे लवकरच लक्षात आले. मग काय करावे सुचत नव्हते,तेवढ्यात एक गाडी वाजली, डॉ. तेजूरकर आले. वाऱ्याच्या वेगाने आले त्यांनी २० -३० मिनिटात जी काही मेहनत घेतली त्यावर आम्ही सगळे आवक झालो. कामाचा वेग, कामाचे ज्ञान आणि मेहनत यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे डॉ. तेजूरकर. अक्षरशः धावत येऊन अंगावरील शर्ट काढला आणि कामाला लागले मित्राला नीटसे बोललेही नाही. लगेच त्या चिखलात बसून उपचाराला सुरुवात केली. वारा लागल्यामुळे आतडे सुजले होते, डॉक्टर जीवानिशी प्रयत्न करून गायीच्या शरीरात आतडे बसवत होते पण गाईला होणारा त्रास त्यामुळे ती बाहेर काढून टाकत या सगळ्या प्रकारामुळे एकादशीचे मोठ्या प्रमाणत रक्त वाया गेले. त्यामुळे ती फार अशक्त झाली होती. तिने प्रयत्न सोडायच्या आत सगळं ठीक व्हावं म्हणून आम्ही देवाचा धावा करत होतो पण खरतरं दोन दोन डॉक्टररुपी देव आमच्या गाईला वाचवत होते. अखेरीस गायीच्या शरीरात सगळे आतडे बसवून त्याला टाके टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. याच दरम्यान तिला सलाईन दिले जात होते म्हणून तिला थोडीशी ताकत मिळाली. या ताकतीने तिने टाके तोडू नये असे डॉक्टराना वाटत होते. या सगळ्यात आमची एकादशी अर्धमेली झाली होती. अशक्तपणामुळे जमिनीवर निपचित पडली होती. अर्धा तासांनी तिला शुद्ध आली ती वासराकडे पाहू लागली. वासरू तिच्याकडे जातच तिन्हे पान्हा सोडला आणि आम्ही सुटकेचा श्वास ....


अशा प्रकारे दोन देवदूतांनी आमच्या एकादशीचा आणि इंद्रायणीचा जीव वाचवला. डॉ. अनिल यांनी उपचाराचे आणि आणलेले साहित्य कशाचेही पैसे घेतले नाहीत. फक्त डॉ.तेजुरकारांची फी द्या. अजून काही साहित्य हवे असेल तर सांगा पाठवून देतो असे म्हणाले. या सगळ्या गडबडीत आम्ही रेसकोर्समधून आलेल्या डॉक्टरच नावं विचारयचं राहून गेलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विचारले या डॉ.चे नाव काय ? तेव्हा त्याने सांगितले की हे रेसकोर्समधील सर्वात मोठे डॉक्टर आहे त्यांना सगळे नाव डॉ. अनिल म्हणतात.अधिक चौकशी केल्यावर कळाले की रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉ. आहेत. एवढे मोठे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका विनंतीवरून आमच्या गायीसाठी आपले काम सोडून आले. याचे आम्हांला फार आश्चर्य वाटत होते. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आपल्या पेशाविषयी असलेला आस्था दिसत होती. 

आम्ही त्यांचे आभार मानत असतात त्यांनी सांगितले धन्यवादची काही गरज नाही हे तर  माझे कर्तव्य आहे. मी डॉक्टर आहे जर एखादे जनावर अडचणीत असेल तर त्याला मदत करणे माझं कामच आहे. मग तो रेसकोर्समधला घोडा असो वा तुमची गाय. डॉ. गेल्यावर आम्ही देवाचे आभार मानू लागलो की वेळेवर जर डॉ आले नसते तर आम्ही एकादशी आणि इंदी गमवून बसलो असतो. डॉक्टराच्या उपकाराने आम्ही भारावून गेलो होतो.


आणि एकादशी आणि इंद्रायणी या मायलेकींचा संगम पाहतच राहिलो.












Friday, 29 July 2016

सुपरवुमन रोहिणी कावडे मांगलेकर : नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा !

नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा : रोहिणी कवाडे मांगलेकर

लहानपणापासून चार भावंडामध्ये रोहिणीला अभ्यासात मध्यम गती होती. तरीही वडिलांना मात्र रोहिणी सर्वांपेक्षा वेगळी आहे असे वाटत होते. दहावीनंतर कॉमर्स घ्यायला निघालेल्या रोहिणीनी वडिलांच्या सांगण्यावरून मॉकनिकल इंजिनिअरच्या डिप्लोमाला ऑडमिशन घेतले. खूप अभ्यास करून उत्तम मार्कांनी डिप्लोमा पूर्ण केला. कॉलेज झाल्यानंतर निलेश मांगलेकर यांच्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. तिथे एका कंपनीत नोकरी करीत असताना मार्केटिंग काम जवळून पाहत आले. पुढे काही दिवसांनी पतीची बदली दिल्लीला झाली तेव्हा त्यांच्याच कंपनीत रोहिणी मार्केटिंगमध्ये रुजू झाल्या. तिथे सॉंफ्टवेअर मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना विक्रीचा चांगला अनुभव मिळाला. काही काळ काम केल्यावर पती-पत्नीला मातृभूमीची त्यांना  आठवण येत होती तसेच दोघेही कामात फार समाधानी नव्हते. तेव्हा मात्र स्वत:चे काहीतरी करू असा विचार करून नोकरी सोडून कोल्हापूरला आले.
पुण्यात अनेक आय टी कंपन्या आहेत म्हणून त्यांनी कोल्हापूरला काम सुरु केले. स्वत: पती –पत्नी आणि एक नोकर तसेच काही तुटपुंजी गुंतवणूक यावर काम सुरु करण्यात आले. आज त्यांच्याकडे चाळीस कर्मचारी असून पुणे , कोल्हापूरला असे दोन ऑफिस आहेत. तसेच अन्य काही जिल्ह्यात जसे सांगली , सातारा त्यांची कामे सुरु आहेत. सुरुवातीच्या काळात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रोजेक्टसाठी सहकार्य करणे. तसेच सामन्य लोकांना आयटी सर्व्हिस देणे सुरु केले. त्यांनी आय टीच्या विविध क्षेत्रात काम सुरु होते. त्याचवेळी लक्षत आले की कोल्हापूरला रिवर्स इंजिनिअरिंग मध्ये सर्व्हिस देणारी कंपनी नाही .तेव्हा कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची सर्व्हिस देणारी त्यांनी पहिली कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी मशिनरी घेतली. फक्त तीन लाख गुंतवणूक केलेल्या त्या कंपनीचा आज दोन कोटी टनओवर झाला आहे.
रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये चांगला जम बसल्यावर त्यांनी बाकीच्या सर्व्हिसकामे आणि मुलांचे प्रशिक्षणवर्ग बंद केले. कारण प्रशिक्षणवर्ग संध्याकाळी असायचे त्यामुळे रात्री उशीरपर्यंत काम करावे लागत असे. पुन्हा सकाळी ऑफिस आणि संध्याकाळी प्रशिक्षणवर्ग यामुळे कामाचा प्रचंड ताण जाणवत असल्यामुळे प्रशिक्षणवर्ग बंद करून पूर्ण वेळ रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये लक्ष द्यायचे ठरवले. कोल्हापूरला काही कंपन्या बाहेरून सर्व्हिस घेत असत . अनुभवी लोक नसल्यामुळे अनेक सर्व्हिसेस आउटसोर्स करत होते तेव्हा रोहिणीताईच्या कंपनीने त्या कंपनीला आत्मविश्वास दिला की आउटसोर्स करण्यापेक्षा आम्ही तुमची कामे करून देतो. उत्पादन आणि इंजिनिअरिंग संदर्भातील अन्य कामे रोहिणीताईच्या कंपनीने करायला घेतली. यामुळे त्यांच्या कामाने वेळ घेतला. आणि कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाले .
त्यांना नेहमी वाटायचे की आयटी क्षेत्र खूप वाव आहे, पण काही करायला संधी मिळत नव्हती. दोन वर्षापूर्वीपासून देशात आयटी क्षेत्राला चांगले दिवस आले तेव्हापासून त्यांनीही मात्र या क्षेत्रात उतरायचे ठरवले. आतापर्यंत जे काम करत होत्या त्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांनी पुण्यातील एका संस्थेशी भागीदारी करून ‘श्रीनेम टेक्नोलॉजी’ नावाने कंपनी सुरु केली त्याअंतर्गत सर्वसामान्य लोकांना आयटीशी निगडीत समस्यावर उपाय उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी   मोबाइल ऑप्लिकेशन बनवणे, सेल्स, ट्रेनिंग, आणि गरजेनुसार त्यांना सुविधा पुरविणे अशा रीतीने कंपनीचे काम सुरु आहे.

रोहिणीताईला स्वत:ला सेल्समध्ये जास्त रस आहे म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केले तरीही त्यात काही रमल्या नाही. एक बिजनेसमॉन म्हणून त्या स्वत:ला जास्त सक्षम मानतात. त्यानुसार कामही करतात. म्हणूनच पाच वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली आहे. आर्थिक समस्यावर मात करून त्यांनी आज स्वता:ला सिद्ध केले आहे. एक शांत व लाजाळू मुलगी ते आज एक बिजनेसवूमन असा प्रवास करताना त्यांच्यात अनेक बदल झाले. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक उंची वाढली म्हणूनच त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत.