Tuesday, 20 November 2018

पॅडवूमन....



 सणासुदीत तिला लांब ठेवले जाते. देवघर असो की स्वयंपाकघर दोन्हीपासून चार हात लांब राहायचे तिने. मासिक पाळीच्या त्या चार दिवसात अपवित्र ठरवून बाहेर बसविलेल्या कुठल्याही स्त्रीची मानसिक घालमेल संपता संपत नाही.

 पण जी हा कचरा वाहून नेते तीच काय ? तिला कोणत्या नजरेला सामोरे जावे लागत असेल रोज ? कोणती वागणूक मिळत असेल.

पाचवीला दारिद्र्य पुजलेले अशा घरात जन्माला आली संगीता चितारे. अगदी लहान वयात लग्न झालं आणि मग दोन मुलं. असा संसार सुरू झाला .नवरा मोलमजुरी करून संसार चालवत होता. संगीता मात्र अभ्यासात हुशार असल्याने पुढचं शिक्षणही चालू ठेवून बारावीची परीक्षा दिली. लहानपणापासून शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे बी. एड.पदवी  घेतली. त्याकाळी कॉलेजमध्ये   हुशार मुलींमध्ये संगीताचा पहिला - दुसरा नंबर असायचा .कॉलेज संपून बरेच दिवस झाले पण काही  नोकरी मिळत नव्हती . नवऱ्याच्या एकट्या जीवावर संसार काय उभारी घेत नव्हता. नोकरीसाठी रोज नेते मंडळी आणि मंत्र्याच्या कार्यालयाच्या पायर्‍या चढत होती. पण नोकरी काही लागेल . खचली नाही आज ना उद्या मिळेल एकेक दिवस पुढे ढकलत होती. नवरा दोन पैसे कमवत होता. म्हणून घरीच मुलांचे संगोपन करत संसारात रमु लागली. एक दिवस तिला दौंड येथील शाळेतून फोन आला .  कामाला सुरुवात झाली, पण काम कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे निम्माच पगार मिळू लागला . तरीही सुरुवात आहे म्हणून सहा वर्ष काढली .त्यानंतर कायम स्वरुपी  कायमस्वरूपी जागा निघाल्यावर त्यासाठी शाळे कडून पैसे मागण्यात आले. सहा ते सात लाख रुपये कुठून भरायचे त्यामुळे काम सोडून दिले दुसरीकडे नोकरी लागेल या विचाराने आणखीन सहा-सात महिने निघून गेले . एक दिवस नियतीने घाला घातला. संगीताताईच्या  पतीचे अल्पशा आजारपणाने निधन झाले. सगळा संसार उघड्यावर पडला.  हसती खेळती दोन मुले आणि उघड्यावर पडलेला संसार सांभाळत संगीताताई पुन्हा उभ्या राहिल्या.
आता मात्र रोज नवीन संघर्ष सुरू झाला घरात खायला कण नाही आणि हाताला कुणी काम देईना अशा अवस्थेत माहेरून थोडीफार मदत झाली आणि सहा-सात महिने कधी निघून गेले कळले नाही. दरम्यान मनपाच्या शाळेत शिक्षक भरती सुरू होती. यासंदर्भात स्थानिक नेत्यांना कामा संदर्भात वारंवार विनंत्या करून झाल्या . पण पैसे भरल्याशिवाय नोकरी नाही त्यांना सांगण्यात आले. हातात पदवी असून नोकरी मिळत नव्हती . तसेच मूलही मोठी होऊ लागली होती. कामाशिवाय पर्याय नव्हता धुण- भांडी करणे मनाला पटत नव्हते. शिक्षणाचा उपयोग करून कुठल्यातरी कार्यालयात काम करावे प्रयत्न सुरू होते. एक दिवस संस्थेचे काही लोक कामासाठी महिला शोधत होते. कामासाठी सगळ्याजणी हो म्हणत होत्या पण कामाचा स्वरूप पाहून कुणीही पुढे सरसावत नव्हतं. कारण ते काम होतं सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे. संपूर्ण वस्तीमधून फक्त संगीताताईंनी कामाला होकार दिला न देऊन करतील तरी काय घरात पोरांच्या पोटात पडलेली आग विजवण्यासाठी शिकल्या-सवरल्या आईने आज एक पाऊल पुढे उचललं होतं. पदवी घेऊनही जर काम मिळत नसेल आणि पोरांची पोट भरता येत नसेल ही पदवी तरी काय कामाचे हा विचार करून त्यांनी कामाला होकार दिला.

 नोव्हेंबर 2014 मध्ये कामाला सुरुवात झाली. अगदीच अत्यल्प मानधनात काम सुरू केले. घरोघरी जाऊन सॅनेटरी नॅपकिन जमा करणे आणि जमा केलेले नॅपकिन डिस्पोजल मशीन मध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावणे. अशा स्वरूपाचं काम संगीता ताई गेली चार वर्ष करत आहेत.  महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन रोज सॅनेटरी नॅपकिन गोळा करून आणतात. प्रोजेक्ट मध्ये जाऊन त्याचे वर्गीकरण करून त्यानुसार त्याची विल्हेवाट लावतात. कचरा उचलतात त्यापेक्षाही हीनदर्जाचे समजले जाणारे हे काम त्या गेल्या अनेक वर्षांपासून करतात. नॅपकिनची विल्हेवाट लावताना अतिशय घाणेरडा वास येतो त्यामुळे संगीता ताई सकाळी नाष्टा करून येतात ते रात्री घरी गेल्यावर जेवतात. कामाच्या ठिकाणी पाणी प्यायची इच्छा होत नाही असे सगळे वातावरण आजूबाजूला असते. कचरा प्रकल्पात एका कोपऱ्यात सॅनेटरी नॅपकिन डिस्पोजल साठी एक छोटीशी रूम बांधून दिलेली आहे त्यामध्येच एक मशीन आहे त्यावरही सगळे काम सुरू असते. ती मशीन हाताळणे हे कौशल्याचं काम आहे त्या मशीनमध्ये योग्य प्रमाणात घेतले जातात आणि योग्य तापमानावर त्यांची विल्हेवाट लावली जाते हे अतिशय किळसवाणे काम अत्यंत कौशल्यपूर्ण करत असतात. मशीन मध्ये फक्त कागद आणि सॅनेटरी नॅपकिन त्याची विल्हेवाट लावली जाते. चुकून जरी प्लास्टिक आत मशीनमध्ये गेले तर काम बंद पडते .त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक आलेल्या कचऱ्यातून वर्गीकरण करून सॅनेटरी नॅपकिन काढून आणि मशीन मध्ये टाकावे लागतात.आता मात्र त्यांचा मुलगा त्यांच्या मदतीला येत आहे. त्यामुळे त्या अधिक क्षमतेने काम करू शकतात. 

संगीताताई यांनी सांगितले की ,हे काम अतिशय हीन दर्जाचे समजले जाते परंतु समाजाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे काम आहे. आम्ही कचरा गोळा करायला गेलो की अनेक महिला आणि पुरुष आमच्या पासून चार हात लांबून चालतात. यामुळे जुन्या काळात जशी दलितांना वागणूक मिळत होती त्याची अनुभूती मिळते. काही लोक तर लांबून जा असेच सांगतात. आपल्याकडे मासिक पाळी आधीच अपवित्र समजली जाते त्यात वापरण्यात येणारी नॅपकिन ही अपवित्र आणि तो कचरा नेणारे लोक ते तर अधिक अपवित्र समजले जातात. माणसासारखे माणसाने पण ज्या पद्धतीने वागणूक मिळते ते पाहून अनेक वेळा डोळे भरून येतात पण पोटाची आग डोळ्यातलं पाणी मिटून घेते. मी पुन्हा कामाला लागते. रोज सगळ्या जगाची घाण आम्ही साफ करतो तेव्हा खूप  वाईट वाटते पण त्यातून मिळणाऱ्या पैशामुळे माझ्या पोरांची फोटो भरतात . मुले शिकून ती मोठी होतील या आशेने मी पुन्हा दुसर्‍या दिवशी कामाला येते. घरची परिस्थिती यामुळे मुलगा पुढे  शिकू शिकला नाही आता मला मदत करतोय यातच समाधान आहे. आपले शहरांमध्ये हजारो टन कचरा जमा होतो त्याची योग्य विल्हेवाट लावायला आपली यंत्रणा कमी पडत आहे आमची संस्था आणि आम्ही यासंदर्भात जनजागृती करत आहोत परंतु अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. तेव्हाच कुठे आम्हालाही थोडा सन्मानाने जगता येईल. आम्हाला मिळणारी हीनतेची वागणूक कमी होईल. अनेक वर्ष मी माझी ओळख लपून काम केले. समाज काय म्हणेल माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांना जर कळालं तर मी एवढी शिकूनही असे काम करते याची भीती होती. एक दिवस ठरवलं पोटासाठी काम करतोय चोरी नाही, काय काम करतोय सांगायला लाज कसली बाळगायची. आणि मी बिनधास्त काम करू लागले.

संगीताताईचे काम पाहून घोरपडी गावात रणरागिणी संस्थेच्यावतीने महिलादिनानिमित्त त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जमलेल्या महिलांना त्यांच्या कामाची माहिती देत होत्या.त्यावेळी अनेक महिलांनी नाक मुरडले. पण जेव्हा त्यांनी हे काम करण्यामागील त्यांची कहाणी सांगितली. तेव्हा मात्र अनेकजणींना रडू आवरले नाही. घोरपडी गावातील त्या छोट्याश्या गल्लीत हा सगळा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पाहुणे रडतात आणि जमा झालेले प्रेक्षकही रडत आहेत. असे दृश्य कदाचित पाहायला मिळते. या सगळ्यांना संगीताताईसाठी काहीतरी करायची इच्छा होती. संगीताताईने आयुष्यात पहिल्यांदा एवढा सन्मान पाहिला होता. कुणीतरी त्यांचा आदर करत आहे म्हणून त्यांना भरून आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यात कितीतरी वेळ माझ्यापाशी येऊन धन्यवाद बोलू लागल्या. आजवर मला ज्या समाजाने नाकारलं होतं, त्यांनीच माझा सत्कार केला यासाठी  माझे आभार मानू लागले होते. माझ्यासाठी त्यांना या समाजाने स्वीकारले हीच मोठी गोष्ट होती.

कालपरवाच त्यांची मी चौकशी केली काम कसे सुरु आहे असे विचारल्यावर त्या म्हणाल्या दोन महिने झाले घरीच बसू आहे, काम बंद झालं. घरात जाणवणारे मी आणि माझा मुलगा दोघेही घरी आहोत. पहिल्यापेक्षा जास्त वाईट अवस्था झाली. आमच्या संस्थेचं कॉन्टॅक्ट रद्द झाले पण दुसरी संस्था मला काम देणार आहे . हा त्यांचा जीवनाकडे असलेला आशावाद मन जिंकून घेतो .तरीही दुसर काम असेल तर सांगा कारण दोन महिने झाले एक वेळ जेवण करून दिवस काढत आहोत . मुलाला पण बघा काम तो कमवू लागला तरी जरा किती बदलेल. हा त्यांचा जीवनाविषयी असलेला आशावाद मन जिंकून घेतो.

अशा कष्टाळू आणि आशावादी महिलांकडे पाहिलं की वाटतं कितीही संकट आली तरीही त्या उभ्या आहेत नवीन आशेवर आणि जिद्दीवर . नाहीतर आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी साठी आत्महत्या करणारी माणसे खूप आहेत त्या सगळ्यांनी अशा संगीताताई कडून जगण्याची उमेद घ्यायला काय हरकत आहे.

                                           (घोरपडीमध्ये रणरागिणी संस्थेने सत्कार करताना...)

Saturday, 17 November 2018

उद्योजक आईची कथा


एक.... दोन...तीन..... मोजता न येणाऱ्या अशा अनेक संकटाला सामोरे जाणारी रणरागिणी... संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षगाथा. अशा धाडसी आणि कर्तृत्ववान महिला म्हणजे सुजाताताई शहा. नशिबाने खूप काही हिरावले पण कष्टाच्या आणि जिद्दीने जोरावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. आणि आज त्या यशस्वी उद्योजक म्हणून कार्य करत आहे. सर्वात जास्त सेल करणाऱ्या पेट्रोलपंपाच्या मालकीण म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.

ही ओळख बनवणे एवढे सोपे नव्हते, अत्यंत खडतर प्रवास करून त्या आजच्या पदावर पोहचल्या आहेत. बालपणी पाच बहिणी आणि भावासोबत हसत- खेळत चालू असताना देवाने त्यांची आई हिरावली पण आत्याने त्यांचा आणि भावंडाचा मायेने सांभाळ केला. वडिलांचे  दुकान असल्यामुळे वाढत्या वयानुसार त्यांना दुकानातील बारकावे शिकायला मिळाले आणि व्यवसायाचे बाळकडू इथून मिळाले. वडील आणि आत्या जर दुकानावर नसतील खंबीरपणे त्या दुकान सांभाळत असत. व्यवसायाचे धडे मिळत असले तरी वकील होण्याचे स्वप्न त्या पाहू लागल्या. आणि त्यानुसार अभ्यासात प्रगती सुरु होती. एक दिवस अचानक बहिणीने आंतरजातीय विवाह केला आणि सगळी परिस्थिती बदलली. ७०च्या दशकात एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या कुटुंबाला गावातील लोक एकप्रकारे वाळीत टाकत. त्यामुळे सुजाताताईचे घराबाहेर पडणे आणि कॉलेज बंद झाले, बारावीची कशी बशी परीक्षा दिली. तेव्हा ओळखीच्या पाहुणे वडिलाला भेटायला आले आणि त्यांनी पुण्यातील निरंजन शहा त्याचे स्थळ सुचवले. काही दिवसांतच सुजाताताई निरंजन शहा यांच्या अर्धांगिनी बनून पुण्यात आल्या. शिक्षणाची खूप इच्छा होती पण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संसाराचा गाडा चालवताना त्यांना स्वत: इच्छा बाजूला ठेवावी लागली. लातूरहून पुण्याला आल्यावर त्यांचा वेगळा प्रवास सुरु झाला.पुणे आणि लातूर मधल्या सांस्कृतिक आणि इतर बदलाने त्यांना पुण्यात रमायला उशीर लागला पण त्यांनी इथल्या पद्धती शिकून घेतल्या. हॉटेलमध्ये जाणे म्हणजे पाप अशी लातूरमध्ये समज होती. तरीही आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पावभाजी खाल्ली. पुण्यात रस्ता क्रॉस करणे, फोन डायल करणे अशा अनेक नवनवीन त्या गोष्टी पुण्यात आल्यावर शिकल्या.

संसार सुरळीत होता पण त्यांच्या डोक्यात आपण काहीतरी स्वत:च कराव असे सारखे वाटत असे. त्याचवेळी दुकानाची वाटणी झाली आणि स्वता:चे दुकान सुरु झाले. सुजाताताई स्वत:च्या किराणा दुकानातील सगळे छोटे छोटे काम करत असत. ते काम करताना त्यांना आनंद मिळे. काम करताना त्यांना बराच वेळ तेव्हा त्या पुस्तक वाचन आणि स्वेटर विणणे अशी बारीकसारीक काम करत. संसाराचा गाडा छान सुरु होता पण त्याला काही नवीन पालवी येत नव्हती. लग्नाच्या बारा वर्षानंतर सुजाताताईच्या घरात पाळणा हलण्याचे संकेत मिळाले. त्याचवेळी त्यांचा नवरा अचानक आजारी पडला. तपासणीतून एक किडनी फेल झाल्याचे समजले. दुसरी लहानपणापासून छोटी असल्यामुळे ती असून उपयोग नव्हता. तेव्हा पुण्यात किडनीच्या शस्त्रक्रियेची सुविधा नव्हती. शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचार सुरु होते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले. सुजाताताई पुन्हा एकट्या पडल्या. 

दुकान आणि इतर सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. पती गेल्यावर संपत्तीवरून सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबातील वाद वाढत असल्याने त्यांच्यावर गर्भवती असताना प्रचंड तणावाला सामोरे जावे लागले. अशाच वातावरणात सुजाताताईनी गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी सुनिशा असे मुलीचे नाव ठेवले. चार महिन्याची असताना मुलीला अचानक कावीळ झाला. मुलगी पाच दिवस कोमात गेली. जेव्हा ती कोमातून बाहेर आली तेव्हा तिच्या हालचाली सामान्य वाटत नव्हत्या. हात – पायाची हालचाल कमी झाली. घरी आणण्यावर तिची काळजी घेण्यासाठी राजू नावाचा मुलगा मदत करायचा. अगदी लहानपणीच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो सुनिशाला रोज दवाखान्यात घेऊन जात असे. काही दिवसांनी ती उपचाराला प्रतिसाद देऊन ती हळूहळू ती चालायला शिकली. ३-४ वर्षाची झाल्यावर बालवाडीत टाकले परंतु तिचे शाळेत मन रमत नव्हते, सारखी रडायची. कसेतरी एक काढल्यावर चांगले शिक्षण मिळावे म्हणून नुमवी शाळेत टाकले चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर तिथला अभ्यास आणि धावपळ जमेनासे झाले. त्यासाठी घराजवळ एका शाळेत टाकले तिथल्या गोडबोले शिक्षकांनी तिला अगदी मुलीप्रमाणे सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली हळूहळू तिची प्रगती सुरु झाली. त्या शिक्षक शाळा सोडून परदेशात गेल्या. त्यानंतर तिला शाळेत जावेसे वाटत नव्हते. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. अशा पद्धतीने तिची शाळा सुटली गेली...


सासू-सासऱ्याची साथ असताना मुलगी दहा महिन्याची असताना सासू एका अपघात गेल्या . काही दिवस सासरे राहिले. काही आत्या राहिल्या अशा पद्धतीने जीवन पुन्हा झाले. मुलीला सांभाळायला राजू होता . तो दिवसभर मुलीचे जेवणापासून सगळे काम करत असे. त्या पुन्हा पोटपाण्यासाठी दुकानावर बसत. त्याच बरोबर त्यांच्या नवऱ्याने सिंहगड रोड काही जागा घेतली होती तिचा व्यवहार पूर्ण करून त्यावर नवऱ्याने बंगला बांधायचे काम सुरु केले होते  त्यांचे स्वप्न पूर्ण करताना खूप धावपळ झाली. परंतु सगळ त्या जिद्दीने करायच्या. कधी थांबायच्या नाही. अडचण, संकट आले की त्यावर उपाय शोधून पुढे जायचे एवढे उद्दिष्ट ठेऊन आपले काम करत राहायच्या. पुढे रोडलगत जागा असल्याने त्यांना ती विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी अनेकजण विचारत असत. त्यांनी याकडे काही दिवस फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी त्यात दिसणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन त्यांनी एकजणाला जागा भाड्याने द्यायला तयार झाल्या. तो व्यक्ती तिथे पेट्रोलपंप टाकणार तेव्हा इंडियन ऑईल कंपनीच्या लोकांनी तुम्ही स्वता:च पेट्रोलपंप टाका असे सुचविले . सुनिशाची जबाबदारी अन्य बाकी कामामुळे जमेल का  अशी शंका होती. करून पाहू असा विचार करून त्या पेट्रोलपंपासाठी मुलाखतीला गेल्या तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की ३००० टार्गेट दिल तर किती महिन्यात किती सेल दुप्पट करणार . त्यांनी उत्तर दिले की २-३ महिन्यात ५००० लिटर सेल करू असे उत्तर दिले. त्यावर अधिकारी म्हणाले एक –दोन महिन्यात कसा एवढा सेल करणार ? सुजाताताई म्हणाल्या. आमच्या रोड दररोज आरटीओच्या आकडेवारीनुसार अंदाजे काही हजार गाड्या जातात त्यातील १० % लोकांनी जरी पेट्रोल भरले तरी मी माझे टार्गेट पूर्ण करू शकेल. सुजाताताईचा आत्मविश्वास पाहून त्यांना पेट्रोलपंप मिळाला. परंतु राजकीय लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. एक महिला पुढे जात असताना पुरुषी अहंकार दुखावला जातो. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला. रहिवासी लोकवस्तीत पेट्रोलपंप होऊ नये म्हणून स्थानिक राजकारणी लोकांनी आयुक्तांना पत्र पाठवून तक्रार केली. त्याला उत्तर म्हणून सुजाताताईनी पेट्रोलपंपची स्थानिक नागरिकांनीची मागणी असलेले पत्र आयुक्तांना दाखवले.


पेट्रोलपंप सुरु झाल्यावर स्थानिक राजकारण्यांनी अनेक कुरघोडी केल्या. अनेक खोटे ग्राहक येऊन भांडणे करायचे. एकजण पेट्रोलमध्ये पाणी म्हणून गोंधळ घालू लागला. लोक आणून तुमचा पंप बंद पडू. असे म्हणाला तेव्हा चाळीस लोक घेऊन  आला वाद करू लागला. सुजाताताईनी पोलिसांना बोलविले आणि त्यावेळी माझ्या पंपावरून पुन्हा पेट्रोल भर त्यात पाणी असले तर मी पंप बंद करते पण नसेल तर तुझ्याविरोधात तक्रार करणार असे सांगितले. तेव्हा त्याला राजकीय नेत्याचा फोन आला माझा गैरसमज असे म्हणत लोक घेऊन मागे फिरला. तेव्हा सुजाताताई त्याच्या विरोधात तक्रार करणार तेव्हा त्या माणसाने माफी मागितली.  सुजाताताईनी मोठ्या मनाने माफ केले. अशाच प्रकारे अनेक ग्राहक आणून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला गेला. पण त्या अशा संकटावर अगदी हुशारीने तोडगा काढत आणि पुढे जात म्हणून आजही त्यांचा सर्वात जास्त सेल करणारा पेट्रोलपंप आहे.

सगळे सोंग करता येते पैश्याचे करता येत नाही. याप्रमाणे सुजाताताई यांना एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका बँकेत ४५ लाख होते ती बँक अचानक बंद पडली. आता करणार काय असा प्रश्न होता. कामगार रडायला लागले आम्ही ३-४ महिने बिनपगारी काम करू असे म्हणाले. तेव्हा बँक मनेजरचा फोन आला असाल तश्या या चेक द्या . आपले लोकांशी चांगले संबंध असतील ते लोक मदत करतात. बँक मनेजर फोन केला म्हणून संध्याकाळपर्यंत माझे पैसे मला मिळाले नाहीतर खूप अवघड झाले असते. कारण इंडियन ऑईलमध्ये उधारीवर काम होत नाही. पुढे ती बँक सहा महिन्यानंतर फेडरल बँकेत विलीन झाली. आयुष्यातील सर्वात आर्थिक संकट फक्त चांगल्या संवादामुळे सहज सुटले.

पंप सुरु केल्यापासून अनेक लोक जून काम पंपावर काम करतात.  नितीन नावाचा व्यक्ती पेट्रोल टाकणारा आज पंपाचा मनेजर झाला. शिकायची इच्छा असेल तर माणूस कुठल्याही पदाला पोहचू शकतो याचे उदाहरण म्हणजे नितीन. पंपाची सगळी जबाबदारी तो एकदा समर्थपणे निभावतो. त्यामुळे मला जरा निवांत वेळ मिळतो. वर्षातून एकदा  सगळ्यांना घेऊन ट्रीपला जाते. अनेकांनी समुद्र कधीही पहिला नव्हता त्यांना पाहायला मिळाला. त्यांच्यासोबत मी ट्रीपला जाते. कामगारासोबत खाते –पिते म्हणून कधीही आमचे मालक आणि कामगार राहिले नाही. एका कुटुंबातील सदस्य आहोत असेच वाटते. अशाप्रकारे कामगाराला योग्य सुविधा दिल्याने कामगार खुश असतात. सगळ्यांना पीफ, आरोग्य विमा, विमा अश्या सर्व सुविधा देते त्यामुळे सगळेजण व्यवस्थित काम करतात.स्वच्छता हा आमचा धर्म असल्यासारखे आम्ही काम करतो. पंपावर स्वच्छेतेसाठी माणूस नाही सगळ्यांनी झाडू मारायचा. रोज सकाळी प्रार्थना होते त्यानंतर मी स्वत: चहा करून देते. ५० कर्मचारी काम करतात दोन शिफ्ट मध्ये काम चालते. दिवाळीला सर्वाना कुटुंबासोबत आम्ही पंपावर बोलवतो त्यांना पूजा कार्याला लावतो. ड्रायव्हर गाडीची पूजा करतो तर पेट्रोल सोडणारा पंपाची त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण असते.


 आर्थिक स्थिरता आल्यावर सामाजिक कामाकडे मन वळले. एकदा गांधी भवन येथे गेल्यावर अंध मुलींनी जेवण देत असत. एकदा त्या मुलीची चर्चा ऐकली त्यांना आवडले पदार्थ त्या एकमेकींना सांगत होत्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सुजाताताईला खूप छान वाटले. सुजाताताईना त्या मुलींनी कानातले दाखवले, कपडे दाखवले. आम्ही किती छान दिसतो ना अशा बोलत होत्या. तेव्हापासून त्यांनी रडायचे बंद केले आणि कोणाला रडू पण देत नाहीत. अशा अनेक मैत्रिणी आणि कामगार यांना त्या समजून सांगतात कि रडल्यावर तुमचे दुख कमी होत नाही मग त्यावर उपाय शोधा. अशा प्रकारे अनेक सामाजिक कामात मदत करत असतात. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतो पण ते कार्यक्रम पंपवर करतो कारण इथल्या कर्मचार्यांना त्यात सहभाग घेता यावा. या १५ ऑगस्टला परिसरातील शाळेत आम्ही फळा देणे, बेंच दिले. मोठा कार्यक्रम केला. असे अधूनमधून चालूच असते.

शेवटी बोलताना म्हणल्या की, व्यवसाय आणि सामाजिक कार्य छान सुरु आहे आता आयुष्यच असेच चालू ठेवायचे आहे. एकच इच्छा आहे की माझ्या मुलीचे लग्न करायचे मला तिची काळजी आहे. ती संसाराला चांगली कि मी माझ्या जबाबदारी थोडी मोकळी होईल. असे बोलताना त्याचे डोळे पाणावले आणि आम्ही निशब्द झालो.

अशा कर्तृत्ववान , धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी स्त्रीला, प्रेमळ मालकीण आणि हिंमतीवान आईला पाहिल्यावर अनेकजणीना प्रेरणा मिळते.